Showing posts with label उगाच. Show all posts
Showing posts with label उगाच. Show all posts

Thursday, July 14, 2016

शेवटी शून्य आणि पारिजात...

आज संचेतीच्या सिग्नलला पुढच्या बाईकवाल्याच्या नंबर प्लेटवर लिहिलेलं ‘शेवटी शून्य’. च्यायला म्हटलं खरये.. शेवटी शून्यच. मग उगाच ‘बाकी शून्य आठवलं’ – झवझव म्हणते सोट्या पूस, याच्यात नाहीतर त्याच्यात घूस... जियो यार. परत वाचायला पाहिजे हे पुस्तक. कसंही असलं तरी.

मग उगाच माझ्या लांबच्या ओळखीतल्या एकाने जीव दिला गेल्या वर्षी त्याची आठवण झाली. च्यायला पी.एच.डी. झालेला माणूसही जीव देतो हे थोर आहे. म्हणजे शेवटी शून्यच. जाऊ देत च्यायला पण. जीव दिला म्हणजे नक्की काय? जिवंत असणं म्हणजे नक्की काय? जिवंत असण्याची नक्की खूण किंवा लक्षण काय? सातव्या मजल्यावरून त्याचं शरीर जमिनीवर येऊन आदळलं म्हणजे नक्की काय झालं – potential energy चं kinetic energyत रुपांतर आणि परत पुन्हा kinetic energyचं potential energyत. बस्स हे आणि इतकंच.. बाकी श्वासोच्छवास वगैरे म्हणजे अंधश्रद्धाच! ३ वर्षांची मुलगी पण होती त्याला. तिला हे फिजिक्स कसं समजावणार?

कामू म्हणतो आत्महत्येपेक्षा जगायला जास्त हिम्मत लागते. गांड च्यायला. रोज सकाळी अमुक वाजता उठून दात आणि गांड घासून इस्त्री केलेले किंवा न केलेले कपडे घालून अमुक एका ठिकाणी जाऊन पुन्हा गांड घासणं आणि मग घरी येऊन ठरल्या वेळी जेवण, टी.वी. आणि ऑप्शन असेल तर सेक्स करून मग झोपणं इत्यादी साठी हिम्मत लागते काय?

कोणी महान माणसाने जर गांड हा शब्द मराठीच्या इतिहासातून खोडून टाकायचा ठरवलं तर किती वर्षं लागतील? हजार तरी किमान. पण कोण असली चुत्येगिरी करेल?

असो. ते energyवरून आठवलं. मला oracle शिकवणारे सर एकदा असंच गप्पा मारताना मला म्हणलेले – Communication is only by energy म्हणून. होय च्यायला. एनर्जी. ऊर्जा. ती पाहिजेच. ती नसेल तर कोणाला कितीही वेळा भेटा, बोलणं होतच नाही. होते ती फक्त शब्दांची फेकाफेक. फेकच च्यायला. म्हणून मी कदाचित भेटत नसेन का कोणाला आजकाल? पण भेटलो नाही तरी मी केवढ्या जणांशी बोलत असतो सतत. आणि माझ्याशीही केवढे जण बोलत असतात. communicationची हीच पद्धत बरी. भेटलो की उगाच विषय काढून काढून तास (ग्लास नाही!) भरत राहायचे. नकोच च्यायला.

मग कॅम्पपर्यंत या बाईकच्या मागे मागेच. पुढे तो वळल्यावर उगाच Slaughterhouse 5 आठवलं - Everything is nothing, with a twist. पुन्हा तेच. शून्यच. आणि तरी मी बाईक चालवतोच. मैलाचे आकडे पुढे पुढे जात राहतातच. घड्याळाचे काटे, वेळ, अगणित गाड्या, आकाशातले ढग, माणसं, हा, ही, तो, ती, तू, मी(?) सगळंच--- so it goes च्यायला. या कर्टने नक्कीच दासबोध वाचला असणार.

देवलंड पितृलंड | शक्तिवीण करी तोंड |
ज्याचे मुखीं भंडउभंड | तो एक मूर्ख ||

इति दासबोध. म्हणजे मी पण मूर्खच. तर मग कोण नाहीये? असो.

बाईकचा नंबर मात्र १६८१ होता. ४१ चा वर्ग. म्हणजे इथे मात्र शेवटी शून्य नाही. च्यायला टिपिकल पुणेकर. च्युणेकर. जाऊ देत. पुणे=च्युणे=चणे=कणे. यमक=गमक. हीहाहा. च्यायला पाठीत कण्याऐवजी चणे असते तर? कदाचित वाकताना इतका त्रास झाला नसता!

आता इतका टाईप करताना इटाका असं टाईप झालं.
इटाका भारी शब्द मराठीत का नाहीये?

घरी आलो तर स्टारस्पोर्ट्सवर गांगुलीची कुठली तरी इनिंग दाखवत होते. च्यायला गांगुली लास्ट टेस्टमध्ये शून्यावर आउट झाला होता. ब्रॅडमनपण. म्हणजे शेवटी शून्य. आणि तरी दोघेही ग्रेटच. ब्रॅडमनला ग्रेट फक्त सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं. नाहीतर त्याच्याबद्दल बॅटिंग अॅव्हरेज सोडून आपल्याला काडीची माहिती नाही. गांगुली मात्र ग्रेटच. च्यायला त्याच्या आधीचे सगळे कॅप्टन कसे होते. असो.


शेवटी शून्य काढूनही लोक यांना थोर समजतात. म्हणजे एकूणच ‘शेवटी शून्य’ या तत्त्वज्ञानात कुठेतरी घाण लोचा असणार. म्हणजे शून्याच्या आधीचा आकडा जाम मॅटर करतो एकूणच. 

येस. शून्याच्या आधीचा आकडा. 
त्यासाठीच सगळे धडपड करत असतील काय?
मी हे लिहितोय तेही त्यासाठीच का?
म्हणजे काहीच नाही तर निदान लिहून तरी बघू असं काहीतरी.

शून्याच्या आधीचा आकडा जास्तच डिप्रेस करून जातो.
तर असोच च्यायला.

म्हणूनच कामूने लिहिलं असणार की - आयुष्य निरर्थक आहे असं लक्षात आलं की ते जास्त चांगल्या प्रकारे जगता येतं. 
निदान शून्याच्या आधी काही तरी असलंच पाहिजे ही निरर्थक धडपड तरी नाही.


निरर्थक.

ही निरर्थकाची रांग लांबच्या लांब
उमजेल जिथे त्या ओळीपाशी थांब
---------------------------------------------------------------------------------
पहाटे दूध आणायला बाहेर पडलो तर जाताना एका घराच्या अंगणात पारिजाताचा सडा दिसला. मस्त वाटलं. फार पूर्वी एक गोष्ट ऐकली होती पारिजाताच्या फुलांची. पारिजातका नावाची राणी सूर्यावर प्रेम करायची. पण जसे पुष्कळ लोकांच्या प्रेमाचे लागतात तसेच तिच्याही प्रेमाचे लागले. सूर्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून मग या राणीने आत्महत्या केली. आणि तिच्या राखेतून मग पारिजाताचं झाड आलं. पण दिवसा तिला सूर्याकडे बघणं अनावर झालं. हे असं झाडांचंही होतं म्हणजे. म्हणून मग हे झाड सूर्यास्तानंतर फुलांनी बहरून येतं आणि सूर्योदयापूर्वी आपली फुलं अश्रुंसारखी गाळून टाकतं. याला म्हणावं खरं प्रेम. च्यायला.


तात्पर्य काय तर झाडंसुद्धा गाळतात. अश्रू.
फरक फक्त इटाकाच की इथे आत्महत्येनंतरचा सडा सुगंधी असतो.

तर याचा आणि वर जे लिहिलंय त्याचा काडीचाही संबंध नाही, नसावा, नसेलच. जे हवं ते घ्या च्यायला. काय फरक पडतो? 
हे लिहिलं कारण मला पारिजातक आवडतो. बाकी शून्य, त्याच्या आधीचे आकडे वगैरे भंकसच. पारिजात आणि त्याचा सडा इटकंच काय ते खरं.

Saturday, May 28, 2016

बॅकग्राऊंडला वाजत राहणारी भिकारचोट गाणी...

सकाळी उठल्यापासून(मी) ते रात्री झोपेपर्यंत(मीच) किंवा त्यानंतरही.. म्हणजे स्वप्नातल्या स्वप्नातही झोपेपर्यंत, मेंदूच्या कुठल्या तरी रिकाम्या कोपऱ्यात मला सारखी काही गाणी वाजताना ऐकू येतात.
सतत.
वर्षानुवर्षे.
दिवसेंदिवस.
तासन तास.
क्षण न क्षण.

च्यायला यापेक्षा जास्त डिटेलमध्ये आपण घुसुच नाही शकत कशाच्या? म्हणजे आपण फार फार तर क्षणापर्यंत पोचू शकतो. दोन क्षणांच्या मधल्या भागात नाहीच. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या प्रत्येक क्षण सोबत वगैरे राहू. पण त्या क्षणांच्या मधल्या गॅपमध्ये पुन्हा सगळे भयंकर एकटेच. जाऊ दे पण, उगाच च्यायला तत्त्वज्ञान वगैरे.

तर मुद्दा हा की, माझ्याही नकळत मग मी ती गाणी गुणगुणायलाही लागतो.
हाहाहेहेहंहूहू.. डाडाडेडेडंडूडू... गागागेगेगंगूगू... -- शी च्यायला, चुत्येगिरी नुसती
--
अर्थात त्यातली बरीचशी गाणी मी सवयीनेच गुणगुणतो. उदाहरणार्थ सकाळी कुंथत बसलेलं असताना मला ‘हे भलते अवघड असते’ या गाण्याशिवाय प्रेशरच येत नाही आणि मग आपोआप मागे गुणगुण सुरु होते –
हे भलते अवघड असते..
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहिसे लांब होताना...

