Monday, April 23, 2018

कोल्ड कंफर्ट


३ महिन्यांपूर्वी savage detectives म्हणून पुस्तक वाचलेलं. का माहित नाही पण तेव्हापासून त्यातलं एक वाक्य सतत मेंदूच्या एका कोपऱ्यात लोळत पडलेलं होतं. या कुशीवरून त्या कुशीवर करत. अस्वस्थपणे.  
Being alone makes us stronger. That’s the honest truth. But its cold comfort, since even if I wanted company no one will come near me anymore.
आणि आज सकाळपासून च्यायला किक बसावी सारखी तसं हे वाक्य सारखं धडकतंय. उलटसुलट सगळ्या मेंदूतून फिरतंय. कसं थांबवावं? काय करावं? काही तरी निरुपद्रवी वाचत बसावं का? की लिहीत सुटावं इन जनरल दाखवू शकत असलेल्या दु:खांवर. दाखवू शकत असलेली दु:खं. च्यायला लिहिताना पण गांडूपण सुटत नाही काही केल्या. नखशिखांत नागडं होऊन लिहायला केव्हा जमणार काय माहित.

वयापलीकडे विचार जात नाहीत
आणि विचारांपलीकडे इच्छा
तोवर सगळं ठीक
ते नाही जमलं की मग अशक्य लागते
कारण इच्छांच्या सभोवताली
निमुळत्या होत जाणाऱ्या
दऱ्या असतात
खोल
आणि इच्छांचं टोक ताठ होऊन
टोचत सुटलं
की कोसळणं आलंच
मग कुठल्या तरी दगडावर आपटून
भळभळणं पण अटळ च्यायला
जोवर येतोय तोल सांभाळता
तोवर करावा प्रयत्न
आपला आपण
अर्थात तरी प्रयत्नांती दगडच
हे लक्षात आलं
ना
की मग फैजला बाजूला काढून टाकावं डोक्यातून
राहते और भी है वस्ल की राहत के सिवा
हे खरं असेलही
पण ते कोसळायच्या आधी आणि नंतर
कोसळतानाची राहत ही वेगळीच
हव्या त्या ठिकाणी असेल तर अजून वेगळी
बाकी सगळीकडे फक्त
कोल्ड कंफर्ट

हे असं वाक्य मधेच तोडून, क्रियापदं मध्ये वगैरे टाकून दोन-तीन ओळीत लिहिली की कविता वगैरे लिहिलीय असं वाटू शकतं कुणाला. पण नाहीये ही कविता. कविता लिहून जमाना झाला च्यायला. आता फक्त तुकडे. वाक्यांचे, शब्दांचे, अक्षरांचे आणि अर्थांचे पण.

कुणी निराळा म्हणतात कुणी विक्षिप्त
रे कसे व्हायचे कोणापाशी व्यक्त
आयुष्याला ना कुठे परिघ ना व्यास
नुसताच घ्यायचा सोडायाचा श्वास
हा एक फुफ्फुसाच्या आत रुतून बसलेला फार फार जुना तुकडा. आणि असे अनेक आणखी. असंख्य तुकडे.  
तरी हे तुकडे बरेच. तुकड्या तुकड्यांनी भेटणारी माणसं मात्र या तुकड्यांपेक्षा जास्त वाईट. आनंद तर नाहीच. उलट आणखी नवीन तुकड्यांची भर. कोल्ड कंफर्ट च्यायला.

जाऊ दे. बेगम अख्तर गुणगुणायला लागलीये आता बॅकग्राऊंडला.
ये देखना है सुकूँ अब कहाँ से मिलता है
मिळेल तेव्हा मिळेल. तोपर्यंत तुकड्या तुकड्यांनाच आपलं म्हणत रहायचं.

Tuesday, February 27, 2018

कारण मला नाही फरक पडत...



तू काहीही बोललीस
कसंही वागवलंस
चिडलीस, रागावलीस,
तर जरूर येईल
मलाही राग थोडा अधिक
पण तरी मी राहणारेय तुझ्याच सोबत
कारण मला नाही फरक पडत...


तू रडून रडून रात्रभर
जागत बसलीस तर
सुजून जातील तुझेच डोळे
मी काही पुसणार बिसणार नाही
मी फक्त बसेन तुझ्या शेजारी
रात्रभर रेडीओवर गाणी ऐकत
कारण मला नाही फरक पडत...


तुला घ्यायची असतिल औषधं
तर वेळेवर तुला ती द्यायची
जबाबदारी माझी
आणि समजा नसतील घ्यायची
तर नको घेऊस
राहा तशीच हट्टाने
त्यालाही नसेल माझी हरकत
कारण मला नाही फरक पडत...


