Wednesday, December 20, 2017

Blankest Year

आज काहीतरी शोधताना जुनी डायरी सापडली. त्यात शेवटून दुसऱ्या पानावर ही कविता. कविता नाही फक्त ट ला ट.
Hunger Lining

आलिशान हॉटेलात बसून
welfare economics च्या
चर्चा करणारी मंडळी
acidity होईल म्हणून
ताटातलं अर्ध अन्न
तसंच शिल्लक ठेवतात...

आणि hunger indexच्या
आकडेवारीच्या कागदावर
कालचा शिळा भात आणि
उरलेली डाळ कालवत
रस्त्यावरची अर्धपोटी पोरं
आनंदाने जेवतात...
३० डिसेंबर,२०११

तेव्हा नुकतंच लाल शाईचं फौंटन पेन घेतलं होतं, त्याने लिहिलेली. तेव्हा काही महिने फार वापरली लाल शाई. आता काळी किंवा निळीच वापरतो. अर्थात कुठल्याच रंगाने तसा काही फार फरक पडत नाही. अक्षर जसं यायचं तसंच येतं. विचार मात्र बदलू शकतात कदाचित. असो. त्यावेळेस कुठलं तरी poverty वरचं पुस्तक वाचलेलं, म्हणून लिहिली असावी. कुठलं पुस्तक तेही आता आठवत नाही च्यायला. तसंही पुस्तकाच्या पानांमधून गरिबी समजून घेणं ही चुत्येगिरीच. आणि त्यावरून ट ला ट जुळवत बसणं ही आणखीन मोठी चुत्येगिरी. असो.

नुकतंच एक मैत्रीण म्हणाली तू इतक्या शिव्या देत जाऊ नकोस, फार बरं नाही दिसत ते म्हणून. तर मी म्हटलं बरं. पण खरं तर तिने असं म्हटल्यावर एकदम हुतुतूतले आदी(सुनील शेट्टी) आणि पन्ना(तबू) आठवले.
आदी – गाली मत दिया कर यार. तेरे मूंह से अच्छी नही लगती.
पन्ना – क्यों किस करता है तो बास आती है क्या?
       ... तो तू सिगरेट छोड दे.
आदी - ... अच्छा एक बात बता ये सिगरेट पेहले आयी या करप्शन?
पन्ना – सिगरेट.
आदी – कैसे?
पन्ना – सिगरेट में नशा है. नशेमें power है. Power में करप्शन.
च्यायला हे खरं लॉजिक. नाहीतर mathsमध्ये शिकवतात ती नुसती भंकस.
तिला विचारणार होतो तू हुतुतू पाहीलायस का? पण म्हटलं जाऊ देत च्यायला. नसेल पाहिला तर बरंच आहे. असले उदास करणारे सिनेमे खरं तर सेन्सॉर बोर्डाने येऊच नाही दिले पाहिजेत. पण आपलं सेन्सॉर बोर्ड येडझवं आहे. छान इंद्रियं चाळवणारे सिनेमे नको तेवढं कापतं आणि असले उदास करणारे सिनेमे मात्र येऊ देतं.

च्यायला परत शिवी! मी आता एक नियम बनवणारेय की किमान १० वाक्यांच्या मध्ये एकही शिवी लिहायची नाही. मग हे जमलं की २० वाक्यं. मग ३०.. ५०.. १००.. १०००.. १००००.. १ लाख.. १ कोटी.. १ अब्ज..
भेन्च्योद. इतकं कोण लिहिणार?

पण हुतुतूतला आदीचा एक dialogue मात्र मला फार आणि केव्हाही आठवत राहतो.
‘इन हंडीयो में सवाल बहोत उबलते है. ठीक कहते है वो, इस जनरेशन के पास सवाल बहोत है, जवाब कोई नही. जियो तो इस जहर भरे, करप्शन भरे माहोल में या फिर मर जाओ. साफ सुधरी हवा खाने के लिए जाएंगे भी तो कहा? पैसा, रुपया, आराम – आराम है मुझे? मेरा तो दम घुट रहा है. बस जी रहा हूं. जैसे कोई वक्त पुरा कर रहा हूं --- ’

च्यायला प्रत्येक वर्ष संपताना ही जाणीव अधिकाधिक तीव्र का होत जाते? कुठेही असलो, कुणाबरोबरही असलो तरी डोक्यात हेच..
बस जी रहा हूं. जैसे कोई वक्त पुरा कर रहा हूं ---

जाऊ देत पण हा विषय. जाऊच दे च्यायला---
विषय. वर्ष. आणि विष.
तिन्हीत व आणि पोटफोड्या ष कॉमन. आणि तीनही पचवणं जाम जाम अवघड.
तर विषय त्यातल्या त्यात बरा. कारण तो बदलता तरी येतो. वर्ष तर बदलत राहतातच. नकळत. आणि विष बदलून काय उपयोग? असो.