डोळे पाणावतात एकदम. च्यायला संदीप खरे ग्रेट आहे. याच्यामुळे सकाळची एक सिगरेट कमी झाली. आता त्या प्रमाणात माझं आयुष्य वाढणार. तर मग ही सिगरेट कम्पेनसेट करायला आता मध्यरात्री वगैरे उठलं पाहिजे. तर त्याआधी झोपायलाही हवं. तर असो.

आता मी टी.व्ही. बघतोय आणि त्यात वर्षभरापूर्वीच्या योगासनं, मोदी, मुस्लिम वगैरे चोथा झालेल्या विषयावर परत चर्चा चालुये. म्हणजे मुस्लीमान्कडच्या लोकांचा याला विरोध, कॉंग्रेसकल्यांचा त्यांच्या विरोधाला सपोर्ट, डाव्यांकडून मोदी कंपनीचा निषेध आणि भाजपाकडल्यांचा यांच्या विरोधाला आणि त्याहून त्यांच्या सपोर्टला कडाडून वगैरे विरोध. चुत्येगिरी नुसती. च्यायला जाऊ दे पण, उगाच राजकारण वगैरे. 

तर मुद्दा हा की टी.व्ही. चालू असतानाही मला उगाच गाणी ऐकू येतात – गोली मार भेजेमें वगैरे. गुलजार च्यायला. हा माणूस भन्नाट आहे. हा माणूस आपला बराच वेळ फुकट घालवतो. म्हणजे याला मानला पाहिजे. कसलं लिहितो साला-

याद है, एक दिन
मेरे मेज पे बैठे-बैठे
सिगरेट की डिबिया पर तुमने
छोटे-से इस पौधे का
एक स्केच बनाया था!

आकर देखो,
उस पौधे पर फूल आया है!

हाय गुलजार! हे असं लिहिणारा माणूस गोली मार भेजेंमें पण लिहू शकतो हे खरंच थोर आहे. हे जमायला हवं. काय जमायला हवं? गोळी मारायला कि गाणं लिहायला? दोन्ही अशक्यच—असो. 

मुद्दा काय तर सिगरेट आणि गुलजार हे कॉंबिनेशन अफलातून आहे. संध्याकाळी मी कधी चुकून मरीन लाईन्सला गेलो आणि चुकुनच सिगरेट मारायला लागलो की छातीच्या भयंकर जोरात ठोक्यामधून हे गाणं धडधडत राहातं –

दिल में कुछ जलता है, शायद धुआँ धुआँ सा लगता है
आँख में कुछ चुभता है
, शायद सपना कोई सुलगता है
दिल फूँको और इतना फूँको
, दर्द निकल जाए
इतना लंबा कश लो यारों, दम निकल जाए-------

प्रिय गुलजार, खरंच होऊ शकतं का असं? जाऊ देत च्यायला. तबू कसली दिसते पण या गाण्यात. ती तर अजून पण क्लासच दिसते. त्यात आता भरलीये पण कमालीची. तर असो.

हा गाणी ऐकू येण्याचा प्रकार केव्हा चालू झाला नक्की आठवत नाही. पण बहुतेक मी १०वीला असताना असावा. तेव्हा शाळेत संध्याकाळच्या वेळी almost रोज अदनान सामीचं ‘कभी तो नजर मिलाओ’ गाणं खिडकीतून ऐकू यायचं – कसलं तूफान आवडायचं मला तेव्हा ते. असं वाटायचं हे गाणं माझ्यासाठीच लिहिलंय – म्हणजे ते जो नही कहा है कभी तो समझ भी जाओ वगैरे. असो पण. शाळा कॉलेजमध्ये आपण कसे होतो वगैरे डोक्यात आलं की उगाच nostalgic वगैरे व्हायला होतं.

नंतर १२वीला असताना गुरुदत्तचा प्यासा पाहिला आणि “ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है” हे इतकं भयंकर आत रुतलं की कुठल्याही प्रसंगी, विशेष करून लोकांच्या मते आनंदाच्या वगैरे प्रसंगी हमखास हे गाणं चालू होतं बॅकग्राऊंडला. गुरुदत्त मागे उभा राहून शाल घेऊन, दोन्ही हात पसरून ओरडत असतो पण कोणाला काही नसतं त्याचं.शेवटी तोच कंटाळून जातो. 

या पिक्चरच्या शेवटी गुरुदत्त वहिदाला घेऊन कुठे तरी दूर निघून जातो. मला ही जागा बघायचीय च्यायला. या जागेचा पत्ता सापडायला हवा यार. सापडेलही कधीतरी.. पण मी कोणासोबत जाणार? किंवा माझ्यासोबत कोण येणार?फारफार तर सिनेमा, समुद्र किंवा एखादा ट्रेक अशा भंपक ठिकाणी येईलही कोणी, पण या असल्या ठिकाणी कोण मरायला येइल? गुरुदत्त you are a lucky man यार...

नंतर असंच एकदा रेडीओवर नूर जहानचं गाणं ऐकलं –

लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजे
अब भी दिलकश है तेरा हुस्न मगर क्या कीजे
और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा
मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना मांग 

आयचा घो त्या फैजच्या! (फैज की फैझ?) हे गाणं कुणीही वयाच्या १८व्या वर्षी ऐकू नये. निघता निघत नाही डोक्यातून(की डोळ्यातून). भेन्चोद – फैज डिझर्व करतो साला ही शिवी – तेव्हापासून ते आतापर्यंत मी फैज आणि नूर जहान दोघांच्याही वेड्यासारखा प्रेमात पडतो अधूनमधून...

मी कधी जरा बऱ्या मूडात असलो की कुमार गंधर्व बॅकग्राऊंडला चालू होतात. कुमार आणि अनिल हे भन्नाट कॉकटेल आहे. ट्रेनमधून जाताना कधी विंडोसीट मिळाली की मागे कुमारांचं गाणं चालू होतं ‘उड जायेगा...’ वगैरे. 

हे हे विंडोसीट मिळणं म्हणजे पण आनंदाचाच क्षण. आणि तसंही मला प्रवास करताना खिडकीपाशी बसायला फार आवडतं. इन्फॅक्ट कॉलेजला असताना मी वर्गातल्या एका मुलीच्या चक्क प्रेमात पडलो होतो काही दिवस, तिने स्वत:हून मला खिडकीपाशी बसायला दिलेलं म्हणून. तर असो. 

मुद्दा काय तर एक फुफ्फुस घेऊन, कुमार तुटक तुटक असं जे गातात ते इतर कोणाहीपेक्षा खूप जवळचं वाटतं. तसंही मला तुटक तुटक, अपूर्ण गोष्टीचंच भारी वेडय पहिल्यापासून. तर रेल्वेच्या खिडकीच्या जाळीमधून दिसणारी तुटक तुटक झाडं, इमारती, पोस्टर्स पाहिले की अपोआप कुमारांची गुणगुण सुरु होते. ट्रेनच्या खिडकीतून मग माझं  जगदर्शन चालू होतं.. तर आता हे लिहिताना माझ्या लक्षात आलं की माझ्या लायब्ररीतल्या खिडक्यानाही अशा जाळ्या लावल्यायेत नि त्यातून समोरची इमारत, फौंटनचा रस्ता, त्यावरची माणसं आणि निळंपांढरं आकाश तुटक तुटक दिसतं. तर कोणी म्हणेल त्यात काय एवढं? ते तर संडासच्या खिडकीतून पण दिसतं. तर खरच्ये ते.

हां पण समजा ट्रेन पूर्ण रिकामी असेल तर मात्र मी दरवाज्याशी उभा राहतो. एका हाताने दांडी पकडून दुसऱ्या हाताच्या बोटांनी मी ट्रेनचा दरवाजा वाजवत सुटतो आणि मग फार भयानक गाणी वाजत राहतात. म्हणजे माझं कराओके आणि गाणारे मेहदी हसन, बेगम अख्तर, रफी, तलत, मुकेश, लता, किशोर,सोनू, कुमार सानू वगैरेपैकी कोणीही किंवा सगळेच.

जनरली हा प्रकार रंजिश ही सही पासून सुरु होतो. पुरेशी स्टेशन्स मागे पडली की मग बेगम अख्तर चालू होते –

आप को प्यार है मुझ से के नहीं है मुझ से
जाने क्यों ऐसे सवालात ने दिल तोड़ दिया

हे गाणं १०-१२ वेळा तरी रिपीट मोडवर चालू राहातं आणि त्याच्या अधेमधे मग इतर गाणी. अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का वगैरे.

जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता था.. हे गाणं आलं की मात्र बाकी गाणी बंद. रिस्पेक्ट एकदम. च्यायला नुकताच एका मित्राच्या लग्नाला गेलेलो, तर त्याच्या वरातीत हे गाणं वाजवत होते. आणि वर लोक त्यावर नाचत पण होते. लोक येडझवे असतात. त्यातही लग्नांमध्ये घोड्याच्या आजूबाजूला नाचणारे तर आणखीनच च्यायला. हेहे गुगल सजेशन मध्ये येडझवे दाखवतंय हे बेस्ट आहे. असो.

लता मात्र एकदा आली की डोळ्यातून एखादा तरी थेंब निपटून काढतेच. लताचं तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा हे चालू झालं की बंदच होत नाही काही केल्या. इन्फीनाईट मोडवर चालूच राहातं. खास करून ट्रेकला वगैरे गेलो आणि उगाच खूप साऱ्या पायवाटा वगैरे दिसल्या की लता गुणगुणू लागते

इन रेशमी राहो में, एक राह तो वो होगी
तुम तक जो पहुचती है, इस मोड़ से जाती है...