मला पक्कं ठाऊकये की
तुझ्या डिप्रेशनपेक्षाही
मीच आहे जास्त कणखर
सो मी असणारच आहे, नेहमी
डिप्रेशन मात्र जाईल आज-उद्या
तुला एकटीलाच टाकून
सो मला नाही काळजी वगैरे वाटत
कारण मला नाही फरक पडत...


माझा एक मित्र म्हणतो
There are always more people
who love you than you can count
सो तुला एकटं वाटत असेल ना
तर काळजी नको
तुला फक्त माणसांना मोजायचंय परत
आणि मला नाही मोजलंस ना
तरी मी काही येणार नाहीये रडतबिडत
कारण मला नाही फरक पडत...

Wednesday, December 20, 2017

Blankest Year

आज काहीतरी शोधताना जुनी डायरी सापडली. त्यात शेवटून दुसऱ्या पानावर ही कविता. कविता नाही फक्त ट ला ट.
Hunger Lining

आलिशान हॉटेलात बसून
welfare economics च्या
चर्चा करणारी मंडळी
acidity होईल म्हणून
ताटातलं अर्ध अन्न
तसंच शिल्लक ठेवतात...

आणि hunger indexच्या
आकडेवारीच्या कागदावर
कालचा शिळा भात आणि
उरलेली डाळ कालवत
रस्त्यावरची अर्धपोटी पोरं
आनंदाने जेवतात...
३० डिसेंबर,२०११

तेव्हा नुकतंच लाल शाईचं फौंटन पेन घेतलं होतं, त्याने लिहिलेली. तेव्हा काही महिने फार वापरली लाल शाई. आता काळी किंवा निळीच वापरतो. अर्थात कुठल्याच रंगाने तसा काही फार फरक पडत नाही. अक्षर जसं यायचं तसंच येतं. विचार मात्र बदलू शकतात कदाचित. असो. त्यावेळेस कुठलं तरी poverty वरचं पुस्तक वाचलेलं, म्हणून लिहिली असावी. कुठलं पुस्तक तेही आता आठवत नाही च्यायला. तसंही पुस्तकाच्या पानांमधून गरिबी समजून घेणं ही चुत्येगिरीच. आणि त्यावरून ट ला ट जुळवत बसणं ही आणखीन मोठी चुत्येगिरी. असो.

नुकतंच एक मैत्रीण म्हणाली तू इतक्या शिव्या देत जाऊ नकोस, फार बरं नाही दिसत ते म्हणून. तर मी म्हटलं बरं. पण खरं तर तिने असं म्हटल्यावर एकदम हुतुतूतले आदी(सुनील शेट्टी) आणि पन्ना(तबू) आठवले.
आदी – गाली मत दिया कर यार. तेरे मूंह से अच्छी नही लगती.
पन्ना – क्यों किस करता है तो बास आती है क्या?
       ... तो तू सिगरेट छोड दे.
आदी - ... अच्छा एक बात बता ये सिगरेट पेहले आयी या करप्शन?
पन्ना – सिगरेट.
आदी – कैसे?
पन्ना – सिगरेट में नशा है. नशेमें power है. Power में करप्शन.
च्यायला हे खरं लॉजिक. नाहीतर mathsमध्ये शिकवतात ती नुसती भंकस.
तिला विचारणार होतो तू हुतुतू पाहीलायस का? पण म्हटलं जाऊ देत च्यायला. नसेल पाहिला तर बरंच आहे. असले उदास करणारे सिनेमे खरं तर सेन्सॉर बोर्डाने येऊच नाही दिले पाहिजेत. पण आपलं सेन्सॉर बोर्ड येडझवं आहे. छान इंद्रियं चाळवणारे सिनेमे नको तेवढं कापतं आणि असले उदास करणारे सिनेमे मात्र येऊ देतं.

च्यायला परत शिवी! मी आता एक नियम बनवणारेय की किमान १० वाक्यांच्या मध्ये एकही शिवी लिहायची नाही. मग हे जमलं की २० वाक्यं. मग ३०.. ५०.. १००.. १०००.. १००००.. १ लाख.. १ कोटी.. १ अब्ज..
भेन्च्योद. इतकं कोण लिहिणार?