डायरीच्या सुरुवातीला ग्रेसच्या चंद्रमाधवीचे प्रदेश मधल्या कविता लिहिलेल्या. तेव्हा लायब्ररी लावलेली आणि दर महिन्याला पैसे लागतात म्हणून केवढी तरी पुस्तकं वाचायचो. आवडलं काही की जागून डायरीत उतरवून काढायचो. आता पुस्तकं विकत घेतो आणि कपाटात ठेवून देतो. तर ही फालतुगिरीच. तर त्यात ही कविता सापडली –
जे सोसत नाही असले
तू दु:ख मला का द्यावे
परदेशी अपुल्याघरचे
माणूस जसे भेटावे
मिटल्यावर डोळे मजला
स्मरतात निरंतर नाद
हाकांना मागावे का
त्यांचेच जुने पडसाद?

पडवीच्या देखाव्यातून
दिसतात मनाचे खांब
क्षितिजाच्या जवळी जाता
ते पुन्हा पसरते लांब ---
फार फार फार भयंकर कविता आहे ही. ऐकली की कुठे तरी भलतीकडेच नेऊन सोडते. भलतीकडे तरी ओळखीच्या ठिकाणी. जिथे बाजूला समुद्र वगैरे असतो. बेक्कार खवळलेला. लाटांचा आवाज. एखाद्या ओळखीच्या लयीत. आणि मग समोर तू.
आता अचानक भेटलोच आहोत तर थोडे मनसोक्त तरी भेटू.

थोडे आणि मनसोक्त? तस्साच आहेस बघ अजून.

दाढी वाढलीये ना पण.

उपयोग काय त्याचा. दाढी नाही, दाढ वाढायला हवी. अक्कल दाढ.

आलीये हां तीसुद्धा. बरीच वर्षं झाली आता.

(समुद्राकडे पाठ करून) हो बरीच वर्षं झाली. केवढा बारीक झालायस आणि. नीट जेवत जा बघू. आणि पुस्तकं थोडी कमी वाचत जा किंवा बेस्ट म्हणजे वाचूच नकोस. वर्षभर तरी.”

“हो.”

“समुद्राकडे नाही, माझ्याकडे बघून सांग.”

“हो गं.”

“आणि लिहितोस का अजूनही?

हो थोडं फार. आणि तू?

नाही.

का?
-----
बस्स. इतकंच.
मग पुन्हा लाटांचा आवाज. प्रचंड. फार फार जीवघेण्या लयीत.
च्यायला अर्धवट राहिलेल्या भेटी फार फार छळतात. स्वप्नातल्यासुद्धा! असो.

एक दिवस ना मी NCPAवरून समुद्राच्या कडेकडेने चालत जायचं ठरवलंय. बघू तू भेटतेयस का ते...

तुझ्यात अरण्य, मला सापडावे
माझे मीच व्हावे, अश्वत्थामा |
फिरताना आणि होता तुझी भेट
हृदयात थेट, जावी कळ |

जाऊ देत च्यायला. When you have finished with others, that is my time.
मी आता शहाण्या मुला सारखा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसणारे.. मरेपर्यंत!
च्यायला मरेपर्यंत काय?
तर मी हे लिहिणार नव्हतो. म्हणजे असं काही मी कधी बोलतसुद्धा नाही. पण ते नुकतीच अमृता आणि इमरोझची पत्रं वाचतोय म्हणून इतकं पाणचट लिहिलं असावं. तरी बरं ग्रेस एवढाच कळतो ते. अज्ञानात सुख असतं(?) असं म्हणतातसुद्धा. असो.

त्यापुढे मग पाब्लो नेरुदाची एक कविता.
I can write the saddest lines tonight
I loved her, she loved me too.

मला का माहीत नाही पण नेहमी या ओळींबरोबर १९८४ मधल्या पण ओळी आठवतात
Under a spreading chestnut tree
I sold you, you sold me.

आणि मग कमालीची उदास होते. मग उगाच जुनं सगळं चालू होतं डोक्यात. असं झालं असतं तर किंवा, तसं झालं असतं तर वगैरे. मग ते पण लक्षात कोण घेतोच्या शेवटी असलेलं वाक्य
Of all sad words of tongue or pen,the saddest are these, 'It might have been.म्हणून मला तुझा पाब्लो आवडत नाही. तो वाचल्यावर अपोआप लिहिल्या जातात saddest lines.

पण मग कधी कधी वाटतं की हे असं लिहिणं हे खरं तर तितकंसं वाईट नाहीये. इतर कुणाला वाटत असेल काय काय. पण मला मात्र आवडतं हे. कदाचित हे मीच माझी माझी समजूत घालणंही असेल. पण तरी त्यानिमित्ताने तुझी आठवण येत राहते. मी जगत असतो पुन्हा पुन्हा तुला. भेटत असतो तुला. बोलत असतो तुझ्याशी. 

