Thursday, December 1, 2016

जागरण आणि फालतुगिरी

घड्याळात वाजला एक
आधी हातातलं पुस्तक फेक
एक वाजता आणखी काय सुचणार?

दुपारी एकच्या सुमारास लायब्ररीत वाचत बसलेलो, तर समोरच्या आरामखुर्चीत एक मुलगी येऊन बसली. डाव्या पायावर उजवा पाय वगैरे ठेवून. हातात कुठलं तरी जाडजूड पुस्तक. खिडकीच्या जाळीतून तिच्या पायाच्या तीन बोटांवर तुटक तुटक ऊन पडलं होतं. आणि त्याखाली मग तिच्या बोटांची सावली. तिने पाय बाजूला केला की ऊन खाली जमिनीवर पडायचं आणि सावली गायब. त्यात मधूनच तिच्या नखांवर ऊन पडलं की एकदम चमकून जायची तिची नखं. मग मला मजा वाटली. असं मोजून आठ वेळा झाल्यावर मग मात्र मला कंटाळा आला. च्यायला तिची नखंही केवढी आकर्षक होती. नाहीतर माझी नखं. एक अर्धवट तुटलेलं. कुठे घाण अडकलेली. आणि बोटांवर मातीचे काळसर डाग. 
तर मग एलिअटची कविता आठवली एकदम–

I can connect
Nothing with nothing
The broken fingernails of dirty hands.
My people humble people who expect nothing

च्यायला काय संबंध. पण जाउ देत.

I can connect
Nothing with everything
And everything with nothing

हे हे. असो.
रात्री बारा नंतर सगळं माफ असतं असं माझा एक मित्र म्हणतो.
हा मित्र ग्रेट आहे पण. याने मागे कुठे तरी वाचलेलं की सिगरेटचा शेवटचा तृतीयांश फार वाईट असतो. म्हणून मग तेव्हापासून हा दोन तृतीयांश सिगरेट ओढतो आणि उरलेली टाकून देतो. मग ती कम्पेन्सेट करायला म्हणून दर दोन सिगरेटनंतर एक एक्स्ट्रा सिगरेट ओढतो. वर म्हणणं काय तर खर्च वाढलाय हल्ली सिगरेटचा. पण तब्येतीची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार?
थोडक्यात काय तर फालतुगिरी!
===

घड्याळात वाजले दोन
हातात घेतला फोन

 तर फोन आणि जागरण यांचा फार जवळचा संबंध आहे. दोन्हींच्या दुसऱ्या बाजूला कोणी ना कोणी असतंच. असलेलं किंवा नसलेलं. असलेलं असेल तर त्रास आणि नसलेलं असेल तर आणखी त्रास. त्रास अटळ आहे एकूण.

तर फोन ही आता गरज राहिलेली नसून ते व्यसन झालेलं आहे. मुंबई-पुणे-मुंबई. च्यायला हा एक पिक्चर भयंकर डिप्रेस करणारा आहे असं एक अतिशय बेवडा मित्र म्हणतो. तसं तर दारू पिणारे लोक कशानेही डिप्रेस होऊ शकतात. हे एक बरं असतं. म्हणजे पूर्वी हाच मित्र एकदा बरेच पेग पोटात गेल्यावर गांधीजींचं भजन म्हणत चक्क लहान मुलासारखा रडत सुटलेला. मग तावातावाने माझ्यासकट जो जो आठवेल त्याला शिव्या देत सुटला. तू साधा चहा पण पीत नाहीस. तू चुत्या आहेस वगैरे. असो पण. हा विषय नाही. 

तर हा पिक्चर उदास करून जातो हे मात्र खरंय.
पण सिनेमा तर सिनेमा असतो. सिनेमापेक्षा प्रत्यक्ष घडलेले प्रसंगच जास्त टोकदार असतात. सिनेमा फक्त ते टोक त्वचेच्या आत रुतवण्याचं काम करतो. जिथे टोकं जास्त, तिथे भळभळही जास्त.
च्यायला हे कसलं छापील वाक्य आहे आणि युजलेसही. 
माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं आणि मी काहीतरी भलतंच लिहिलं. पण त्याने काय फरक पडतो. तसंही काफ्का म्हणतो की All language is but a poor translation. म्हणजे आपण जे काही लिहितो, वाचतो, बोलतो ते सगळं poor translationच.

उदाहरणार्थ मला तू आवडतोस.
Poor translation.
माझं तुझ्यावर प्रेम आहे.
आणखी Poor translation.
मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही.
बेकार बेक्कार translation.
तू नाही आलास तर मी लग्नच करणार नाही. 
बोचा.
बोच आणि बोचा यात फक्त एका मात्रेचा फरक आहे. बाकी काही नाही.
तर एकूणच लिहिणं, वाचणं
, बोलणं ही फालतुगिरीच.
=== 

घड्याळात वाजले तीन
दूध दही ताक धिना धीन.