पण हुतुतूतला आदीचा एक dialogue मात्र मला फार आणि केव्हाही आठवत राहतो.
‘इन हंडीयो में सवाल बहोत उबलते है. ठीक कहते है वो, इस जनरेशन के पास सवाल बहोत है, जवाब कोई नही. जियो तो इस जहर भरे, करप्शन भरे माहोल में या फिर मर जाओ. साफ सुधरी हवा खाने के लिए जाएंगे भी तो कहा? पैसा, रुपया, आराम – आराम है मुझे? मेरा तो दम घुट रहा है. बस जी रहा हूं. जैसे कोई वक्त पुरा कर रहा हूं --- ’

च्यायला प्रत्येक वर्ष संपताना ही जाणीव अधिकाधिक तीव्र का होत जाते? कुठेही असलो, कुणाबरोबरही असलो तरी डोक्यात हेच..
बस जी रहा हूं. जैसे कोई वक्त पुरा कर रहा हूं ---

जाऊ देत पण हा विषय. जाऊच दे च्यायला---
विषय. वर्ष. आणि विष.
तिन्हीत व आणि पोटफोड्या ष कॉमन. आणि तीनही पचवणं जाम जाम अवघड.
तर विषय त्यातल्या त्यात बरा. कारण तो बदलता तरी येतो. वर्ष तर बदलत राहतातच. नकळत. आणि विष बदलून काय उपयोग? असो.

डायरीच्या सुरुवातीला ग्रेसच्या चंद्रमाधवीचे प्रदेश मधल्या कविता लिहिलेल्या. तेव्हा लायब्ररी लावलेली आणि दर महिन्याला पैसे लागतात म्हणून केवढी तरी पुस्तकं वाचायचो. आवडलं काही की जागून डायरीत उतरवून काढायचो. आता पुस्तकं विकत घेतो आणि कपाटात ठेवून देतो. तर ही फालतुगिरीच. तर त्यात ही कविता सापडली –
जे सोसत नाही असले
तू दु:ख मला का द्यावे
परदेशी अपुल्याघरचे
माणूस जसे भेटावे
मिटल्यावर डोळे मजला
स्मरतात निरंतर नाद
हाकांना मागावे का
त्यांचेच जुने पडसाद?

पडवीच्या देखाव्यातून
दिसतात मनाचे खांब
क्षितिजाच्या जवळी जाता
ते पुन्हा पसरते लांब ---
फार फार फार भयंकर कविता आहे ही. ऐकली की कुठे तरी भलतीकडेच नेऊन सोडते. भलतीकडे तरी ओळखीच्या ठिकाणी. जिथे बाजूला समुद्र वगैरे असतो. बेक्कार खवळलेला. लाटांचा आवाज. एखाद्या ओळखीच्या लयीत. आणि मग समोर तू.
आता अचानक भेटलोच आहोत तर थोडे मनसोक्त तरी भेटू.

थोडे आणि मनसोक्त? तस्साच आहेस बघ अजून.

दाढी वाढलीये ना पण.

उपयोग काय त्याचा. दाढी नाही, दाढ वाढायला हवी. अक्कल दाढ.

आलीये हां तीसुद्धा. बरीच वर्षं झाली आता.

(समुद्राकडे पाठ करून) हो बरीच वर्षं झाली. केवढा बारीक झालायस आणि. नीट जेवत जा बघू. आणि पुस्तकं थोडी कमी वाचत जा किंवा बेस्ट म्हणजे वाचूच नकोस. वर्षभर तरी.”

“हो.”

“समुद्राकडे नाही, माझ्याकडे बघून सांग.”

“हो गं.”

“आणि लिहितोस का अजूनही?

हो थोडं फार. आणि तू?

नाही.

का?
-----
बस्स. इतकंच.
मग पुन्हा लाटांचा आवाज. प्रचंड. फार फार जीवघेण्या लयीत.
च्यायला अर्धवट राहिलेल्या भेटी फार फार छळतात. स्वप्नातल्यासुद्धा! असो.

एक दिवस ना मी NCPAवरून समुद्राच्या कडेकडेने चालत जायचं ठरवलंय. बघू तू भेटतेयस का ते...

तुझ्यात अरण्य, मला सापडावे
माझे मीच व्हावे, अश्वत्थामा |
फिरताना आणि होता तुझी भेट
हृदयात थेट, जावी कळ |

जाऊ देत च्यायला. When you have finished with others, that is my time.
मी आता शहाण्या मुला सारखा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसणारे.. मरेपर्यंत!
च्यायला मरेपर्यंत काय?
तर मी हे लिहिणार नव्हतो. म्हणजे असं काही मी कधी बोलतसुद्धा नाही. पण ते नुकतीच अमृता आणि इमरोझची पत्रं वाचतोय म्हणून इतकं पाणचट लिहिलं असावं. तरी बरं ग्रेस एवढाच कळतो ते. अज्ञानात सुख असतं(?) असं म्हणतातसुद्धा. असो.

त्यापुढे मग पाब्लो नेरुदाची एक कविता.
I can write the saddest lines tonight
I loved her, she loved me too.

मला का माहीत नाही पण नेहमी या ओळींबरोबर १९८४ मधल्या पण ओळी आठवतात
Under a spreading chestnut tree
I sold you, you sold me.