च्यायला परत गुलजार.
गुलजार एके गुलजार.
गुलजार दुणे गुलजार.
गुलजार रेस टू गुलजार.
गुलजार रेस टू इन्फीनीटी.
हा व्यापून राहिलाय सगळं.

तू मुंबई सोडताना फोन केला होतास माझं पॅब्लो नेरुदाचं पुस्तक तुझ्याकडे राहिलंय म्हणून. तेव्हा या गुलजारने केवढं छळलं होतं मला. काय तर म्हणे

एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गीले, सूखा तो मैं ले आई थी
गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो--------

जाऊ देत. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है? निरोपाच्या प्रसंगांबद्दल मला फार बोलायला आवडत नाही. पण का माहित नाही पण निरोपाच्या कुठल्याही प्रसंगी मला गीता दत्तचं एक गाणं कायम विळखा घालून बसतं—

मुझे जाँ ना कहो मेरी जाँ
मेरी जाँ, मेरी जाँ

जाँ ना कहो अनजान मुझे
जान कहा रहती है सदा
अनजाने क्या जाने, जान के जाए कौन भला

मला पूर्वी याचा अर्थ कळायचाच नाही. म्हणजे साधारणतः २५व्या वर्षी माणूस जितका बावळट(म्हणजे चुत्या) असतो त्यापेक्षा मी जरा जास्तच बावळट(म्हणजे चुत्या) होतो म्हणूनही असेल. पण जेव्हा या गाण्याचा अर्थ कळला, तेव्हा हे गाणं अगदी अंगावर आलं. त्यातल्या अर्थासकट. पण असो. निरोपाविषयी फार बोलू नये माणसानं...

समुद्राला लागून असलेल्या गल्ल्यांमधून निरुद्देश भटकत राहाणं हा प्रकार मला फार आवडतो. निरुद्देश. कसला भारी शब्दये हा. भारी. हेहे. तर मुद्दा हा की अशा वेळी हमखास किशोर- आर.डी.ची गाणी आठवू लागतात. प्यार हमें किस मोड पे ले आया वगैरे. आर.डी. बाप आहे च्यायला. किंवा मग

हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके
झिंगालाला हू.. झिंगालाला हू.. हुर्र हुर्र----
झिंगालाला... च्यायला.. इसको लागा डाला तो लाईफ झिंगालाला...
झिंग. झिंगाट. झिंगालाला.
झिंगालालाच बेस्टये एकदम.

तर मुद्दा हा की या गल्ल्यांमध्ये केवढी शांतता असते. समुद्रावर नसते ती जनरली. समुद्रावर उगाच कारण नसताना पळणारे लोक, हॉर्नचे आवाज, एकमेकांना चिकटलेली जोडपी, येणाऱ्याजाणाऱ्यांकडे बघत बसणारी रिकामटेकडी माणसं, लाटा आणि लाटांवर निरंतर चालत राहणारी भिकारचोट गाणी – आणि भिकारचोट आठवणीसुद्धा—

च्यायला आठवणींवरून आठवलं बाल्झॅक म्हणतो True love rules especially through memory.
च्यायला, म्हणजे रोजचा हस्तमैथुन हे पण खरं प्रेमच तर – आयचा घो या लेखकांच्या—काय तरी आपलं लिहून ठेवतात. असो पण.

तर मी आता हस्तमैथुन करताना कुठलं गाणं ऐकू येतं हे आठवायचा प्रयत्न करतोय पण काहीच आठवत नाहीये.
येस. आठवलं. ते फरीदा खानुमचं---
आज जाने की जिद ना करो....

च्यायला. कोणाचं काय तर कोणाचं काय.. कुणी म्हणेल की काय चुत्येगिरी आहे? पण हे फॅक्ट आहे. पिक्चरमधेपण एखादा सेक्स सीन चालू असेल तर हे गाणं वाजू लागतं बॅकग्राऊंडला माझ्या.असो पण. 

तुम्ही जर इथपर्यंत वाचत आला असाल तर तुम्ही थोर आहात यात शंका नाही. किंवा मग तुमच्याकडे फुकट घालवायला चिक्कार वेळ असणार हे नक्की.

तर मला बऱ्याचदा एखादा पिक्चर पाहिला की एकदम डिप्रेशन येतं. उदाहरणार्थ मध्ये बऱ्याच वर्षांनी रजनीगंधा पाहिला. अमोल पालेकरचा. इंजिनीअरिंगला असताना एकदा पाहिलेला, पण तेव्हा कळला नव्हता. आता परत पाहिला तर फारच उदास वाटू लागलं. म्हणजे हे असं सगळ्यांचंच होतं का? पहिलं प्रेम ही काय भयंकर गोष्ट असते ना? ओके आय शुड राइट पहिलं ‘सिरीअस’ प्रेम. असो तर तेव्हापासून मग कुठलाही भिकार प्रेमपट पाहिला की त्यातलं ते गाणं नेहमी रेंगाळत राहतं

कई बार यूँ भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है, मन तोड़ने लगता है
अन्जानी प्यास के पीछे, अन्जानी आस के पीछे, मन दौड़ने लगता है

-- म्हणजे पुन्हा पुन्हा आपण हातचं सोडून पुन्हा त्याच त्याच गोष्टींच्या मागे का धावत सुटतो? Psychology नक्कीच काही तरी टर्म असणार याला. तर असो. त्याने काय फरक पडतो.

पण ही मागे चालणारी अखंड गाणी किंवा अखंड चालणारी गाणी किंवा अखंड गाणी – चालणारी – होय हे शेवटचं जास्त भिकार वाटतंय, हेच चांगलंय; हं तर अखंड गाणी – चालणारी – हैराण करून सोडतात हे मात्र खरं. खास करून झोपताना रफी, मुकेश वगैरे जीवावर उठतात. डोळे बंद केले तरी मुकेश ओरडत बसतो- आंसू भरी है ये जीवन की राहें वगैरे किंवा

तेरे प्यार को इस तरह से भुलाना
ना दिल चाहता है, ना हम चाहते है किंवा

मधेच गिरिजादेवीचं किन संग प्रीत लगाये...
च्यायला हे गाणं चालू झालं की झोपेचं खोबरं.

किंवा त्याहून भयंकर म्हणजे ते ईश्कियातलं –
डर लगता है तनहा सोने में जी

किंवा... किंवा... किंवा..

तर मुद्दा काय गाणी प्रचंड आहेत. वेळ पण प्रचंड असतोच. तो असा नाही तर तसा आपण फुकट घालवतोच. पण त्यात बॅकग्राऊंडला अशी गाणी असली की तो फार हळूहळू फुकट जातो. एकदम भसकन नाही जात.
टागोर म्हणतात — Music fills the infinite between two souls.

मला वाटतं ही गाणी माझ्यातालीच पोकळी भरून काढतात आणि मग त्याहून मोठी पोकळी निर्माण करतात. 
तर एकूण काय – हे सगळं पोकळच--

पूर्वी होती शुद्ध केवढी हवा वगैरे...

पूर्वी होती शुद्ध केवढी हवा वगैरे
श्वास रोजचा जाणवायचा नवा वगैरे

दुखरी बाजू समोर येइल तेव्हा येइल
तोवर कसला नकोच बागुलबुवा वगैरे

नात्यांमध्ये कुठून येइल ओलावा या
हवेतसुद्धा नाही जर गारवा वगैरे

जमिनीवरती धरणे बांधुन पुष्कळ झाली
खोद एकदा हृदयातुन कालवा वगैरे

म्हणूनही ती सोडून गेली असेल बहुधा
आवडायचा त्याला पक्ष्यांचा थवा वगैरे

जाता जाता आपल्यात जे घडले त्याचा
कधी वाटतो किळस, तर कधी दुवा वगैरे

कुणाकुणाला रोज नवनवे सूर लागती
कुणास पुरतो जीवनभर मारवा वगैरे


२७ मे, २०१६.

Saturday, July 25, 2015

काहिच नाही कमी परंतू...

छान चालले असते सगळे
झालो असतो स्थिरस्थावरही
दिनक्रमही ठरलेला असतो
ठरले असते सगळे काही
सगळ्यानंतर...

आठवड्याला एक सिनेमा,
नाटकही एखादे बघतो
हसतो, रडतो, फिरतो, गातो
मस्त रहातो, मजेत जगतो-
तसे निरंतर...

तरी एकट्या सायंकाळी
खिडकीपाशी निवांत बसता
पापण्यांत चुरचुरते किंचित
रेडीओवरी ऐकत असता
बेगम अख्तर...


खिडकीमधली तुळसही तेव्हा
उदासवाणी, मलूल दिसते
काहिच नाही कमी परंतू
सगळे सगळे सगळे असते
तू असतिस तर...  

२०१५

Tuesday, July 24, 2012

हल्ली...

...हल्ली वाचणं बंद करायचं ठरवलय... पुस्तकं विरंगुळा म्हणून ठीक असतात – इलाज म्हणून नाही. होय, तसं म्हटलं तर इलाज नसतोच कशाला... तुम्ही पृथ्वीवर आहात यालाच इलाज नाही. येस, You are on earth, there is no cure for that. मी आता जे काही करतो ते नाईलाज म्हणूनच... लवकर उठतो – नाईलाज. घराबाहेर पडतो – नाईलाज. कॉलेजला जातो – नाईलाज. घरी येतो – नाईलाज. सिगरेट ओढतो – नाईलाज. वाचत बसतो – नाईलाज. गाणी ऐकतो – नाईलाज. खातो पितो – नाईलाज. हसतो बोलतो – नाईलाज. शिव्या देतो – नाईलाज. कुठलीही गोष्ट नाईलाज म्हणून करण्याची, स्वीकारत जाण्याची सवय होत चाललीये हल्ली...