जमलं एकदाचं च्यायला. तरी लोणी राहिलंच.
तर दुधापासून दही बनतं.. दह्यापासून ताक..
ताकापासून लोणी.. पण उलट मात्र नाही..
माणसांचं पण असंच असतं का?
म्हणजे आधी दुधासारखी स्वच्छ वगैरे. मग हळू हळू दह्यासारखी घट्ट आणि आंबट होत गेलेली. मग बऱ्यापैकी घुसळली गेली की आंबटपणा जाऊन ताकासारखी सुटी, प्रवाही होत गेलेली. आणि शेवटी लोण्यासारखी मऊ, फिकट; कुठल्यातरी खुंटीवर लटकलेली
-
मी यापैकी नक्की कुठल्या स्टेजवर आहे?
दह्याच्या असणार बहुतेक..
किंवा दुधाच्याच.. फक्त नासलेल्या!

तर मुद्दा काय तर माणूस, जीवन, आयुष्य असले शब्द घुसवले की पाणचट गोष्टीतून पण उच्च कोटीचं तत्त्वज्ञान निर्माण करता येतं.
उदाहरणार्थ “
No parking in front of the gate – तसं झालंय आयुष्याचं” किंवा
“कृपया पुढे सरकत रहा- आयुष्यात!” वगैरे. इंस्टंट तत्त्वज्ञान च्यायला.

तर मुद्दा हा की मी हे का लिहिलंय? किंवा मीच हे लिहिलंय का?
की अमुक अमुक वेळच्या मी हे लिहिलंय? हो हेच जास्त appropriate होईल. ते theory of parallel world सारखं. ही थिअरी बरीये तशी. खासकरून जबाबदारी झटकायला!
मध्ये एक भिकार नाटक पाहिलेलं ज्यात
parallel worlds दाखवलेली. ‘अमर फोटो स्टुडीओ’ म्हणून. शॉट होतं. मनस्विनीने लिहिलेलं म्हणून गेलेलो. पण बकवास होतं च्यायला. असो.

तर हे जे लिहिलंय याला नक्की काय म्हणावं? वाङगमय वगैरे तर नक्कीच नाही. वाङगमय. वांगंमय. गंमतच. तर वाङगमय हा शब्द कुठून आला याची एक गोष्ट ऐकलेली पूर्वी. कदाचित त्यावेळच्या माझ्याकडूनच.
हां तर खूप खूप वर्षांपूर्वी एका गावात कुणीतरी लेखक राहायचा. अतिशय प्रतिभावंत पण तरी गरीब. खायचे प्यायचे वांधे असायचे. शेवटी त्याने उदरनिर्वाह(!) चालवायला भीक मागायला सुरुवात केली. पण कुणी भीकही देईना. तर गावातलीच एक बाई त्याला म्हणाली की तू मला काहीतरी  दिलंस तर मी तुला रोज जेवायला देईन.(चावटपणा नको इथे.) तर मग लेखकाने तिला रोज १ कागद पाठपोठ लिहून देण्याचं मान्य केलं. मग दररोज दुपारी १ वाजता हा वाढ गं माय, वाढ गं माय असं म्हणत हिच्या दाराशी. तीही त्याला अन्न द्यायची आणि कागद घेऊन अडगळीच्या जागी सांभाळून ठेवायची. तर वर्षानुवर्षं हे असंच चालू राहिलं. या बाईच्या घरातील अडगळ लेखकाच्या कागदांनी समृद्ध होत गेली. शेवटी बऱ्याच वर्षांनी तो लेखक मरण पावला. मग या बाईने ते सगळे कागद बाहेर काढले. एकत्र बांधले आणि प्रसिद्ध केलं. लिखाणाला तिने नाव दिलं “वाढ गं माय”. हे फार म्हणजे फार पॉप्युलर झालं. तसंही साधारणपणे लेखक मेल्यावर त्याचं लिखाण जास्त खपतं असा इतिहास आहे. म्हणजे खपाल तर खपेल असं काहीतरी.  तर पुढे या नावाचा अपभ्रंश वगैरे होऊन त्यातून वाङगमय या शब्दाची निर्मिती झाली. तर असं आहे एकूण.

च्यायला मी काय लिहायचं ठरवलेलं आणि काय लिहून काढलं –
तर आता हेच आपण जीवनात असं जोडून लिहू. म्हणजे तत्त्वज्ञान तयार.
तर एकूण काय, तत्त्वज्ञान वगैरे म्हणजे फालतुगिरीच.
=== 

घड्याळात वाजले चार..
जागरण झालंय फार
इससे आप पड सकते है,
बीमार- बहोत बीमार..
अब बस भी हुआ यार
हे यमक सोप्पंय म्हणून इतकं लिहिलं. नाहीतर इतकी फालतुगिरी कोण करेल?
बाकी जागरण झालं की सगळ्यात आधी डोळ्यांना कळत असावं.
डोळे कशासाठी?
जागरण झालंय का ते कळण्यासाठी..