आणि मग कमालीची उदास होते. मग उगाच जुनं सगळं चालू होतं डोक्यात. असं झालं असतं तर किंवा, तसं झालं असतं तर वगैरे. मग ते पण लक्षात कोण घेतोच्या शेवटी असलेलं वाक्य
Of all sad words of tongue or pen,the saddest are these, 'It might have been.म्हणून मला तुझा पाब्लो आवडत नाही. तो वाचल्यावर अपोआप लिहिल्या जातात saddest lines.

पण मग कधी कधी वाटतं की हे असं लिहिणं हे खरं तर तितकंसं वाईट नाहीये. इतर कुणाला वाटत असेल काय काय. पण मला मात्र आवडतं हे. कदाचित हे मीच माझी माझी समजूत घालणंही असेल. पण तरी त्यानिमित्ताने तुझी आठवण येत राहते. मी जगत असतो पुन्हा पुन्हा तुला. भेटत असतो तुला. बोलत असतो तुझ्याशी. 

एक मित्र म्हणाला मध्ये, तू विपश्यनेंला जा म्हणून. विपश्यना का करतात माणसं? विचार घालवायला? छे मला हाच विचार सहन नाही होत. मला तुझा विचार करून कंटाळा किंवा डिप्रेशन नाही येत. I dont feel hurt when I think of you. उलट खूप मस्त वाटतं. तू मला केवढ्या गोष्टी शिकवल्यास. प्रेम ओळखायला, प्रेम करायला. सर्वांवर. स्वत:वर सर्वात जास्त. तू भेटण्याआधी केवढे न्यूनगंड होते माझे माझे. तुझ्या सोबत राहिल्यावर सगळे गळून पडले एक एक करून. आता परतलेत बरेच. पण तरी मी प्रेम करणं नाही थांबवलं. कुणाशीही बोलताना, भेटताना मी शोधत बसतो तुला. कुणाची हनुवटी, कुणाचे केस, कुणाचा स्वभाव, कुणाचं बोलणं आणि काय काय. तुझी जराशी जरी झलक सापडली की मी प्रेमात पडतो त्यांच्याही. म्हणजे खरं तर तुझ्याच. पुन्हा. नव्याने. सोसलेला, पाहिलेला, जगलेला सगळा कडवटपणा नाहीसा होऊन जातो मग. तुला अमृता आवडायची ना. मला फक्त तिच्या या ओळी आवडतात. मनापासून.

नजर के आसमान से
सुरज कहीं दूर चला गया
पर अब भी चांद में
उसकी खुशबू आ रही है

तेरे इश्क की एक बूंद
इस में मिल गई थी
इस लिए मैने उम्र की
सारी कडवाहट पी ली...

किरण नगरकरांची मध्ये एक मुलाखत वाचली. त्यात ते म्हणतात, एखादी व्यक्ती बेपत्ता झाली म्हणून आपण तिच्याशी बोलणं थोडंच थांबवतो? कित्ती खरंय हे. मला हे वाचून तुझी इतकी आठवण आली म्हणून सांगू. मी आजही तुझ्याशी इतकं बोलत असतो. सतत. आणि आता फोनच्या बिलाची काळजीसुद्धा नाही करावी लागत. तुला आठवतंय आपण अगदी सुरुवाती सुरुवातीला भेटलेलो आणि मिसळ खायला म्हणून एका टेबलवर बसलो होतो. कॅंटीनमध्ये. तू माझाच चमचा घेतलास. आणि मी अजून एक चमचा घेऊन आलो तू उष्टा केलास म्हणून. म्याड होतो न मी केवढा. नंतर २ महिन्यातच तुझ्या रूमवर आपण मॅगी खाल्लेली. एकाच टोपात. बोटांनी. एकमेकांच्या. मी दिवसभर उपाशी असलो आणि रात्री तरीही जेवणाचा कंटाळा आला की अजूनही करतो मॅगी. आणि तसच बोटानीच खातो. पोट भरत नाही. पण मन भरून जातं एकदम.
तुला शाहीद कपूर आवडायचा म्हणून मी मॅडसारखा आजसुद्धा त्याचा प्रत्येक चित्रपट बघतो. मला तो मुळीच आवडत नसूनही. फर्स्ट डे, फर्स्ट शो. दोन तिकिटं काढून!