...हल्ली कंटाळा येतो आणि तो घालवायचा उपायच सापडत नाही. पूर्वी कंटाळा आला की तुला एखादा एसेमेस टाकायचो. मग त्यावर तुझा मोहक रीप्लाय – कधी मस्त लांबलचक तर कधी फक्त एखादं उदगारवाचक चिन्ह. Inboxमध्ये तुझं फक्त नाव दिसलं तरी कंटाळा पळून जायचा. मग अगदी हायपर कंटाळवाण्या विषयावरच्या गप्पापण मस्त वाटायच्या. आतून आतून एकदम प्रसन्न वाटत राहायचं. त्या एका एसेमेसने एकटेपणा सुसह्य व्हायचा. आता इतके सगळे लोक सोबत असतात आणि तरी मी कानाला हेडफोन्स लावून मेहदी हसन ऐकतोय नि त्याचासुद्धा कंटाळा आलाय. मला नक्की कशाचा कंटाळा आलाय तेच कळत नाही हल्ली...

...हल्ली उगाच येता जाता टोचून बोलणाऱ्या, उपदेश करणाऱ्या माणसांची कमालीची चीड येऊ लागलीये. या सर्वांना एकदा सांगायला हवं की बाबांनो If you must hit me, hit me with an axe! होय च्यायला! आजकाल शब्दांचा कंटाळा आलाय, आणि हे सांगायला पण साले शब्दच वापरावे लागतायेत. आणि साले हे शब्द कधी एकटे नसतात, त्यांना चिकटलेले असतात फारच अर्थ. नेमक्या कुठल्या ठिकाणी चिमटा काढला की एखाद्याला दुखतं हे काही माणसाना चांगलंच कळतं. मला अशा माणसांचा कंटाळा येऊ लागलाय, नव्हे चीड येऊ लागलीये. आणि तरीही मी चिडत नसल्याचं दाखवतो. माझ्यामते याचीच चिडचीड होतेय हल्ली...

...हल्ली रेडिओवर कसली उदास, भिकार, भंगार गाणी ऐकावी लागतात. काय तर म्हणे There’s something left in my head वगैरे. आयचा घो! इंग्लिश गाणी कळत नाहीत म्हणून ती ऐकायला चालू केली तर ती पण कळू लागलीयेत हल्ली. आयपॉड बिघडल्यापासून लोचा झालाय च्यायला. नको नको ते कानावर पडतं. तरी हिंदी गाण्यांपेक्षा ही बरीच. नाहीतर ते रफी, किशोर, तलत, मुकेश वगैरे भोसडीचे तर जिवावर उठतात च्यायला. त्यापेक्षा मराठी गाणी बरी... रुतत तरी नाहीत फार आत. माझ्यामते सगळ्याचा प्रॉब्लेम एकच – कळायला नाही पाहिजे काहीच. अज्ञानात सुख असतं असं बोलतात ते उगीच नाही... मी instrumentals ऐकायला चालू केलंय हल्ली...

...हल्ली चुत्यासारखा रोज temperature चेक करतो, पण साली ती नळी नॉर्मलच दाखवते. कधी वाटतं पाऱ्याने आपला गुणधर्म बदलला की काय? साला temperature नॉर्मल असून पण संध्याकाळची थंडी का वाजत राहते? काहीच झालेलं नाही मग जीभेची चव का गेलीये? ताप आलेला असला तर डॉक्टरकडे तरी जाता येतं. पण आता तर तेही ऑप्शन नाहीये. ऑप्शन. पर्याय. अ-ब-क-ड-इत्यादी. च्यायला ऑप्शन शोधलाच नाही कधी. ऑप्शन होता का? विचारच नाही केला कधी. मी एक नवीन शोध लावलाय – अजिबात विचार केला नाही की temperature, blood pressure सगळं नॉर्मल राहतं. माझं सगळं अॅबनॉर्मलच असतं हल्ली...

...हल्ली मी फारच पथेटीक लिहितोय/ वागतोय/ जगतोय किंवा मरतोय पण म्हणता येईल. जी. एं.ची गोष्ट वाचलेली मागे – ‘प्रवासी’ म्हणून. त्यातला शिकारी म्हणतो – ‘मी सगळं माणसांचं जग गृहीत धरलं, त्यावर निष्कर्ष बसवले, त्यातून तत्त्वज्ञान निर्माण केलं. पण विश्वात मानव हा काही एकटाच जीव नाही हे मला सुचलं नाही...’ तसंच माझं झालंय. मी फक्त तू सोबत असतानाचं जग गृहीत धरलेलं, तू नसतानाचं नाही. म्हणूनच हे असं पथेटीक लिहितोय/ वागतोय/ जगतोय किंवा मरतोय.. आता कोणी यावर फैज ऐकवून दाखवेलही – दुख और भी है जमाने में मुहब्बत के सिवा वगैरे वगैरे – त्यांना ती दुःखं लखलाभ. तत्वज्ञान सांगायला सगळेच पुढे पुढे असतात. खारटशौकीन साले. मला तर घराबाहेर पाउलही नाही ठेववत हल्ली...

...‘हल्ली’ या शब्दाने सुरु होणारी सगळी वाक्यं, परिच्छेद, लेख, निबंध इ. कमालीचे उदास, भकास, निराशाजनक, कुबट वगैरेच कशी होतात हनुमानच जाणो. हल्ली नोकऱ्या मिळणं कठीण झालंय, हल्लीची पिढी म्हणजे इत्यादी इत्यादी. असो पण. उगाच शब्दाला का दोष द्या. शब्द तर नुसते शब्दच असतात. पण तरी एकदा का त्यात वेळ, जागा, माणसं, प्रसंग मिसळले की जे कॉकटेल तयार होतं ते घशाखाली नाही उतरत हे मात्र खरं. वा वा, काय पण लिहिलंय, कॉकटेल वगैरे. च्यायचा.. कालच कॉकटेल पाहिला म्हणून हे सुचलं, दुसरं काय? बाकी या हिंदी चित्रपटातले हिरो कसले लकी असतात भडवे.. नाहीतर आपण. जाऊ देत च्यायला, आता जरा जास्तच कुबट, नासकं, कुजकं होत चाललंय हे. उगाच साला नाकात वास. मळमळ – वळवळ - जळजळ. उलटी – बिलटी – गिलटी. फार सहन नाही होत हल्ली...

Wednesday, November 9, 2011

गिचमीड

एखाद्या रात्री कधीतरी जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि तडतडतात बाहुल्या..
मुक्यानेच सांगू लागतं दुखलेलं पाणी,
“इतकं हळवं चुकूनसुद्धा असू नये कोणी..

गाऊ नये कोणी कधी उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं इतकं होऊ नये ज्ञानी..
वाचूच नये मुळात कुठलं जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो दूर ठेवावं मस्तक..

जशी नजरेस दिसतात तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात तसेच समजावेत मित्र..
उगाच फार खोल आत नेऊ नये दृष्टी,
खरया समजाव्यात सारया सुखांताच्या गोष्टी..

पेनाच्या जिभेवरच सुकू द्यावी शाई,
फार त्रास होईल असं लिहू नये काही..
हळवं बिळवं करणारे मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची सगळी दारं बंद..

सायंकाळी एकटं एकटं फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये आर्त, उत्कट सूर..
चालू नये सहसा फार ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी तर मिळवावेत हात..

जमल्यास चारचौघात बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी भांडावं उसळून..
आवडणार नाही पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी होऊ नये थोर..

घट्ट घट्ट बसलेल्याही सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी आणू नये आठी..
साकळू देऊ नये फार खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित होत जावं व्यक्त..

माणसांचं मनास लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका त्यांचासुद्धा भार..
तुटून जावीत माणसं एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा प्रत्येकालाच फोन..

ठेऊ नये जपून वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत असा गुंतवू नये प्राण..
जमा होत राहील सारखा पापणीआड थेंब,
इतकंसुद्धा मन लावून करू नये प्रेम..

श्वास घेणंसुद्धा अगदीच वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून जगण्याचा अर्थ..
वाटलं जर केव्हा सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे हे करून घ्यावं मान्य..”

इतकं समजावूनसुद्धा जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे, थरथरतात बाहुल्या..
आतून आतून सगळ्याचीच मग येत राहते चीड,
दिवस जितका सुटसुटीत तितकीच रात्र गिचमीड...
&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp&,nbsp
(२ नोव्हेंबर, २०११)

