अंतोन चेकॉव्हची 'मिझरी' (Misery ) नावाची एक गोष्ट वाचलेली. त्याचा नायक, अयोना पोतापाव्ह ( Iona poatapav ) हा एक गरीब टांगेवाला असतो. त्याचा मुलगा आदल्या दिवशी मरण पावलेला असतो. पण हातावर पोट चालत असल्याने त्याला धंदा चालू ठेवणं भाग असतं. मग टांग्यात बसलेल्या प्रत्येकाला तो आपल्या मुलाच्या निधनाबद्दल सांगायचा प्रयत्न करतो. पण जो तो स्वत:च्याच चिंता, दु:खं यात बुडून असतो. अयोनाचं दु:ख ऐकायला कोणाकडेच वेळ नसतो.शेवटी कुणीच आपल्या सोबत शोक व्यक्त करायला नाही हे पाहून अयोना आपल्या घोड्याला मुलाच्या मृत्युची हकीकत सांगू लागतो. कुठलाही निष्कर्ष न काढता इथेच कथा संपते. मागे नवनीत की कुठल्या तरी वहीच्या मागे हे वाचलेलं If animals could talk, the world would lose its best listeners. ते पटतं एकदम.
याउलट अशीच उद्धव शेळके यांची एक कथा वाचलेली. 'दु:ख' म्हणून. कथेचा नायक (नाव आता आठवत नाहीये म्हणून 'राम' म्हणतो) , राम हा एका हॉटेलात वेटरचं काम करत असतो. पण वेटर म्हणून काम करणं त्याला आवडत नसतं. दुसरी एखादी चांगली नोकरी शोधण्यासाठी तो धडपडत असतो. शेवटी एके दिवशी पोलीस भरतीच्या परीक्षेत तो पास होतो आणि त्याला तिथे नोकरी मिळणार असते. ही आनंदाची बातमी कधी कुणाला सांगतो असं त्याला होऊन जातं. मग हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या मालकाला सांगण्याच्या उद्देशाने म्हणून तो मालकाजवळ जातो, तर मालक खेकसून त्याला कामाला लागायला सांगतो. मग सोबत काम करणारयास सांगावं म्हणून प्रयत्न करतो तर त्यालाही वेळ नसतो. शेवटी रामची नेहमी विचारपूस करणारा एक गिर्हाईक हॉटेलमध्ये शिरतो तसा तो एकदम खुलून जातो. पण त्या माणसासोबत एक बाईसुद्धा असते. त्यामुळे आज तो काही न बोलता फक्त ऑर्डर देऊन मोकळा होतो. तो हॉटेलमध्ये असताना कधी एकदा आपली बातमी त्याला सांगतोय असं रामला होऊन जातं. शेवटी तो निघताना घालमेल अनावर होऊन राम त्याला सांगतो की त्याला पोलिसात नोकरी मिळाली म्हणून. तर तो इसम ओळखही न दाखवता निघून जातो आणि रामच्या डोळ्यात पाणी तरळतं.
पहिली कथा दु:ख कुणाला तरी सांगण्याबद्दलची तर दुसरी सुख सांगण्याबद्दलची. शेवट मात्र सारखाच. आपलं ऐकायला कुणीही नसणं याच्याइतकं एकटेपण किंवा सल दुसरा कुठलाच नसावा. मागे कुठेतरी ऐकलेलं, Girls always need a listener म्हणून. ते बदलून Everyone always needs a listener असं करावसं वाटतं. ज्यांना असं ऐकणारं कुणी मिळत नाही ते दुर्दैवी, आणि ज्यांना मिळतं ते खरे भाग्यवान. इतकी सारी सामाजिक जाळी विणणारी संकेतस्थळे, वैचारिक, सांस्कृतिक इ-कट्टे वगैरे यासाठीच नाही का?
मला माझाच पुण्यातील पहिला आठवडा आठवतो. संध्याकाळपासून इ.एस.आय.च्या खोलीत एकटा असायचो. त्यात भ्रमणध्वनी खराब. त्यामुळे वैतागून पहिल्याच दिवशी मी डायरीत लिहिलेलं, 'मला एका दिवसात कळून चुकलंय की मी मुळीच एकटा राहू शकत नाही.'आणि थॅंकफुली मला नंतर एकही दिवस एकट्याने राहावं लागलं नाही. संभाषण ही इतकी महत्वाची गरज आहे हे तेव्हा कळलं.
बाकी या निमित्ताने माझी बडबड सतत ऐकून घेणाऱ्या, माझी भिकारातली भिकार कवितासुद्धा शांतपणे ऐकून घेणाऱ्या, पाणचटाहून पाणचट पीजे सहन करणाऱ्या, फोनवर किंवा कट्ट्यावर तासनतास गप्पा मारणाऱ्या आणि गप्प गप्प राहिलो तर प्रसंगी शिव्या घालून मला बोलतं करणाऱ्या सर्व मित्रमंडळीना एकदा भयंकर धन्यवाद.
................................शतानंद
मन करा रे प्रसन्न / सर्व सिद्धीचे कारण /
मोक्ष अथवा बंधन / सुखसमाधान इच्छा //
Friday, July 15, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
hmm!pan aajkal kharyakhurya gappa khupach kami hotat.hota te exchange of information!!!mi bhayankar miss karate gappa!
(mala aaj prachand rikama wel milalyane mi tuzya sagalya posta wachatey,karan udya pariksha ahe!)
exchange of information!!!
parikshechya adalya diwashich asa karawasa watata sagalyanach.. aso. mi eng chya shevatchya paperchya adhi kosla wachat baslelo te athavla ekdum!
Post a Comment