तर डोळ्यांवरून आठवलं. परवा शिवडीला बसने जात होतो तर एक बाई पुढच्या सीटवर अजून एका बाईसोबत गप्पा मारत बसलेली. तर तिच्या पाठीवर तीन चार ठिकाणी ओरबाडल्याच्या खुणा नव्हे जखमाच होत्या. अगदी ताज्या आणि व्हिजिबल.
उगाच अस्वस्थ वाटू लागलं मग. मग वाटलं पाठीवरच्या जखमा दिसतात तरी. पण छातीवरच्या  जखमांचं काय? किंवा कदाचित त्याच्याही आतल्या?
पण काहीही केलं तरी सारखी नजर त्या जखमांकडेच जात राहिली. अर्थात ती बाई दिसायला तितकीशी बरी नव्हती म्हणूनही कदाचित माझी नजर आणखी खोल गेली नसावी.
तर शिवडी आल्यावर बसमधून उतरलो नि मागे न वळता तडक रेल्वे स्टेशनवर. तर या दोन्ही बायका ट्रेनमध्ये माझ्या सीटसमोरच. मग मी नीट त्या बाईकडे पाहिलं तर इतका प्रसन्न चेहरा होता तिचा. डोळेही एकदम टपोरे, बोलके आणि पाणीदार – एखाद्या विचारवन्तासारखे. थोडेसे जास्तच. सारखा विचार करून डोळ्यांत पाणी येत असावं बहुतेक. पण तिचा चेहरा बघून मग मला बरंच बरं वाटलं. मग चेंबूर येईपर्यंत तेच सगळं डोक्यात. मग मात्र विसरून पण गेलो. ते डायरेक्ट आता आठवलं. तसंही उसनी आणलेली दु:खं किती काळ लक्षात ठेवणार? ---

किती काळ लक्षात ठेवणार
घड्याळात वाजले चार ---

तर मुद्दा काय तर चार हे यमक फारच सोप्पये एकूण. इतकं सोपं सगळंच असतं तर – तरी कोणी ना कोणी फालतुगिरी केलीच असती.
च्यायला हा रस्ता अटळ आहे आणि अटळ आहे फालतुगिरीसुद्धा!
 ===

घड्याळात वाजले पाच
आता आडवा तिडवा नाच

“In the morning however, we shall – dance!”
Thus spoke Zarathustra.  

च्यायला. हे पुस्तक कंप्लीट डोक्यावरून गेलेलं. फक्त त्यातलं हे वाक्य लक्षात आहे अजूनही –
He who climbs upon the highest mountains laughs at all tragedies, real or imaginary.
अर्थ काय? नाही माहीत.

बरं हे पुस्तक मी का वाचायला गेलो? कारण एका मित्राने बोलता बोलता सांगितलं की त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला हे पुस्तक आवडायचं. त्यात त्याने एक्स चा उच्चार पण अगदी जोर वगैरे देऊन केलेला. म्हणूनही च्यायला.
तर एक्स-गर्लफ्रेंड हीसुद्धा एक गोष्टच. छे गोष्ट नव्हे दंतकथा. हो दंतकथाच. लांबी खूप जास्त आणि तात्पर्य झाटभर असलेली. दंतकथेला दंतकथा म्हणूनच म्हणतात का? पण प्रत्येक कथेला तात्पर्य असायलाच हवं का? तात्पर्य नसलेल्या गोष्टी जनरली लोकांना आवडत नसाव्यात, किंवा पटत नसाव्यात बहुधा. आणि तरी लोक अख्खंच्या अख्खं आयुष्य जगतात हे विशेष.

बाय द वे आयुष्यातला ष हा पोटफोड्या का असतो?  

असो पण. दिवसाची सुरुवात आणि जागरणाचा शेवट इतक्या डीप गोष्टीनी करू नये. उगाच जागरण लांबू शकतं अशाने.

पण जागरण लांबतं म्हणजे काय? जागरणाला शेवट असतो का? उलट जागरण ही गोष्ट माझ्या मते सलग असते. म्हणजे गणितात piecewise continuous function असतं तसं जागरणही तुकड्यातुकड्यांनी सलगच असतं.

सलग नसते ती झोप. सलग नसते ती रात्र. सलग नसतो तो दिवस. सलग नसते ती मैत्री.  सलग नसतात ती माणसं. सलग नसतं ते प्रेम. सलग नसतं ते लग्न. सलग नसतात ती नाती. सलग नसतात ती वर्षं. 
पुन्हा पोटफोड्याच ष च्यायला!
जागरण मात्र सलगच. अनेक डोळ्यांचं. अनेक स्वप्नांचं. अनेक रात्रींचं. अनेक दिवसांचं. अनेक 
महिन्यांचं. अनेक वर्षांचं. अनेक युगांचं. स्वत:चं आणि जगाचंसुद्धा.

तर एकूण काय तर जागरण ही एक अनंतकाळ चालणारी सलग फालतुगिरीच!

Thursday, July 14, 2016

शेवटी शून्य आणि पारिजात...

आज संचेतीच्या सिग्नलला पुढच्या बाईकवाल्याच्या नंबर प्लेटवर लिहिलेलं ‘शेवटी शून्य’. च्यायला म्हटलं खरये.. शेवटी शून्यच. मग उगाच ‘बाकी शून्य आठवलं’ – झवझव म्हणते सोट्या पूस, याच्यात नाहीतर त्याच्यात घूस... जियो यार. परत वाचायला पाहिजे हे पुस्तक. कसंही असलं तरी.

मग उगाच माझ्या लांबच्या ओळखीतल्या एकाने जीव दिला गेल्या वर्षी त्याची आठवण झाली. च्यायला पी.एच.डी. झालेला माणूसही जीव देतो हे थोर आहे. म्हणजे शेवटी शून्यच. जाऊ देत च्यायला पण. जीव दिला म्हणजे नक्की काय? जिवंत असणं म्हणजे नक्की काय? जिवंत असण्याची नक्की खूण किंवा लक्षण काय? सातव्या मजल्यावरून त्याचं शरीर जमिनीवर येऊन आदळलं म्हणजे नक्की काय झालं – potential energy चं kinetic energyत रुपांतर आणि परत पुन्हा kinetic energyचं potential energyत. बस्स हे आणि इतकंच.. बाकी श्वासोच्छवास वगैरे म्हणजे अंधश्रद्धाच! ३ वर्षांची मुलगी पण होती त्याला. तिला हे फिजिक्स कसं समजावणार?