 परवा इराण्याच्या हॉटेलात मैत्रिणीसोबत बसलेलो असताना, तिच्या हातावर एकदम लांबलचक मेंदी पाहिली आणि उगाच तुझी आठवण आली. भयंकर. मग तिच्याशी बोलताना अख्खा वेळ बॅकग्राऊंडला ही कविता.
तू डोके मांडीवरती
ठेवून दीर्घ बिलगावे
अन् खोल अंतराळात
ध्रुवाचे तुकडे व्हावे

तुकड्यांना जमवित असता
बुबुळांत शिरावी नीज
अडकावा चंद्र गळ्याशी
हृदयात भरावी वीज

वीजेने तुटला थेंब
पसरावा फरशीवरती
मेंदीभरल्या बोटांनी
रोखावी नकळत भरती

भरतीच्या वेळी तूही
लाटांचा घेत निरोप
दारातिल उचलुन न्यावे
तुळशीचे हिरवे रोप...
मला ही कविता कित्ती आवडते तुला माहितीये. लोकांना उगाच उदासवाणी वगैरे वाटते. मला नाही वाटत तसं. तुला आठवतंय आपण एकदा रात्री बसने जात होतो, थंडीच्या दिवसात. आणि तू माझं जॅकेट घातलं होतंस. मी इतकी वर्षं झाली तरी अजून वापरतो ते. विरलंय आता थोडं. बाईकवरून जाताना रात्रीचा गार वारा हळूच शिरत राहतो सारखा त्यातून. पण तरीही मला अगदी मस्त वाटत राहतं. उबदार एकदम. आठवणींमध्ये केवढी ऊब असते ना... त्यांचा त्रास कसा होईल?

Infact तुझी आठवण मला शांत करते, माणसांत परत आणते. तुझ्या विचारांचा त्रास नाही होत. बघ तुझा उल्लेख आल्यापासून एकही शिवी नाही लिहिली इथे. कदाचित इतकी वर्षं झालीत म्हणून असेल किंवा कदाचित मी बऱ्यापैकी mature वगैरे झालो असेन(!) आता म्हणूनही. पण आठवणीचा त्रास नाही होत. त्रास जे पुढ्यात वाढलंय ना त्याचा होतो. नाही पचत. नाही रुचत. बदलताही येत नाही. म्हणून सगळा त्रास. त्यात मला ही अशी दिवस दिवस उपाशी राहायची सवय. कितीही अजीर्ण झालं, नॉशिअस वाटलं तरी पुढ्यात जे वाढलंय ते संपवायचंच. हा च आवडत नाही बघ मला. हे असं जबरदस्तीने ताट संपवणं मी लहानपणीसुद्धा केलं नव्हतं. मागे ८वीत असताना एका मित्राच्या घरी गेलेलो, तर त्याच्या बाबांनी पुढ्यातला चिवडा नको म्हटलं तरी संपवायला लावला होता. तेव्हापासून मी त्याच्या घरी परत गेलोच नाही. पण इथे तसं नाही करता येत, म्हणून मग त्रास.

च्यायला, हे पुढ्यात वाढलेलं ताट संपवण्याला पर्याय नाही. नाहीच मुळी. मग तुम्ही विपश्यनेला जा, देवळात-मशिदीत-चर्चमध्ये जा, कीर्तन करा, पोथ्या वाचा, पुस्तकं वाचा, कविता लिहा, नाटकाला, सिनेमाला जा, समुद्रावर जा, पर्वतांवर जा, माणसांत फिरा, नाहीतर गुहांमध्ये राहा, मरेपर्यंत काम करा किंवा रीकामचोट पडून राहा, लग्न करा/करू नका, पोरं काढा/काढू नका, संन्यास घ्या, प्रेम करा, लफडी करा, सेक्स करा, हस्तमैथुन करा, दारू प्या, सिगरेट ओढा, जॉइंट मारा, कामाठीपुऱ्यात जा, पोरींसोबत झोपा- ५० वर्षाच्या,३० वर्षाच्या, १६ वर्षाच्या, १० वर्षाच्या किंवा गर्भाशयातल्या, ते नाही पुरलं तर पोरांसोबत झोपा, मग हिजड्यानसोबत पण झोपा, नाही तर मग प्रेतांसोबत झोपा, दुर्लक्ष करा, शिव्या घाला. काहीही करा. पण हे लक्षात असू दे - पर्याय नाही म्हणजे नाहीच.
The only way out is through.
च्यायला हे Robert frost ने आधीच लिहून ठेवलंय. कवी होता ना साला. कुठल्या ना कुठल्या पॉईंटला लक्षात आलंच असेल त्याच्याही.
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे

बघ तुझी आठवण बाजूला काढली की काय काय बाहेर पडतं ते. जाऊ देत पण. प्रत्येक वर्षं संपताना हे असं होत राहातंच. रोज मरे त्याला कोण... १० वर्षांपूर्वी बरोब्बर ३१स्ट डिसेंबरलाच एक गाणं ऐकलेलं. नादा सर्फ या माणसाचं. Blankest year म्हणून. फार फार आवडतं मला ते.
Oh, fuck it
Im gonna have a party

I had the blankest year

I saw life turn into
a T.V. show
It was totally weird
The person I knew I didnt really know

Time don
t move
Were the only ones who do
Bending reason
Cause its all we hold on to

Oh, fuck it
(fuck it)
Im gonna have a party
Oh, fuck it (fuck it)
Im gonna have a party
तेव्हापासून दर ३१स्टला हे गाणं ऐकतो मी. कुठेही असलो तरी.
लावून बोचरे हळवेसे संगीत
ठेवतो स्वत:ला दिवसरात्र गुंगीत
रोखावा अलगद श्वास गळा दाबून
तशी सर्व मनाला मारत जाते धून

मरो च्यायला. मरोच.