Wednesday, October 26, 2011

आणखीन एक युजलेस दिवस

लक्ष दुसरीकडे लागावं म्हणून त्याने पुस्तक वाचायला घेतलं. आना करेनिना. “All happy families resemble one another; Each unhappy family is unhappy in its own way.” पहिलंच वाक्य वाचून त्याने मनातल्या मनात टॉलस्टॉयला शिवी घातली नि डाव्या बाजूचे बंध तुटलेली चप्पल पायात सरकवून घराबाहेर पडला. तसं हे असं तडकाफडकी, कुणालाच न सांगता निघून जाणं नेहमीचच झालेल. त्यामुळे त्याचं असं पुस्तक भिरकावून निघून जाणं कुणालाच खटकलं नाही.
बिल्डींगच्या आवाराबाहेर पडल्यावर बाजूलाच असलेल्या मारुतीकडे पाहून त्याने हात जोडले. सवयीचा भाग म्हणून. तसं म्हटलं तर दिवसातल्या ९० टक्के गोष्टी तो सवयीचा भाग म्हणूनच करायचा. एकदा का माणसाला सवय झाली की जगणं एकदम सोपं होऊन जातं असं पूर्वी कुठेतरी वाचलेल्याचं आठवलं त्याला. नि त्याच्या मनात उगाचच एक वळणदार प्रश्नचिन्ह बनलं. मग गल्लीच्या टोकाशी असलेल्या चांभारापाशी येऊन थांबला. डाव्या पायातली चप्पल काढून त्याच्याकडे दिली नि चप्पल कशी शिवतात ते नीट न्याहाळू लागला. सगळ्याच गोष्टी अशा शिवता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं असा एक विचार उगाच त्याच्यात डोकावून गेला. पण तिकडे त्याने दुर्लक्ष केलं.
मग चप्पल घालून रस्त्याच्या कडेने, आज कुठे जायचं या विचारात चालू लागला. रस्त्यातले दगड पायाने उगाचच इकडे तिकडे उडवत. त्यातला एक दगड घरंगळत बरोब्बर समोरच्या गटाराच्या जाळीतून आत जाऊन पडला. ते बघून तो बेहद्द खूष झाला. एक युजलेस समाधान त्याच्या चेहरयावर पसरलं. जरा पुढे गेल्यावर फुटपाथच्या कडेला झोपलेल्या कुत्र्याकडे त्याचं लक्ष गेलं. आधी त्याला वाटलं जोरात जाऊन त्या कुत्र्याच्या पाठीत लाथ घालावी. पण जरा जवळ गेल्यावर त्याला उगाच त्याची दया आली. त्या कुत्र्याचा चेहरा त्याला ओळखीचा वाटला. त्याने मनाशीच म्हटलं, जाऊ देत. हाही कोडगा दिसतोय. लाथ घालण्यापेक्षा कुठल्यातरी बोथट गोष्टीने टोचावं याला. एकवेळ जोराची लाथ कोणी सहन करेलही, पण एकाच गोष्टीने एकाच जागेवर टोचणं नाही सहन होत हे त्याला अनुभवाने माहीत झालेलं.
अचानक तिथेच समोर असलेल्या डोसेवाल्याकडे त्याची नजर गेली नि आपण काहीच न खाता घराबाहेर पडलोय याची त्याला जाणीव झाली. मग तिकडे जाऊन त्याने मसाला डोश्याची ऑर्डर दिली. त्याला उगाच ३-४ वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. तेव्हाही असाच दिवस दिवस भटकायचा तो. फक्त तेव्हा खिशात पैसे नसायचे म्हणून उपाशीपोटी. त्यामानाने आता तशी चैनच. त्याने सावकाश डोसा संपवला. त्याच्या एकदम लक्षात आलं की, खात असताना त्याच्या डोक्यात कुठलेच विचार येत नाहीत. म्हणून त्याने अजून एक डोसा मागवला. पोट भरल्यावर त्याला थोडं प्रसन्न वाटू लागलं.
तसाच चालत चालत कबुतरखान्यापाशी आला. तिकडे पसरलेली गर्दी बघितली नि स्टेशनला जायचा विचार त्याने सोडून दिला. इतकी सगळी माणसं बघून त्याला अमाप कंटाळा आला. म्हणून तो जवळच्याच पुस्तकांच्या दुकानात शिरला. काहीतरी छान वाचावं म्हणून त्याने बालकवींचं पुस्तक हातात घेतलं. ते चाळत असताना एका ओळीपाशी त्याची नजर खिळली. निष्प्रेम मनाला कोठेही सुख नाही. मनातल्या मनात पुन्हा एकदा ते वाक्य घोळलं – निष्प्रेम मनाला कोठेही सुख नाही. त्याला बालाकवीन्चा प्रचंड राग आला. म्हणून त्याने चिडून पुस्तक मुद्दाम उलटंच रॅकमधे सरकवलं, मनातल्या मनात एक शिवी हासडली नि तिथून बाहेर पडला.
बाहेर पडल्या पडल्या त्याला आपल्या वागण्याचं एकदम हसूच फुटलं. मागे पाहिलेल्या एका नाटकातलं वाक्य उगाच त्याला आठवलं - Nothing is funnier than unhappiness, it's the most comical thing in the world. And we laugh, we laugh, with a will, in the beginning. But it's always the same thing. Yes, it's like the funny story we have heard too often, we still find it funny, but we don't laugh any more. “खरंच्ये च्यायला !” असं पुटपुटला नि चालू लागला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीत त्याची नजर गेली. तिथे एक जोडपं त्यांच्या गोंडस, गोजिरवाण्या लहान मुलाला भरवत होतं. एरवी त्याला एकदम मस्त वाटलं असतं. कारण लहान मुलं त्याच्या अगदी विशेष आवडीची. पण आता त्याला उगाच सकाळचं वाक्य आठवलं.. All happy families resemble one another.. आता तर त्याला खुपच राग आला. “हा टॉलस्टॉय काय पाठ सोडत नाही भोसडीचा!” असं दात चावून म्हणाला नि समोरच उभी असलेली बस पकडली. कुठली तेही पाहिलं नाही. म्हणून मग २५ चं तिकीट काढलं. ही एक बेस्टने त्याच्यासारख्या माणसांसाठी केलेली सोयच!
बसमध्ये चढल्याचढल्याच त्याला खिडकीपाशी जागा मिळाली नि त्याचा चेहरा एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसरा बनला. कॉलेजमधली एक मुलगी तर त्याला इतक्याचसाठी आवडायची की तिने त्याला एकदा स्वत:हून खिडकीपाशी बसायला दिलेलं. तो मागे जाणारया गर्दीकडे मग टक लावून बघत बसला. त्याचाही कंटाळा आल्यावर दप्तरातून त्याने उगाचच कॅल्कलसचं पुस्तक काढलं नि एका गणितात डोकं खुपसलं. पुढच्या बसस्टॉपला एक तंग फोर्मल्स घातलेली, डोळ्याला गॉगल लावलेली एक मुलगी त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याच्या हातातल्या पुस्तकाकडे तिने पाहिल्यासारखं केलं नि मग मोबाईलवर काहीतरी टाईप करत बसली. आधीच परफ्युमचा प्रचंड वास त्याच्या डोक्यात गेला होता. त्यात तिने केस मोकळे सोडल्यावरचा सुवास येऊ लागल्यावर तर त्याला अगदीच राहावलं नाही. शेवटी तो उठला. उठताना नकळत तिच्या शर्टाच्या दोन बटणातून त्याची नजर आत शिरली. तसं त्याला स्वत:चीच प्रचंड चीड आली. मागच्या दरवाजाकडे उतरायला जाऊ लागला आणि त्याची नजर समोरच्या पाटीकडे गेली. “कृपया पुढे सरकत रहा.” हे वाक्य त्याच्यासाठीच लिहिलंय असं क्षणभर त्याला वाटून गेलं नि विचारांची एक अख्खी रांग त्याच्या डोक्यातून पुढे सरकली. पुढे जात रहाणं खरंच इतकं सोपं असतं? एकट्याला शक्य असेलही कदाचित, पण सर्वांना घेऊन पुढे जाणं निव्वळ अशक्य. त्यापेक्षा हवं त्या ठिकाणी मागच्या बाजूने उतरणंच बरं, असं ठरवून त्याने धावत्या बसमधूनच उडी टाकली.
बाजूलाच एकदम चकचकीत वातावरण. काळ्या काळ्या काचांच्या दोन उंच इमारती. कुठल्या तरी बड्या विदेशी कंपनीचं आवार. पॉश गाड्या. स्वच्छ रस्ते. युनिफॉर्म घातलेले रखवालदार. बाहेरच्या टपरीवर दिमाखात सिगरेट ओढत खिदळत असलेले तरुण-तरुणी. त्याला उगाच कसंतरी वाटू लागलं. सहजच आवारात लावलेल्या फुलझाडांवर त्याची नजर गेली. सफेद, निळी, गुलाबी, जांभळी अशा बरयाच रंगाची फुलं होती तिथे. इतके सगळे रंग एकत्र पाहून त्याला एकदम ओकारीसारखं झालं. म्हणून त्याने चालण्याचा वेग वाढवला.
लोअर परेल स्टेशनच्या जवळ फूटपाथपाशी आपोआपच त्याचा वेग मंदावला. उघड्यावर मांडलेले संसार, विटांच्या चुलीवर उकळत असलेलं कसलं तरी कालवण, पोटं पुढे आलेली, काळीकुळकुळीत नागवी पोरं, गालहाडं नि कानाशिलाच्या जागी खळगी झालेली म्हातारी सगळं काही शांतपणे बघत तो पुढे चालत राहिला. एरवी त्याच्या डोक्यात भलेमोठे भोवरे तयार झाले असते. न्याय-अन्याय, श्रीमंत-गरीब वगैरे वगैरे. पण आज मात्र त्याला आपण एकदम बारकं असल्याची एक युजलेस जाणिव होत राहिली. पुढे जाताजाता “तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे |” इतकं पुटपुटला नि निर्विकार चालत राहिला.
पुढे एका मॉलपशी येऊन पोचल्यावर त्याला थोडा थकवा जाणवला. तसा तिथेच थोडा वेळ उभा राहिला. बाजूच्या दुकानाच्या काळ्या काचेत बघून त्याने केसांचा भांग नीट केला. त्याचे खोल डोळे त्या काचेत एकदम चमकत होते. त्याला पूर्वी कुणीतरी म्हटलेलं, तुझे डोळे एखाद्या विचारवंतासारखे एकदम पाणीदार आहेत. ते आठवलं अचानक. सारखा विचार केला म्हणजे डोळ्यात पाणी येणारच असं उगाच त्याच्या मनात येऊन गेलं.
मग तसाच त्या काचेत तो एकटक बघत राहिला. आता त्याला त्याच्या जागी एक उच्चशिक्षित प्रोफेसर दिसू लागला. गिरगावात आपण एका मोठ्या फ़्लॅटमधे राहत आहोत, सगळीकडे हसण्याचा, खिदळण्याचा आवाज ऐकू येतोय असं दिसू लागलं. त्याने अनेक सुखवस्तू घरांमध्ये पाहिलेलं तसं चकचकीत, आनंदी वातावरण. इतक्यात काचेमागे काहीतरी हललं नि तो भानावर आला. फिराकचा एक शेर त्याच्या पापणीत भरून राहिला. “दिखा तो देती है बेहतर हयात के सपने.. खराब हो के भी ये जिंदगी खराब नही.” काय पर्फेक्ट ठिकाणी आपल्याला हा शेर आठवला याचं आणखीन एक युजलेस समाधान त्याच्या भुवईवर उमटलं.
तिथून निघताना त्याला स्वत:चा चेहरा अगदी स्पष्ट त्या काचेत दिसला. वर आलेली गालहाडं, लांबत बनत चाललेला चेहरयाचा आकार, खोल खोल आणि तरीही स्वप्नाळू डोळे हे सगळं बघून अगदीच थकून गेल्यासारखं वाटलं. पण अजून बराच दिवस शिल्लक होता. मग रस्त्याच्या कडेला जाऊन, गटारापाशी छाती दाबून तो खोकू लागला. शेवटी कफाचा एक मोठा बेडका थुंकल्यावर त्याला थोडं बरं वाटू लागलं. थोडीशी गिचमीड कमी झाल्यासारखी वाटली. मग चर्चगेटची बस पकडली नि शेवटच्या स्टॉपला उतरला.
तिथून चालत चालत मग मारीन ड्राईव्हवर. अथांग पसरलेला अरबी समुद्र त्याला प्रचंड आवडायचा. इतका की माणसं, पुस्तकं आणि समुद्र यातलं काय जास्त आवडतं असं जर कोणी विचारलं असतं तर त्याने जराही वेळ न लावता समुद्र असं उत्तर दिलं असतं. बुडत चाललेला लालातांबुस सूर्य आणि तसंच पिवळसर तांबूस, अस्थिर पाणी, दूरवर आपल्याच नादात हलत असलेल्या होड्या, समुद्राच्या आतापर्यंत घुसलेली जमीन, मोठमोठाले दगड, उंचच्या उंच वाढलेल्या इमारती, भरधाव चाललेल्या आलिशान गाड्या.. हे सगळं बघून त्याला अजूनच बारकं बारकं वाटू लागलं. मग बराच वेळ तो दगडांपाशी येऊन फुटणारया लाटांकडे एकटक बघत बसला. त्या लाटांचं असं संथपणे एकामागून एक येणं, दगडावर आदळून फुटणं, फेसाळणं आणि गडप होणं या सगळ्याचा त्याला विलक्षण हेवा वाटू लागला. सर्वांनाच कुठे सापडतात असे किनारे असा एक विचार उगाच त्याच्या मनात आला, पण तो त्याला तितकासा प्रिय वाटला नाही. म्हणून कपडे झटकून तो चालायला लागला. पुन्हा एकदा दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशाने भरून राहिलेले रस्ते, हवेत भरून राहिलेला खारट वास आणि गाड्यांचा गोंगाट हे सगळं साठवून घेतलं नि समुद्राचा निरोप घेतला.
मग चालत चालत फौंटनजवळ येऊन पोचला. एक वडापाव पोटात ढकलला, उसाचा रस प्यायला नि कामावरून सुटलेल्या, घाईघाईने परतणारया लोकांचे चेहरे बघत बघत सी.एस.टी.ला येऊन पोचला. ठाण्याला जाणारी ट्रेन पकडली. नेहमीप्रमाणे त्याला चौथ्या सीटवर बसायला मिळालं. यापलीकडे तो कधी अपेक्षासुद्धा नाही करायचा. समोरच एक जोडपं उभं होतं. ती बाई त्या माणसाला ट्रेनमधल्या गर्दीवरून बडबडत होती. ट्रेनऐवजी टॅक्सीने गेलो असतो तर असं काहीतरी चालू होतं त्यांचं. मग किंचित रडारड. मग ती बाई गप्पच बसली. तिचा नवरा बरंच समजावत होता आणि तिचं मौनव्रत. बोलणारया माणसांपेक्षा न बोलताच माणसं जास्त दुखावतात हे पुन्हा एकदा त्याला पटलं. त्याला पुन्हा टॉलस्टॉय आठवला. मग पुन्हा टॉलस्टॉयला शिवी. अर्थातच ती बाई दिसायला बरयापैकी होती म्हणून तो आपुलकीने ते सगळं इतका वेळ बघत होता. एरवी ट्रेनमधल्या माणसांचे मरगळलेले चेहरे त्याला नकोसे होऊन जायचे. पण त्याहूनही त्याला सतत आनंदी दिसणारे, चेहरयावर दु:खाची एकही रेष नसलेले लोक आणखीन परके वाटायचे. स्टेशनवर उतरल्यानंतर त्याने सरळ घर गाठलं.
घरात शांतता होती. आश्चर्यच. त्याने थोडं खाकरल्यासारखं केलं. फुकट गेलं. कोपरयात पाहिलं तर टॉलस्टॉयचं पुस्तकं तसंच दुमडून पडलेलं. ते उचललं, सरळ केलं नि कपाटात ठेऊन दिलं. मग खिडकीपाशी जाऊन चिमण्यांचं घरटं बघत बसला. त्या तरी चिवचिव करतील असं वाटलं त्याला. पण तिथेही नुसताच शुकशुकाट. खिडकीत लावलेलं तुळशीचं रोपटं अगदीच सुकून गेलंय हे त्याच्या लक्षात आलं. पण ते त्याला तितकंसं महत्त्वाचं वाटलं नाही. मग थोड्या वेळाने स्वयंपाकघरात जाऊन जेवण घेतलं. पोटात ढकललं. गॅलरीत बराच वेळ येरझारा घातल्या. मग डायरी काढली. तारीख टाकली आणि नोंदवलं –
आणखीन एक युजलेस दिवस!
-------------------------------------------------------------------------------
शतानंद
मन करा रे प्रसन्न / सर्व सिद्धीचे कारण /
मोक्ष अथवा बंधन / सुखसमाधान इच्छा //