कामू म्हणतो आत्महत्येपेक्षा जगायला जास्त हिम्मत लागते. गांड च्यायला. रोज सकाळी अमुक वाजता उठून दात आणि गांड घासून इस्त्री केलेले किंवा न केलेले कपडे घालून अमुक एका ठिकाणी जाऊन पुन्हा गांड घासणं आणि मग घरी येऊन ठरल्या वेळी जेवण, टी.वी. आणि ऑप्शन असेल तर सेक्स करून मग झोपणं इत्यादी साठी हिम्मत लागते काय?

कोणी महान माणसाने जर गांड हा शब्द मराठीच्या इतिहासातून खोडून टाकायचा ठरवलं तर किती वर्षं लागतील? हजार तरी किमान. पण कोण असली चुत्येगिरी करेल?

असो. ते energyवरून आठवलं. मला oracle शिकवणारे सर एकदा असंच गप्पा मारताना मला म्हणलेले – Communication is only by energy म्हणून. होय च्यायला. एनर्जी. ऊर्जा. ती पाहिजेच. ती नसेल तर कोणाला कितीही वेळा भेटा, बोलणं होतच नाही. होते ती फक्त शब्दांची फेकाफेक. फेकच च्यायला. म्हणून मी कदाचित भेटत नसेन का कोणाला आजकाल? पण भेटलो नाही तरी मी केवढ्या जणांशी बोलत असतो सतत. आणि माझ्याशीही केवढे जण बोलत असतात. communicationची हीच पद्धत बरी. भेटलो की उगाच विषय काढून काढून तास (ग्लास नाही!) भरत राहायचे. नकोच च्यायला.

मग कॅम्पपर्यंत या बाईकच्या मागे मागेच. पुढे तो वळल्यावर उगाच Slaughterhouse 5 आठवलं - Everything is nothing, with a twist. पुन्हा तेच. शून्यच. आणि तरी मी बाईक चालवतोच. मैलाचे आकडे पुढे पुढे जात राहतातच. घड्याळाचे काटे, वेळ, अगणित गाड्या, आकाशातले ढग, माणसं, हा, ही, तो, ती, तू, मी(?) सगळंच--- so it goes च्यायला. या कर्टने नक्कीच दासबोध वाचला असणार.

देवलंड पितृलंड | शक्तिवीण करी तोंड |
ज्याचे मुखीं भंडउभंड | तो एक मूर्ख ||

इति दासबोध. म्हणजे मी पण मूर्खच. तर मग कोण नाहीये? असो.

बाईकचा नंबर मात्र १६८१ होता. ४१ चा वर्ग. म्हणजे इथे मात्र शेवटी शून्य नाही. च्यायला टिपिकल पुणेकर. च्युणेकर. जाऊ देत. पुणे=च्युणे=चणे=कणे. यमक=गमक. हीहाहा. च्यायला पाठीत कण्याऐवजी चणे असते तर? कदाचित वाकताना इतका त्रास झाला नसता!

आता इतका टाईप करताना इटाका असं टाईप झालं.
इटाका भारी शब्द मराठीत का नाहीये?

घरी आलो तर स्टारस्पोर्ट्सवर गांगुलीची कुठली तरी इनिंग दाखवत होते. च्यायला गांगुली लास्ट टेस्टमध्ये शून्यावर आउट झाला होता. ब्रॅडमनपण. म्हणजे शेवटी शून्य. आणि तरी दोघेही ग्रेटच. ब्रॅडमनला ग्रेट फक्त सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं. नाहीतर त्याच्याबद्दल बॅटिंग अॅव्हरेज सोडून आपल्याला काडीची माहिती नाही. गांगुली मात्र ग्रेटच. च्यायला त्याच्या आधीचे सगळे कॅप्टन कसे होते. असो.


शेवटी शून्य काढूनही लोक यांना थोर समजतात. म्हणजे एकूणच ‘शेवटी शून्य’ या तत्त्वज्ञानात कुठेतरी घाण लोचा असणार. म्हणजे शून्याच्या आधीचा आकडा जाम मॅटर करतो एकूणच. 

येस. शून्याच्या आधीचा आकडा. 
त्यासाठीच सगळे धडपड करत असतील काय?
मी हे लिहितोय तेही त्यासाठीच का?
म्हणजे काहीच नाही तर निदान लिहून तरी बघू असं काहीतरी.

शून्याच्या आधीचा आकडा जास्तच डिप्रेस करून जातो.
तर असोच च्यायला.

म्हणूनच कामूने लिहिलं असणार की - आयुष्य निरर्थक आहे असं लक्षात आलं की ते जास्त चांगल्या प्रकारे जगता येतं. 
निदान शून्याच्या आधी काही तरी असलंच पाहिजे ही निरर्थक धडपड तरी नाही.


निरर्थक.