पुढल्या वर्षीसाठी मी संकल्प करणारे – काही म्हणजे काहीच वाचायचं नाही. लिहायचंही नाही. कवितापण नाही. कुण्णाकुणाला भेटायचं नाही. फक्त फिरायचं. NCPAपासून. चालत चालत. समुद्राच्या कडेकडेने. समुद्र नेईल तिथे तिथे... 

Wednesday, December 13, 2017

सात सक्कं त्रेचाळीस --- it does matter even if it does not add up.

मी ८-९ वर्षांपूर्वी किरण नगरकरांची ३ पुस्तकं वाचलेली. पहिलं रावण आणि एडी, मग ककल्ड आणि मग  सात सक्कं त्रेचाळीस. ही order महत्त्वाची आहे. कारण सात सक्कं ने चालू केलं असतं तर कदाचित एवढं वाचलं नसतं. सात सक्कं वाचायला घेतलं तेव्हा सुरुवातीची काही पानं वाचायला काही दिवस घेतले होते. इतकं डोकं गरगरवून टाकणारं त्याआधी काही वाचलं नव्हतं. अर्थात ककल्ड कमालीची आवडली होती. म्हणून मग सात सक्कं सुद्धा पूर्ण केली होती. तेव्हा त्यातले तुकडे तुकडे आवडलेही होते. पण लक्षात राहिली नव्हती. पण गेल्या महिन्यात एका मित्राचा फोन आला की सात सक्कं वाचतोय, पण डोकं गरगरून गेलं वगैरे म्हणून. त्या निमित्ताने पुन्हा एकदा सात सक्कं वाचली. या वेळी मात्र सात सक्कं वाचणं हा अनुभव होता. अर्थात मधल्या काळात विलास सारंगांचा सात सक्कं वरील एक लेखसुद्धा वाचला होता. त्यामुळेही परत वाचताना किंचित बारकाईने वाचली असावी, किंवा आता तशी सवय झाली असावी.

तर मुद्दा हा की डोक्यात सणकून घुसावी तशी ही कादंबरी घुसत गेली. खरं तर ककल्ड ही प्रचंड आवडण्याचं मुख्य कारण होतं त्यात एकाच गोष्टीबद्दल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची आणि त्यातही या दोन्हीत सतत शिफ्ट करत राहण्याची त्यांची पद्धत. कित्येक प्रसंग नगरकर अक्षरश: डोळ्यांसमोर उभे करतात. सात सक्कं मध्ये मात्र हे नाही दिसत. उलट सात सक्कं मधील बरेच प्रसंग अमुक ठिकाणहून तोडून, मग अजून कुठेतरी असं सारखं सारखं होत राहातं. त्यातही पाठ्यपुस्तकाच्या उलट बऱ्याचदा कोण कोणास म्हणाले हे कुठेच दिलेलं नसल्यामुळे हे जंप आणि कट्स डोक्याच्या काही फूट वरून जातात. त्यामुळे सात सक्कं वाचताना डोकं गरगरणं स्वाभाविक आहे.

तर या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र म्हणजे कुशंक. त्याच्याभोवती मग त्याची प्रेमप्रकरणं, मित्र, शेजारी वगैरेची गुंफण. तीही फार ओबडधोबड. कुठेच अतिरंजित वर्णनं वगैरे न करता, भाषाशुचिता वगैरेची पर्वा न करता नगरकर लिहितात. उद्विग्नतेतून असंबंध लिहून तत्वज्ञान सांगण्याचा अतिबौद्धीक आविर्भाव यात कुठेच दिसत नाही. (मी हे लिहितोय त्यात असू शकेल कदाचित पण कादंबरीत नाही.) यात काही अनुभव वैयक्तिकही आहेत, तसेच्या तसे नसले तरी. हे स्वत: नगरकरांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटलंय. त्यामुळे सुरुवातीला या कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत, वगैरे लिहिलेलं मला खटकलं. मजा म्हणजे या कादंबरीतच एका प्रसंगात प्राचिंती व कुशंकचं एक संभाषण आहे –

‘तू लिहितोस ना? कधीतरी बाहेर पडेलच. नाव बदलून. माझ्या प्रायव्हसीचा भंग न करता. ते तुला पैसेसुद्धा देणार नाहीत. Compulsive urge of expression किंवा communication म्हणून प्रकाशित करशीलच.’
अर्थात ते एक रीत म्हणून लिहिलं असावं कदाचित.