taap

taap haa kantalyaachaa baap aahe...

Wednesday, October 5, 2011

वाढदिवस

उठल्यासुठल्या देऊ नको गं भान मला वाढत्या वयाचे
असेच असते वयास चुकवित... फुलावयाचे...
(बा. भ. बोरकर)

Saturday, September 17, 2011

सायकल

मला आईचा केव्हा केव्हा खूप राग येतो. म्हणजे मी छानपैकी झोपलेलो असताना ती जागं करते तेव्हा, किंवा मग 'दात घास' म्हणून पाठीशी लागते तेव्हा, किंवा 'आधी दूध पी' म्हणून ओरडत असते तेव्हा, किंवा तसलं काहीही! पण त्याहूनही जास्त राग तेव्हा येतो जेव्हा ती 'सायकल शीक.. सायकल शीक' असा जप सुरू करते. म्हणजे याऐवजी जर तिने 'ॐ नम: शिवाय' असा जप केला असता ना तर एव्हाना शंकरराव प्रसन्न होऊन प्रकटसुद्धा झाले असते!

तर आज पण एकदम तसंच झालं. म्हणजे आई दादरवरून खरेदी करून आली आणि मी समोर दिसताच लगेच जप सुरू झाला 'सायकल शीक.. सायकल शीक'. ६ अक्षरी मंत्र! बरोब्बर!! तेव्हा माझ्या डोक्यात शंकरराव खरोखर प्रकट झाले तर आई काय करेल ते सगळं चालू झालं. मग ती हात जोडून शंकररावांना म्हणेल की - आमच्या रामला सुबुद्धी वगैरे दे, किंवा आमच्या रामचा पहिला नंबर वगैरे येऊ दे, किंवा आमच्या रामला सायकल वगैरे चालवता येऊ दे, किंवा तसलं काहीही!

तर आई आमच्या समोरच येऊन बसली आणि चालू... "मला साधी भाजी आणायला एवढी पायपीट करावी लागते, त्याचं कुणालाच काही नाही. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून १ लाख वेळा तरी 'सायकल शीक' म्हणून सांगितलं असेल तुला. एव्हाना शिकला सुद्धा असतास."

तर हे ऐकून मी १ लाख म्हणजे एकावर किती शून्य - पाच की सहा, याचा विचार करत बसलो. हातात भस्मासुराचं पुस्तक होतं म्हणून. नाही तर बोटांवर लगेच मोजली पण असती पाच की सहा शून्यं ती! मी काही बोलत नाही हे बघून मग आईचा पारा की काय म्हणतात तो चढला. मग ती अजूनच चिडून बोलली, "आज साध्या कोथिंबीरीच्या जुड्यांसाठी पण मला इतक्या लांब जावं लागलं आणि तू आपला बसला आहेस राजासारखे पाय पसरून, तो भस्मासूर की फस्मासूर वाचत."

म्हणजे मी भाजी आणावी म्हणून सायकल शिकवतायत तर हे मला. म्हणूनच असणार. मग तर मी मुळीच नाही शिकणार. कारण तिथे ती मावशी मी जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा तेव्हा माझे गाल एक फूट तरी ओढते आणि त्याहूनही म्हणजे मला बाळ वगैरे म्हणते. हे म्हणजे तर अतीच! म्हणजे मला एक वेळ राम ऐवजी रावण(!) म्हटलं तरी चालेल. पण बाळ काय? मी मोठा झालोय आता. यावर्षीपासून तर मी शाळेत एकटासुद्धा जाणार आहे. इयत्ता ५वी 'अ'. तर मी हे आईला सांगितलं तर तिचं पुन्हा चालू झालं,

"बरोबरच आहे. तुला सायकल नाही येत ना चालवता अजून, मग लहानच आहेस तू अजून. बाळच एकदम!"

"म्हणून काय झालं? शेजारच्या कामत आजींना पण नाही येत सायकल चालवता. मी कालच विचारलं होतं. त्यांना नाही कुणी बाळ म्हणत!"