ही निरर्थकाची रांग लांबच्या लांब
उमजेल जिथे त्या ओळीपाशी थांब
---------------------------------------------------------------------------------
पहाटे दूध आणायला बाहेर पडलो तर जाताना एका घराच्या अंगणात पारिजाताचा सडा दिसला. मस्त वाटलं. फार पूर्वी एक गोष्ट ऐकली होती पारिजाताच्या फुलांची. पारिजातका नावाची राणी सूर्यावर प्रेम करायची. पण जसे पुष्कळ लोकांच्या प्रेमाचे लागतात तसेच तिच्याही प्रेमाचे लागले. सूर्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून मग या राणीने आत्महत्या केली. आणि तिच्या राखेतून मग पारिजाताचं झाड आलं. पण दिवसा तिला सूर्याकडे बघणं अनावर झालं. हे असं झाडांचंही होतं म्हणजे. म्हणून मग हे झाड सूर्यास्तानंतर फुलांनी बहरून येतं आणि सूर्योदयापूर्वी आपली फुलं अश्रुंसारखी गाळून टाकतं. याला म्हणावं खरं प्रेम. च्यायला.


तात्पर्य काय तर झाडंसुद्धा गाळतात. अश्रू.
फरक फक्त इटाकाच की इथे आत्महत्येनंतरचा सडा सुगंधी असतो.

तर याचा आणि वर जे लिहिलंय त्याचा काडीचाही संबंध नाही, नसावा, नसेलच. जे हवं ते घ्या च्यायला. काय फरक पडतो? 
हे लिहिलं कारण मला पारिजातक आवडतो. बाकी शून्य, त्याच्या आधीचे आकडे वगैरे भंकसच. पारिजात आणि त्याचा सडा इटकंच काय ते खरं.

Saturday, May 28, 2016

बॅकग्राऊंडला वाजत राहणारी भिकारचोट गाणी...

सकाळी उठल्यापासून(मी) ते रात्री झोपेपर्यंत(मीच) किंवा त्यानंतरही.. म्हणजे स्वप्नातल्या स्वप्नातही झोपेपर्यंत, मेंदूच्या कुठल्या तरी रिकाम्या कोपऱ्यात मला सारखी काही गाणी वाजताना ऐकू येतात.
सतत.
वर्षानुवर्षे.
दिवसेंदिवस.
तासन तास.
क्षण न क्षण.

च्यायला यापेक्षा जास्त डिटेलमध्ये आपण घुसुच नाही शकत कशाच्या? म्हणजे आपण फार फार तर क्षणापर्यंत पोचू शकतो. दोन क्षणांच्या मधल्या भागात नाहीच. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या प्रत्येक क्षण सोबत वगैरे राहू. पण त्या क्षणांच्या मधल्या गॅपमध्ये पुन्हा सगळे भयंकर एकटेच. जाऊ दे पण, उगाच च्यायला तत्त्वज्ञान वगैरे.

तर मुद्दा हा की, माझ्याही नकळत मग मी ती गाणी गुणगुणायलाही लागतो.
हाहाहेहेहंहूहू.. डाडाडेडेडंडूडू... गागागेगेगंगूगू... -- शी च्यायला, चुत्येगिरी नुसती
--
अर्थात त्यातली बरीचशी गाणी मी सवयीनेच गुणगुणतो. उदाहरणार्थ सकाळी कुंथत बसलेलं असताना मला ‘हे भलते अवघड असते’ या गाण्याशिवाय प्रेशरच येत नाही आणि मग आपोआप मागे गुणगुण सुरु होते –
हे भलते अवघड असते..
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहिसे लांब होताना...

डोळे पाणावतात एकदम. च्यायला संदीप खरे ग्रेट आहे. याच्यामुळे सकाळची एक सिगरेट कमी झाली. आता त्या प्रमाणात माझं आयुष्य वाढणार. तर मग ही सिगरेट कम्पेनसेट करायला आता मध्यरात्री वगैरे उठलं पाहिजे. तर त्याआधी झोपायलाही हवं. तर असो.

आता मी टी.व्ही. बघतोय आणि त्यात वर्षभरापूर्वीच्या योगासनं, मोदी, मुस्लिम वगैरे चोथा झालेल्या विषयावर परत चर्चा चालुये. म्हणजे मुस्लीमान्कडच्या लोकांचा याला विरोध, कॉंग्रेसकल्यांचा त्यांच्या विरोधाला सपोर्ट, डाव्यांकडून मोदी कंपनीचा निषेध आणि भाजपाकडल्यांचा यांच्या विरोधाला आणि त्याहून त्यांच्या सपोर्टला कडाडून वगैरे विरोध. चुत्येगिरी नुसती. च्यायला जाऊ दे पण, उगाच राजकारण वगैरे. 

तर मुद्दा हा की टी.व्ही. चालू असतानाही मला उगाच गाणी ऐकू येतात – गोली मार भेजेमें वगैरे. गुलजार च्यायला. हा माणूस भन्नाट आहे. हा माणूस आपला बराच वेळ फुकट घालवतो. म्हणजे याला मानला पाहिजे. कसलं लिहितो साला-

याद है, एक दिन
मेरे मेज पे बैठे-बैठे
सिगरेट की डिबिया पर तुमने
छोटे-से इस पौधे का
एक स्केच बनाया था!

आकर देखो,
उस पौधे पर फूल आया है!