कुशंकची यात अनेक प्रेम प्रकरणं येत राहतात- आरोती, चंदनी, ‘तू’ इ. पण सर्वात जास्त स्पेशल यातली ‘तू’च आहे हे जाणवत राहतं. आधी वाचताना ‘तू’ हे सर्वनाम म्हणून वाटत राहातं, पण मग कळून येतं की ते विशेष नाम आहे. खूप खूप विशेष. पूर्ण पुस्तकात ‘तू’च्या नावाचा उल्लेख कुठेच सापडत नाही. आणि म्हणूनच कदाचित ‘तू’ हे पात्र खूप जास्त स्पेशल झालं असावं. कधी कधीतर हे पुस्तक ‘तू’ या एकाच व्यक्तीला उद्देशून लिहिलंय की काय असं वाटत राहातं. त्यातही विशेष करून ‘तू’च्या बाबतीत लिहितानाच desperation हे एक वेगळी पातळी गाठतं. उदा. कुशंक एके ठिकाणी म्हणतो की,

‘काय सांगू तुला मी की, तू मला नाही म्हणून अर्ध वर्षं होऊन गेलं तरी मला अजून शहाणपण आलेलं नाही? दीड-दोन वर्षापूर्वी जेव्हा तुझी पाळी चुकली म्हणून आपण दोघं घाबरलो तेव्हा तू खरोखरच गरोदर राहिली असतीस तर आज मी तुला एखादेवेळी गमावून पण बसलो नसतो ना.’

हे सगळं मला ८-९ वर्षापूर्वी कळण्याचा संबंधच नव्हता. म्हणजे त्यावेळी ब्लू फिल्म्स सोडल्या तर स्त्री-पुरुष संबंधाबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती म्हणूनही असेल. आता मात्र खूप सणकून कळतंय.  माझ्यासाठी जास्तीत जास्त desperation म्हणजे love in time of cholera मध्ये जसा नायक आपल्या प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर, म्हातारपणी जेव्हा तिचा नवरा मरतो, तेव्हा पुन्हा तिला जाऊन भेटतो वगैरे असलं काही तरी स्वप्नाळूपण होतं. किंवा कदाचित अजूनही आहे. पण नगरकर मात्र फार सहजपणे त्या पलीकडे जातात. आणि हे सगळं १९६७ ते १९७४ च्या दरम्यान लिहिलं होतं त्यांनी हे विशेष. इतकं सगळं असूनही कुशंकची कीव वगैरे येत नाही हे महत्वाचं. आपली काही तरी फार इनक्युअरेबल अशी दु:खं असावीत, आणि मग आपल्याला आवडणाऱ्या, एखाद्या जवळच्या, शक्यतो विरुद्ध लिंगी, अशा व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं वगैरे असल्या कल्पना कुशंकला स्पर्शसुद्धा करत नाहीत. 

अर्थात फक्त प्रेमप्रकरणातून दुखावला गेलेला एवढाच कुशंक असता तर हे पुस्तक फार कंटाळवाणं झालं असतं. पण सामाजिक परिस्थिती, देव, धर्म, इत्यादी अनेक गोष्टीवरील कुशंकचे monologues हे निव्वळ अप्रतिम आहेत. आणि खास नगरकरांच्या शैलीतील black humour ठिकठीकाणी यात पेरलेला सापडतो. सात सक्कं मधील स्त्रिया यासुद्धा काळाच्या फार फार पुढच्या अशाच म्हणाव्या लागतील.
     
अजून एक पुस्तक वाचताना जाणवलेली गोष्ट म्हणजे alienation. जगापासून तुटून पडलेला, outsider म्हणून जगत असलेला असा कुशंक. नगरकरांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तारुण्यातलं आयुष्य याबद्दल जेवढं वाचलं, त्यातून लक्षात आलं की हा माणूस पण outsider म्हणून जगला असणार. हे alienation माझ्या मते थोड्या फार प्रमाणात सगळ्यांच्याच वाट्याला येत असतं. कुशंकसारख्याच्या वाट्याला जरा जास्तच. (मी नुकतंच amazon primeवर mr robot पहिल्याने हा alienationचा मुद्दा सुचला असावा) पण महत्वाच हे आहे की तरी सुद्धा एके ठिकाणी human bondage अटळ असं कुशंक म्हणतो.