हे ऐकलं आणि मग आई जे बोलली ते बोलली. पुढला तासभर मग भजन, कीर्तन वगैरे सारं काही. आमच्या आईचं हे एक बरं की ती एकट्यानेच वाट्टेल तेवढा वेळ बोलू शकते, फक्त समोर कुणी तरी ऐकणारं असलं पाहिजे. आणि त्यातही ते ऐकणारं म्हणजे मी असलो की तर विचारूच नका. तर बर्‍याच वेळाने आई थोडी शांत होणार अशी चिन्हं दिसू लागली आणि नेमके आमचे दादोजी कोंडदेव दारात अवतरले.

"काय? इतका वेळ कुठे गड लढवत होतात?" आईचा गडगडाट सुरूच.

दादाने घरातला आणीबाणीचा प्रसंग लगेच ओळखला असणार, आणि त्यात मी भस्मासूराचं पुस्तक उलटं पकडलंय हे देखील त्याच्या चाणाक्ष चक्षूंनी पाहिलं असणार. तो प्रसंगावधान वगैरे राखून लगेच म्हणाला,

"तूच म्हणाली होतीस की आजपासून क्लासला सुट्टी आहे, तर रामला सायकल शिकव म्हणून! सायकल पंक्चर झाली होती म्हणून मग 'नटसम्राट'कडे गेलो होतो पंक्चर काढायला."

तर 'नटसम्राट' म्हणजे आमच्या शाळेजवळ 'सुंदर सायकल मार्ट' आहे ना त्याचा मालक. श्यामसुंदर. स्वच्छ, काळाकुळकुळीत. पण सुंदर! याच्याजवळ सगळ्या प्रकारचे पाने आहेत. त्यामुळे हा कुठलाही नट अगदी दोन सेकंदात टाइट करून सोडतो. तर म्हणून यास 'नट'सम्राट असा किताब मिळालाय. हे मला आमच्या वर्गातल्या मुकुंदाने सांगितलं होतं एकदा.

तर दादाचं बोलणं ऐकलं आणि त्याबरोबर आईचा पट्टा परत सुरू झाला. मग दादोजी कॊंडदेव क्रूरपणे हसून आत गेले. मला असला राग आला ना त्याचा. असं वाटलं की मी भस्मासूर असायला हवं होतं. मग मी सगळ्यात आधी त्या डबलदांडीच्या सायकलवर हात ठेवून ती भस्म करून टाकली असती आणि मग आमच्या दादोजींच्या मागे लागून त्यांना पळता भुई थोडी केली असती. मग गेले असते ते कैलास पर्वतावर लपायला. ते कैलास पर्वतावर लपणार, इतक्यातच आईने माझ्या हातातलं पुस्तक काढून घेतलं आणि जवळजवळ किंचाळलीच-

"ऊठ आधी या खुर्चीवरून. एक अक्षर ऐकत नाहीस. श्रीरंगा, इथे ये आणि घेऊन जा आधी याला खाली. बघतेच कसा शिकत नाही तो सायकल."

"पण माझे पाय पोचत नाहीत गं जमिनीवर." मी अगदी कळवळून बोललो.

"मी आहे की मागे धरायला." दादोजींनी मध्ये चोच खुपसलीच.

"पण तरी पण.. मला.."

"पण नाही नि बीण नाही. जा रे याला घेऊन खाली. पडला तरी चालेल, पण सायकल आली पाहिजे. जा आधी."

मग काय, सपशेल शरणागती! शेवटी आम्हांला जावंच लागलं. आमच्या चाळीच्या बाजूलाच खूप मोठी जागा आहे. दुपारी गाड्या वगैरे नसतात ना म्हणून मोकळी असते ती. तिथे आम्ही येऊन पोचलो. मग दादोजींनी आम्हांस उपदेश करायला सुरूवात केली.

"हे बघ हा डावीकडचा ब्रेक आहे ना तो मागच्या चाकाचा आणि उजवीकडचा आहे ना तो पुढच्या चाकाचा."

आमचे दादोजी वेडपटच आहेत. सायकलला दोनच तर चाकं असतात! मग मला एकदम सायकल विकत आणली होती ना तो दिवस आठवला. सर्वात जास्त उड्या मीच मारल्या होत्या त्या दिवशी. पण त्यानंतर सायकलची घंटी कशी वाजवायची ते सोडून बाकी काहीच शिकलो नाही मी. मला सगळे 'ढ' म्हणतात ते उगीच नाही.

"लक्ष कुठंय तुझं? हे बघ तुझे पाय नाही पोचत ना सीटवरून, तर कैचीने चालवायला शीक आधी. हे बघ, उजवा पाय या दांडीतून आत घुसवून त्या पॅडलवर ठेवायचा आणि डावा पाय या पॅडलवर. मग अर्धा अर्धा पॅडल मारत जायचं."

"मला नाही जमणार हे असलं. मी सीटवर बसूनच चालवणार."

"तर तर औरंगजेबच ना तू! म्हणे सीटवर बसूनच चालवणार."

"मी नाही चालवत जा मग. मी सांगेन आईला सगळं."

"घे रड्या. बस सीटवर. पण पॅडल हळू मार. समजलं?"

मला वाटलेलं दादोजी नाही म्हणतील. पण कसलं काय? आता सुटका नाही. का नाही?

मग बसलोच मी सायकलवर. श्रीशंकराचं नाव घेतलं आणि मारला पॅडल. दादोजींना सायकल धरून धावावं लागत होतं माझ्यासोबत, हेच काय त्यातल्या त्यात बरं. मग दादोजी कोंडदेवांच्या अगणित सूचना- 'दोन्ही हॅंडल घट्ट धर.' 'हात ब्रेकवर ठेव.' 'समोर बघून चालव.' 'कुणी समोर आलं तर घंटी वाजव.' 'कधी पण मागचा ब्रेक दाबायचा.' वगैरे वगैरे. हे असं बराच वेळ. मग आम्ही घरी आलो आणि आईने बनवलेला गरम गरम शिरा फस्त केला. मग दुसरे दिवशीपासून मी स्वत:च दादोजींसोबत जाऊ लागलो. हे असं शनिवारपर्यंत.

मग रविवारी दुपारी जेवून वगैरे झाल्यावर, दादोजी आम्हाला डबलसीट शाळेच्या ग्राऊंडवर घेऊन आले आणि दिली हातात सायकल. मी आपला नेहमीसारखा सीटवर बसलो. दादोजी मागे पकडून. मग हळू हळू पॅडल मारत सायकल पुढे नेली. "आणखी जोरात मार." दादूजी मागून ओरडत होते. मग मी अजून जोरात पॅडल मारून पुढे गेलो. आणखी. आणखी.

थोड्या वेळाने दादोजींचा आवाजच नाहीसा झाला. म्हणून आम्ही मागे वळून बघितलं तर काय, दादोजी त्या टोकाला. म्हणजे मी स्वत: सायकल चालवली तर एवढी! मग मला जी मजा आली ती आली. आता मी छाती ठोकून आईला सांगणार आहे, मला येते आता सायकल चालवता. मी मोठा झालो आता. पण भाजी आणायला नाही जाणार मी मुळीच. मी शाळेतसुद्धा घेऊन जाईन आता सायकल. मग 'विक्रमवीर चिंटू'सारखी मी पण ३ दिवस ३ रात्र न थांबता सायकल चालवू एक दिवस. मग बघतोच कोण मला 'ढ' म्हणतं ते.

माझ्या डोक्यात असं सगळं चालू असताना अचानक काय झालं कुणास ठाऊक. दोन्ही बाजूंनी आवाज करत जाणारा वारा एकदम गप्पच झाला. आणि माझ्या डोळ्यांसमोर नुसता अंधार अंधार. नाकातोंडाला, शर्टाला, पॅंटला धूळ, माती लागलेली. कोपरातून नि गुडघ्यांतून रक्त यायला लागलेलं. मग तशाच हातांनी डोळे चोळत चोळत मी भर मैदानातच मांडी घालून बसलो. इतक्यात दादोजी माझ्यापर्यंत येऊन पोचले आणि अक्राळ विक्राळ हसत मला उपदेश करू लागले, "हा तुझा शेवटचा धडा! सायकल चालवताना इकडे तिकडे नाही बघायचं!"

वा रे वा! काय पण उपदेशाची वेळ! म्हणजे आपला सख्खा भाऊ इथे भर मैदानात धारातीर्थी पडलाय आणि हे हसतायत. त्याचं ते भयानक हसणं बघून तर मला अजूनच चिडायला झालं आणि रडायला पण आलं. तर हा परत सुरूच- "चल रे रडया. काही नाही झालंय. नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय कुणी पोहायला शिकतं का? तसंच कोपर, गुडघे फुटल्याशिवाय कुणाला सायकल नाही येत चालवता. समजलं. पुरे आता."

हे म्हणजे अतीच होतं. शेवटी मी स्वत:च उठलो. शर्ट नि पॅंट धुळीने माखलेली. ती झाडली. मग डोळे पुसले. तर दादोजींनी मलाच परत बसवलं सायकलवर. मग काय दात-ओठ-जीभ वगैरे सगळं खाऊन बसलो नि सायकल चालवत चालवत मैदानाच्या तोंडाशी नेली. मग दादोजी धावत आले आणि म्हणाले, "थांब. रस्त्यावरून मीच नेतो." मग मी चिडून त्याला म्हटलं, "मी आईला तुझं नाव सांगणार आहे बघ."

तर त्याने उजवा हात हवेत उडवून वगैरे म्हटलं, "सांग जा. आईला माहिती आहे माझं नाव. आम्ही नाही घाबरत तुला. तैमूरलंग कुठचा!"