हाय गुलजार! हे असं लिहिणारा माणूस गोली मार भेजेंमें पण लिहू शकतो हे खरंच थोर आहे. हे जमायला हवं. काय जमायला हवं? गोळी मारायला कि गाणं लिहायला? दोन्ही अशक्यच—असो. 

मुद्दा काय तर सिगरेट आणि गुलजार हे कॉंबिनेशन अफलातून आहे. संध्याकाळी मी कधी चुकून मरीन लाईन्सला गेलो आणि चुकुनच सिगरेट मारायला लागलो की छातीच्या भयंकर जोरात ठोक्यामधून हे गाणं धडधडत राहातं –

दिल में कुछ जलता है, शायद धुआँ धुआँ सा लगता है
आँख में कुछ चुभता है
, शायद सपना कोई सुलगता है
दिल फूँको और इतना फूँको
, दर्द निकल जाए
इतना लंबा कश लो यारों, दम निकल जाए-------

प्रिय गुलजार, खरंच होऊ शकतं का असं? जाऊ देत च्यायला. तबू कसली दिसते पण या गाण्यात. ती तर अजून पण क्लासच दिसते. त्यात आता भरलीये पण कमालीची. तर असो.

हा गाणी ऐकू येण्याचा प्रकार केव्हा चालू झाला नक्की आठवत नाही. पण बहुतेक मी १०वीला असताना असावा. तेव्हा शाळेत संध्याकाळच्या वेळी almost रोज अदनान सामीचं ‘कभी तो नजर मिलाओ’ गाणं खिडकीतून ऐकू यायचं – कसलं तूफान आवडायचं मला तेव्हा ते. असं वाटायचं हे गाणं माझ्यासाठीच लिहिलंय – म्हणजे ते जो नही कहा है कभी तो समझ भी जाओ वगैरे. असो पण. शाळा कॉलेजमध्ये आपण कसे होतो वगैरे डोक्यात आलं की उगाच nostalgic वगैरे व्हायला होतं.

नंतर १२वीला असताना गुरुदत्तचा प्यासा पाहिला आणि “ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है” हे इतकं भयंकर आत रुतलं की कुठल्याही प्रसंगी, विशेष करून लोकांच्या मते आनंदाच्या वगैरे प्रसंगी हमखास हे गाणं चालू होतं बॅकग्राऊंडला. गुरुदत्त मागे उभा राहून शाल घेऊन, दोन्ही हात पसरून ओरडत असतो पण कोणाला काही नसतं त्याचं.शेवटी तोच कंटाळून जातो. 

या पिक्चरच्या शेवटी गुरुदत्त वहिदाला घेऊन कुठे तरी दूर निघून जातो. मला ही जागा बघायचीय च्यायला. या जागेचा पत्ता सापडायला हवा यार. सापडेलही कधीतरी.. पण मी कोणासोबत जाणार? किंवा माझ्यासोबत कोण येणार?फारफार तर सिनेमा, समुद्र किंवा एखादा ट्रेक अशा भंपक ठिकाणी येईलही कोणी, पण या असल्या ठिकाणी कोण मरायला येइल? गुरुदत्त you are a lucky man यार...

नंतर असंच एकदा रेडीओवर नूर जहानचं गाणं ऐकलं –

लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजे
अब भी दिलकश है तेरा हुस्न मगर क्या कीजे
और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा
मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना मांग 

आयचा घो त्या फैजच्या! (फैज की फैझ?) हे गाणं कुणीही वयाच्या १८व्या वर्षी ऐकू नये. निघता निघत नाही डोक्यातून(की डोळ्यातून). भेन्चोद – फैज डिझर्व करतो साला ही शिवी – तेव्हापासून ते आतापर्यंत मी फैज आणि नूर जहान दोघांच्याही वेड्यासारखा प्रेमात पडतो अधूनमधून...

मी कधी जरा बऱ्या मूडात असलो की कुमार गंधर्व बॅकग्राऊंडला चालू होतात. कुमार आणि अनिल हे भन्नाट कॉकटेल आहे. ट्रेनमधून जाताना कधी विंडोसीट मिळाली की मागे कुमारांचं गाणं चालू होतं ‘उड जायेगा...’ वगैरे. 

हे हे विंडोसीट मिळणं म्हणजे पण आनंदाचाच क्षण. आणि तसंही मला प्रवास करताना खिडकीपाशी बसायला फार आवडतं. इन्फॅक्ट कॉलेजला असताना मी वर्गातल्या एका मुलीच्या चक्क प्रेमात पडलो होतो काही दिवस, तिने स्वत:हून मला खिडकीपाशी बसायला दिलेलं म्हणून. तर असो. 

मुद्दा काय तर एक फुफ्फुस घेऊन, कुमार तुटक तुटक असं जे गातात ते इतर कोणाहीपेक्षा खूप जवळचं वाटतं. तसंही मला तुटक तुटक, अपूर्ण गोष्टीचंच भारी वेडय पहिल्यापासून. तर रेल्वेच्या खिडकीच्या जाळीमधून दिसणारी तुटक तुटक झाडं, इमारती, पोस्टर्स पाहिले की अपोआप कुमारांची गुणगुण सुरु होते. ट्रेनच्या खिडकीतून मग माझं  जगदर्शन चालू होतं.. तर आता हे लिहिताना माझ्या लक्षात आलं की माझ्या लायब्ररीतल्या खिडक्यानाही अशा जाळ्या लावल्यायेत नि त्यातून समोरची इमारत, फौंटनचा रस्ता, त्यावरची माणसं आणि निळंपांढरं आकाश तुटक तुटक दिसतं. तर कोणी म्हणेल त्यात काय एवढं? ते तर संडासच्या खिडकीतून पण दिसतं. तर खरच्ये ते.