‘क्या फर्क पडता है’ या ‘तू’च्या तोंडी वारंवार येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मुखपृष्ठावर ठळकपणे दिसतं – फर्क पडता है म्हणून. हा कुशंकचा दृष्टीकोन नक्कीच आशादायी आहे. स्वत:हून किंवा भोवतालच्या जगामुळे  ओढवलेलं कमालीचं दु:खं, टोकाची निराशा या सगळ्यापलीकडे किंवा कदाचित या सगळ्यासकट कुशंक जगत राहतो, अनुभवत राहतो. भोंगळ आशावाद, लैंगिक किंवा इतर गोष्टींमध्ये असणारा दुटप्पीपणा हे सगळं नाकारत, वास्तव स्वीकारून तो जगत राहतो हे विशेष. 

बाकी या पुस्तकासंबंधी बऱ्याच समीक्षा वगैरे लिहिल्या गेल्याचं प्रस्तावनेत वाचलं. प.पू. कुमार केतकर यांनी या पुस्तकाला शब्द मैथुन असे म्हटले. इतरही बऱ्याच जणांनी कठोर टीका केली. या कादंबरीची पहिली आवृत्ती संपायला सुमारे २० वर्षे गेली. एकूण या कादंबरीला बऱ्यापैकी वाळीत टाकण्यात आलं. अर्थात त्यावरील बऱ्यापैकी चर्चा प्रस्तावनेत सापडेलच. फक्त मला हा प्रकार दुर्दैवी वाटतो इतकंच. 
मी यूट्यूबवर त्यांची साधारण ३-४ वर्षापूर्वीची एक मुलाखत पहिली होती. त्या मुलाखतीत बोलताना त्यांनी, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती मी पाहिलीये, असं म्हणून पुढे काही बोलण्याचं टाळलं होतं. इतकी जागतिक कीर्ती मिळवल्यावर, इतक्या वर्षांनीही या माणसाला हे जाणवतं, यावरून त्यांनी ही कादंबरी कुठल्या मन:स्थितीत लिहिली असावी याचा थोडा फार अंदाज येतो. कदाचित त्यामुळेच अधूनमधून कुशंकची कमालीची अस्वस्थ करून जाणारी स्वगतं येत राहतात. हा पार्ट मला तरी बेस्ट वाटला. अर्थात कोणाचाही दृष्टीकोन, मतं ही जर स्वानुभवातून, जगण्यातून, परिस्थितीतून घडत असतील तर ती चुकीची नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. ती एखाद्याला पटतात की नाही हा भाग वेगळा. म्हणूनच कदाचित हा अस्वस्थ करून जाणारा भाग मला निराशावादी सुद्धा वाटला नसावा. 
किंवा खरं तर टोकाचा दुखावलेपणा सांगणारी पुस्तकं, गोष्टी, माणसं मला आवडत असावीत. तसंही काफ्काने लिहून ठेवलंय –
“I think we ought to read only the kind of books that wound or stab us. If the book we're reading doesn't wake us up with a blow to the head, what are we reading for? So that it will make us happy, as you write? Good Lord, we would be happy precisely if we had no books, and the kind of books that make us happy are the kind we could write ourselves if we had to. But we need books that affect us like a disaster, that grieve us deeply, like the death of someone we loved more than ourselves, like being banished into forests far from everyone, like a suicide. A book must be the axe for the frozen sea within us. That is my belief.” 


तर सात सक्कं हेही अश्याच एका पुस्तकांपैकी एक. बाकी पुस्तकाबद्दल बरंच बोलता-लिहिता येईल. मी नगरकरांच्या प्रचंड प्रेमात असल्याने, जसं प्रेमात पडलं की एखाद्या व्यक्तीचं सगळंच स्पेशल वाटत राहतं, तसं मला सर्वच पुस्तक, त्यातले प्रसंग, संवाद, monologues सगळंच फार स्पेशल वाटतंय सध्या. Catcher in the rye मध्ये एक वाक्य आहे 
"What really knocks me out is a book that, when you're all done reading it, you wish the author that wrote it was a terrific friend of yours and you could call him up on the phone whenever you felt like it. That doesn't happen much, though."
मला सात सक्कं वाचल्यावर अगदी असंच वाटत राहिलं जवळ जवळ आठवडाभर. तर मुद्दा हा की सात सक्कं खूप आवडलेल्या गोष्टींच्या(फक्त पुस्तकांच्या नाही) यादीत भरून ठेवलेलं आहे. सात सक्कंच्या एका इंग्रजी रीव्ह्यूमध्ये लिहिलं होतं की Nothing in this Kiran Nagarkar’s book adds up म्हणून. ते बदलून It does matter even if it doesn’t add up असं करावसं वाटतं.

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!