मग तर मला अजूनच रडू आलं. मग शेवटी दादोजी नि मी डबलसीट घरी आलो. आज रविवार असूनपण घरी कुणीच नव्हतं. आई-बाबा दोघंही बाहेर. मग तर मला अजूनच रडू आलं. मग तसाच सोफ्यावर पडलो आणि जे झोपलो ते झोपलोच. मग रात्री आईने मला जवळ बोलावलं. मग औषध लावलं. मग मी आधी दादोजींबद्दल सांगितलं. तो किती दुष्ट आहे ते सगळं सविस्तर सांगितलं. तर आईने नुसतं 'हं' म्हटलं. मग ती म्हणाली, "हात-पाय दुखत असतील ना? ये मी तेल लावून देते."

मग मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसलो. एकदम थकल्यासारखं वाटत होतं. मग मी आईला म्हटलं, "आई, आज मी मोठा झालो. मला सायकल चालवता येते आता."

"हो बरं. पाहिलं मी आणि बाबांनी. एका ढ मुलाला जमली बुवा सायकल चालवायला."

"म्हणजे? तुम्ही कसं पाहिलंत?"

"म्हणजे तू पडलास ना तेव्हा आम्ही समोरच बसलो होतो, मैदानाच्या कठड्यावर. 'ढ' कुठचा!"

मी मनातल्या मनात १५१ वेळा तरी जीभ चावली असेल. मग आठवलं, मी रडताना समोरच निळी साडी नेसून होती ना ती आईच होती नि सफेद शर्ट घालून होते ना ते बाबा. ते हातसुद्धा दाखवत होते दोघे. आयला, आम्ही 'ढ'च १ नंबरचे. म्हणजे शंभर 'ढ' जर एकत्र आले ना, तर जो मोठ्ठा ढ बनेल ना तोच असणार मी. मग मी काहीच बोललो नाही. मग आपोआपच डोळा लागला. मग डोळ्यांसमोर सगळं येऊन उभं राहिलं. आई, बाबा, दादोजी, सायकल आणि त्यांच्याभोवती एक मोठ्ठा 'ढ'.

[http://www.manogat.com/diwali/2010/node/25.html इथेही आहे]

Sunday, August 28, 2011

शाळा

काल बरयाच दिवसांनी नव्हे महिन्यांनी नव्हे वर्षांनी शाळेपाशी गेलेलो. मोबाईलमधून फोटो काढला. एका दुसरया मजल्यावर उभ्या असलेल्या मुलाला डोळा मारला आणि चिडवून दाखवलं. म्हणून आठवण झाली या कवितेची आणि इतर खूप खूप गोष्टींची. एकदम नॉस्टॅल्जिक की काय म्हणतात तसं काहीतरी. कविता म्हणून चांगली नसेलही पण तरीही आमच्याकरता अतिशय खासच. तर असो. शाळा! शाळाच!!! एवढंच. इतकंच.

रडतच आलो येताना
अन निरोपही घेताना,
येताना निष्पर्ण होतो
बहरून गेलो जाताना.

शाळा म्हणजे नसते ईमारत
चुना-विटांचा खोल्यांची
शाळा असते दुसरी आई
लहान-मोठ्या सारयांची.

८वीतच ओळख झालेले
अनोळखीच चेहरे
तीन वर्षांतच वाटू लागले
आपलेच सगेसोयरे.

किती मोहक आपली
ही नाती असतात
रक्ताच्या नात्यांहूनही
जवळची भासतात.

मैत्री, सहजीवन सारे
इथेच तर अनुभवले
डबेच काय सुखदुखही
आपण वाटून घेतले.

इथेच तर रडलो होतो
मार्क कमी पडले म्हणुन,
दुसरयाच क्षणी हसलो होतो
"त्याने कुठे अडले" म्हणून !

त्या वक्तृत्वस्पर्धा अन
तो क्रिकेटचा खेळ
प्रयत्नपूर्वक पकडलेले
अन सोडलेले काही झेल.

येथेच खिडकीतुन पाहिली
झाडे-झुडुपे अन फुलेसुद्धा
समोरची दुकानं, घरे
इतकेच काय पण मुलीसुद्धा !

येथेच केल्या खोड्या नि
दिला शिक्षकांना त्रास
येथेच तर मारल्या थापा
नि दिल्या शिव्या तासन-तास !

कॅंटीनमधील समोसा,
इडली-सांबाराचा स्वाद
भांडणतंटे, कट्टीबट्टी
अन शिक्षकांशी केलेले वाद

तो तोडलेला बेंच अन
ते वाकवलेले पंखे,
शाळॆचीच तर आठवण
करुन देतात सारखे...

का शाळेमधील असतात या
काही वर्षांच्या भेटी
ती तर असतात सुह्रदांची
जन्मोजन्मींची नाती.

तरीही दडलेल्या असतात
याच भेटींच्या पोटी
नेमक्या ठरवलेल्या
'वक्तशीर' ताटातुटी !

(२००४)

Friday, July 15, 2011

संभाषण : एक गरज

अंतोन चेकॉव्हची 'मिझरी' (Misery ) नावाची एक गोष्ट वाचलेली. त्याचा नायक, अयोना पोतापाव्ह ( Iona poatapav ) हा एक गरीब टांगेवाला असतो. त्याचा मुलगा आदल्या दिवशी मरण पावलेला असतो. पण हातावर पोट चालत असल्याने त्याला धंदा चालू ठेवणं भाग असतं. मग टांग्यात बसलेल्या प्रत्येकाला तो आपल्या मुलाच्या निधनाबद्दल सांगायचा प्रयत्न करतो. पण जो तो स्वत:च्याच चिंता, दु:खं यात बुडून असतो. अयोनाचं दु:ख ऐकायला कोणाकडेच वेळ नसतो.शेवटी कुणीच आपल्या सोबत शोक व्यक्त करायला नाही हे पाहून अयोना आपल्या घोड्याला मुलाच्या मृत्युची हकीकत सांगू लागतो. कुठलाही निष्कर्ष न काढता इथेच कथा संपते. मागे नवनीत की कुठल्या तरी वहीच्या मागे हे वाचलेलं If animals could talk, the world would lose its best listeners. ते पटतं एकदम.

याउलट अशीच उद्धव शेळके यांची एक कथा वाचलेली. 'दु:ख' म्हणून. कथेचा नायक (नाव आता आठवत नाहीये म्हणून 'राम' म्हणतो) , राम हा एका हॉटेलात वेटरचं काम करत असतो. पण वेटर म्हणून काम करणं त्याला आवडत नसतं. दुसरी एखादी चांगली नोकरी शोधण्यासाठी तो धडपडत असतो. शेवटी एके दिवशी पोलीस भरतीच्या परीक्षेत तो पास होतो आणि त्याला तिथे नोकरी मिळणार असते. ही आनंदाची बातमी कधी कुणाला सांगतो असं त्याला होऊन जातं. मग हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या मालकाला सांगण्याच्या उद्देशाने म्हणून तो मालकाजवळ जातो, तर मालक खेकसून त्याला कामाला लागायला सांगतो. मग सोबत काम करणारयास सांगावं म्हणून प्रयत्न करतो तर त्यालाही वेळ नसतो. शेवटी रामची नेहमी विचारपूस करणारा एक गिर्हाईक हॉटेलमध्ये शिरतो तसा तो एकदम खुलून जातो. पण त्या माणसासोबत एक बाईसुद्धा असते. त्यामुळे आज तो काही न बोलता फक्त ऑर्डर देऊन मोकळा होतो. तो हॉटेलमध्ये असताना कधी एकदा आपली बातमी त्याला सांगतोय असं रामला होऊन जातं. शेवटी तो निघताना घालमेल अनावर होऊन राम त्याला सांगतो की त्याला पोलिसात नोकरी मिळाली म्हणून. तर तो इसम ओळखही न दाखवता निघून जातो आणि रामच्या डोळ्यात पाणी तरळतं.

पहिली कथा दु:ख कुणाला तरी सांगण्याबद्दलची तर दुसरी सुख सांगण्याबद्दलची. शेवट मात्र सारखाच. आपलं ऐकायला कुणीही नसणं याच्याइतकं एकटेपण किंवा सल दुसरा कुठलाच नसावा. मागे कुठेतरी ऐकलेलं, Girls always need a listener म्हणून. ते बदलून Everyone always needs a listener असं करावसं वाटतं. ज्यांना असं ऐकणारं कुणी मिळत नाही ते दुर्दैवी, आणि ज्यांना मिळतं ते खरे भाग्यवान. इतकी सारी सामाजिक जाळी विणणारी संकेतस्थळे, वैचारिक, सांस्कृतिक इ-कट्टे वगैरे यासाठीच नाही का?

मला माझाच पुण्यातील पहिला आठवडा आठवतो. संध्याकाळपासून इ.एस.आय.च्या खोलीत एकटा असायचो. त्यात भ्रमणध्वनी खराब. त्यामुळे वैतागून पहिल्याच दिवशी मी डायरीत लिहिलेलं, 'मला एका दिवसात कळून चुकलंय की मी मुळीच एकटा राहू शकत नाही.'आणि थॅंकफुली मला नंतर एकही दिवस एकट्याने राहावं लागलं नाही. संभाषण ही इतकी महत्वाची गरज आहे हे तेव्हा कळलं.

बाकी या निमित्ताने माझी बडबड सतत ऐकून घेणाऱ्या, माझी भिकारातली भिकार कवितासुद्धा शांतपणे ऐकून घेणाऱ्या, पाणचटाहून पाणचट पीजे सहन करणाऱ्या, फोनवर किंवा कट्ट्यावर तासनतास गप्पा मारणाऱ्या आणि गप्प गप्प राहिलो तर प्रसंगी शिव्या घालून मला बोलतं करणाऱ्या सर्व मित्रमंडळीना एकदा भयंकर धन्यवाद.

................................शतानंद
मन करा रे प्रसन्न / सर्व सिद्धीचे कारण /
मोक्ष अथवा बंधन / सुखसमाधान इच्छा //

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!