हां पण समजा ट्रेन पूर्ण रिकामी असेल तर मात्र मी दरवाज्याशी उभा राहतो. एका हाताने दांडी पकडून दुसऱ्या हाताच्या बोटांनी मी ट्रेनचा दरवाजा वाजवत सुटतो आणि मग फार भयानक गाणी वाजत राहतात. म्हणजे माझं कराओके आणि गाणारे मेहदी हसन, बेगम अख्तर, रफी, तलत, मुकेश, लता, किशोर,सोनू, कुमार सानू वगैरेपैकी कोणीही किंवा सगळेच.

जनरली हा प्रकार रंजिश ही सही पासून सुरु होतो. पुरेशी स्टेशन्स मागे पडली की मग बेगम अख्तर चालू होते –

आप को प्यार है मुझ से के नहीं है मुझ से
जाने क्यों ऐसे सवालात ने दिल तोड़ दिया

हे गाणं १०-१२ वेळा तरी रिपीट मोडवर चालू राहातं आणि त्याच्या अधेमधे मग इतर गाणी. अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का वगैरे.

जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता था.. हे गाणं आलं की मात्र बाकी गाणी बंद. रिस्पेक्ट एकदम. च्यायला नुकताच एका मित्राच्या लग्नाला गेलेलो, तर त्याच्या वरातीत हे गाणं वाजवत होते. आणि वर लोक त्यावर नाचत पण होते. लोक येडझवे असतात. त्यातही लग्नांमध्ये घोड्याच्या आजूबाजूला नाचणारे तर आणखीनच च्यायला. हेहे गुगल सजेशन मध्ये येडझवे दाखवतंय हे बेस्ट आहे. असो.

लता मात्र एकदा आली की डोळ्यातून एखादा तरी थेंब निपटून काढतेच. लताचं तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा हे चालू झालं की बंदच होत नाही काही केल्या. इन्फीनाईट मोडवर चालूच राहातं. खास करून ट्रेकला वगैरे गेलो आणि उगाच खूप साऱ्या पायवाटा वगैरे दिसल्या की लता गुणगुणू लागते

इन रेशमी राहो में, एक राह तो वो होगी
तुम तक जो पहुचती है, इस मोड़ से जाती है...

च्यायला परत गुलजार.
गुलजार एके गुलजार.
गुलजार दुणे गुलजार.
गुलजार रेस टू गुलजार.
गुलजार रेस टू इन्फीनीटी.
हा व्यापून राहिलाय सगळं.

तू मुंबई सोडताना फोन केला होतास माझं पॅब्लो नेरुदाचं पुस्तक तुझ्याकडे राहिलंय म्हणून. तेव्हा या गुलजारने केवढं छळलं होतं मला. काय तर म्हणे

एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गीले, सूखा तो मैं ले आई थी
गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो--------

जाऊ देत. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है? निरोपाच्या प्रसंगांबद्दल मला फार बोलायला आवडत नाही. पण का माहित नाही पण निरोपाच्या कुठल्याही प्रसंगी मला गीता दत्तचं एक गाणं कायम विळखा घालून बसतं—

मुझे जाँ ना कहो मेरी जाँ
मेरी जाँ, मेरी जाँ

जाँ ना कहो अनजान मुझे
जान कहा रहती है सदा
अनजाने क्या जाने, जान के जाए कौन भला

मला पूर्वी याचा अर्थ कळायचाच नाही. म्हणजे साधारणतः २५व्या वर्षी माणूस जितका बावळट(म्हणजे चुत्या) असतो त्यापेक्षा मी जरा जास्तच बावळट(म्हणजे चुत्या) होतो म्हणूनही असेल. पण जेव्हा या गाण्याचा अर्थ कळला, तेव्हा हे गाणं अगदी अंगावर आलं. त्यातल्या अर्थासकट. पण असो. निरोपाविषयी फार बोलू नये माणसानं...

समुद्राला लागून असलेल्या गल्ल्यांमधून निरुद्देश भटकत राहाणं हा प्रकार मला फार आवडतो. निरुद्देश. कसला भारी शब्दये हा. भारी. हेहे. तर मुद्दा हा की अशा वेळी हमखास किशोर- आर.डी.ची गाणी आठवू लागतात. प्यार हमें किस मोड पे ले आया वगैरे. आर.डी. बाप आहे च्यायला. किंवा मग

हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके
झिंगालाला हू.. झिंगालाला हू.. हुर्र हुर्र----
झिंगालाला... च्यायला.. इसको लागा डाला तो लाईफ झिंगालाला...
झिंग. झिंगाट. झिंगालाला.
झिंगालालाच बेस्टये एकदम.

तर मुद्दा हा की या गल्ल्यांमध्ये केवढी शांतता असते. समुद्रावर नसते ती जनरली. समुद्रावर उगाच कारण नसताना पळणारे लोक, हॉर्नचे आवाज, एकमेकांना चिकटलेली जोडपी, येणाऱ्याजाणाऱ्यांकडे बघत बसणारी रिकामटेकडी माणसं, लाटा आणि लाटांवर निरंतर चालत राहणारी भिकारचोट गाणी – आणि भिकारचोट आठवणीसुद्धा—

च्यायला आठवणींवरून आठवलं बाल्झॅक म्हणतो True love rules especially through memory.
च्यायला, म्हणजे रोजचा हस्तमैथुन हे पण खरं प्रेमच तर – आयचा घो या लेखकांच्या—काय तरी आपलं लिहून ठेवतात. असो पण.

तर मी आता हस्तमैथुन करताना कुठलं गाणं ऐकू येतं हे आठवायचा प्रयत्न करतोय पण काहीच आठवत नाहीये.
येस. आठवलं. ते फरीदा खानुमचं---
आज जाने की जिद ना करो....

च्यायला. कोणाचं काय तर कोणाचं काय.. कुणी म्हणेल की काय चुत्येगिरी आहे? पण हे फॅक्ट आहे. पिक्चरमधेपण एखादा सेक्स सीन चालू असेल तर हे गाणं वाजू लागतं बॅकग्राऊंडला माझ्या.असो पण. 

तुम्ही जर इथपर्यंत वाचत आला असाल तर तुम्ही थोर आहात यात शंका नाही. किंवा मग तुमच्याकडे फुकट घालवायला चिक्कार वेळ असणार हे नक्की.

तर मला बऱ्याचदा एखादा पिक्चर पाहिला की एकदम डिप्रेशन येतं. उदाहरणार्थ मध्ये बऱ्याच वर्षांनी रजनीगंधा पाहिला. अमोल पालेकरचा. इंजिनीअरिंगला असताना एकदा पाहिलेला, पण तेव्हा कळला नव्हता. आता परत पाहिला तर फारच उदास वाटू लागलं. म्हणजे हे असं सगळ्यांचंच होतं का? पहिलं प्रेम ही काय भयंकर गोष्ट असते ना? ओके आय शुड राइट पहिलं ‘सिरीअस’ प्रेम. असो तर तेव्हापासून मग कुठलाही भिकार प्रेमपट पाहिला की त्यातलं ते गाणं नेहमी रेंगाळत राहतं

कई बार यूँ भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है, मन तोड़ने लगता है
अन्जानी प्यास के पीछे, अन्जानी आस के पीछे, मन दौड़ने लगता है

-- म्हणजे पुन्हा पुन्हा आपण हातचं सोडून पुन्हा त्याच त्याच गोष्टींच्या मागे का धावत सुटतो? Psychology नक्कीच काही तरी टर्म असणार याला. तर असो. त्याने काय फरक पडतो.

पण ही मागे चालणारी अखंड गाणी किंवा अखंड चालणारी गाणी किंवा अखंड गाणी – चालणारी – होय हे शेवटचं जास्त भिकार वाटतंय, हेच चांगलंय; हं तर अखंड गाणी – चालणारी – हैराण करून सोडतात हे मात्र खरं. खास करून झोपताना रफी, मुकेश वगैरे जीवावर उठतात. डोळे बंद केले तरी मुकेश ओरडत बसतो- आंसू भरी है ये जीवन की राहें वगैरे किंवा

तेरे प्यार को इस तरह से भुलाना
ना दिल चाहता है, ना हम चाहते है किंवा

मधेच गिरिजादेवीचं किन संग प्रीत लगाये...
च्यायला हे गाणं चालू झालं की झोपेचं खोबरं.

किंवा त्याहून भयंकर म्हणजे ते ईश्कियातलं –
डर लगता है तनहा सोने में जी

किंवा... किंवा... किंवा..

तर मुद्दा काय गाणी प्रचंड आहेत. वेळ पण प्रचंड असतोच. तो असा नाही तर तसा आपण फुकट घालवतोच. पण त्यात बॅकग्राऊंडला अशी गाणी असली की तो फार हळूहळू फुकट जातो. एकदम भसकन नाही जात.
टागोर म्हणतात — Music fills the infinite between two souls.

मला वाटतं ही गाणी माझ्यातालीच पोकळी भरून काढतात आणि मग त्याहून मोठी पोकळी निर्माण करतात. 
तर एकूण काय – हे सगळं पोकळच--

पूर्वी होती शुद्ध केवढी हवा वगैरे...

पूर्वी होती शुद्ध केवढी हवा वगैरे
श्वास रोजचा जाणवायचा नवा वगैरे

दुखरी बाजू समोर येइल तेव्हा येइल
तोवर कसला नकोच बागुलबुवा वगैरे

नात्यांमध्ये कुठून येइल ओलावा या
हवेतसुद्धा नाही जर गारवा वगैरे

जमिनीवरती धरणे बांधुन पुष्कळ झाली
खोद एकदा हृदयातुन कालवा वगैरे

म्हणूनही ती सोडून गेली असेल बहुधा
आवडायचा त्याला पक्ष्यांचा थवा वगैरे

जाता जाता आपल्यात जे घडले त्याचा
कधी वाटतो किळस, तर कधी दुवा वगैरे

कुणाकुणाला रोज नवनवे सूर लागती
कुणास पुरतो जीवनभर मारवा वगैरे


२७ मे, २०१६.

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!