एक मित्र म्हणाला मध्ये, तू विपश्यनेंला जा म्हणून. विपश्यना का करतात माणसं? विचार घालवायला? छे मला हाच विचार सहन नाही होत. मला तुझा विचार करून कंटाळा किंवा डिप्रेशन नाही येत. I dont feel hurt when I think of you. उलट खूप मस्त वाटतं. तू मला केवढ्या गोष्टी शिकवल्यास. प्रेम ओळखायला, प्रेम करायला. सर्वांवर. स्वत:वर सर्वात जास्त. तू भेटण्याआधी केवढे न्यूनगंड होते माझे माझे. तुझ्या सोबत राहिल्यावर सगळे गळून पडले एक एक करून. आता परतलेत बरेच. पण तरी मी प्रेम करणं नाही थांबवलं. कुणाशीही बोलताना, भेटताना मी शोधत बसतो तुला. कुणाची हनुवटी, कुणाचे केस, कुणाचा स्वभाव, कुणाचं बोलणं आणि काय काय. तुझी जराशी जरी झलक सापडली की मी प्रेमात पडतो त्यांच्याही. म्हणजे खरं तर तुझ्याच. पुन्हा. नव्याने. सोसलेला, पाहिलेला, जगलेला सगळा कडवटपणा नाहीसा होऊन जातो मग. तुला अमृता आवडायची ना. मला फक्त तिच्या या ओळी आवडतात. मनापासून.

नजर के आसमान से
सुरज कहीं दूर चला गया
पर अब भी चांद में
उसकी खुशबू आ रही है

तेरे इश्क की एक बूंद
इस में मिल गई थी
इस लिए मैने उम्र की
सारी कडवाहट पी ली...

किरण नगरकरांची मध्ये एक मुलाखत वाचली. त्यात ते म्हणतात, एखादी व्यक्ती बेपत्ता झाली म्हणून आपण तिच्याशी बोलणं थोडंच थांबवतो? कित्ती खरंय हे. मला हे वाचून तुझी इतकी आठवण आली म्हणून सांगू. मी आजही तुझ्याशी इतकं बोलत असतो. सतत. आणि आता फोनच्या बिलाची काळजीसुद्धा नाही करावी लागत. तुला आठवतंय आपण अगदी सुरुवाती सुरुवातीला भेटलेलो आणि मिसळ खायला म्हणून एका टेबलवर बसलो होतो. कॅंटीनमध्ये. तू माझाच चमचा घेतलास. आणि मी अजून एक चमचा घेऊन आलो तू उष्टा केलास म्हणून. म्याड होतो न मी केवढा. नंतर २ महिन्यातच तुझ्या रूमवर आपण मॅगी खाल्लेली. एकाच टोपात. बोटांनी. एकमेकांच्या. मी दिवसभर उपाशी असलो आणि रात्री तरीही जेवणाचा कंटाळा आला की अजूनही करतो मॅगी. आणि तसच बोटानीच खातो. पोट भरत नाही. पण मन भरून जातं एकदम.
तुला शाहीद कपूर आवडायचा म्हणून मी मॅडसारखा आजसुद्धा त्याचा प्रत्येक चित्रपट बघतो. मला तो मुळीच आवडत नसूनही. फर्स्ट डे, फर्स्ट शो. दोन तिकिटं काढून!

 परवा इराण्याच्या हॉटेलात मैत्रिणीसोबत बसलेलो असताना, तिच्या हातावर एकदम लांबलचक मेंदी पाहिली आणि उगाच तुझी आठवण आली. भयंकर. मग तिच्याशी बोलताना अख्खा वेळ बॅकग्राऊंडला ही कविता.
तू डोके मांडीवरती
ठेवून दीर्घ बिलगावे
अन् खोल अंतराळात
ध्रुवाचे तुकडे व्हावे

तुकड्यांना जमवित असता
बुबुळांत शिरावी नीज
अडकावा चंद्र गळ्याशी
हृदयात भरावी वीज

वीजेने तुटला थेंब
पसरावा फरशीवरती
मेंदीभरल्या बोटांनी
रोखावी नकळत भरती

भरतीच्या वेळी तूही
लाटांचा घेत निरोप
दारातिल उचलुन न्यावे
तुळशीचे हिरवे रोप...
मला ही कविता कित्ती आवडते तुला माहितीये. लोकांना उगाच उदासवाणी वगैरे वाटते. मला नाही वाटत तसं. तुला आठवतंय आपण एकदा रात्री बसने जात होतो, थंडीच्या दिवसात. आणि तू माझं जॅकेट घातलं होतंस. मी इतकी वर्षं झाली तरी अजून वापरतो ते. विरलंय आता थोडं. बाईकवरून जाताना रात्रीचा गार वारा हळूच शिरत राहतो सारखा त्यातून. पण तरीही मला अगदी मस्त वाटत राहतं. उबदार एकदम. आठवणींमध्ये केवढी ऊब असते ना... त्यांचा त्रास कसा होईल?

Infact तुझी आठवण मला शांत करते, माणसांत परत आणते. तुझ्या विचारांचा त्रास नाही होत. बघ तुझा उल्लेख आल्यापासून एकही शिवी नाही लिहिली इथे. कदाचित इतकी वर्षं झालीत म्हणून असेल किंवा कदाचित मी बऱ्यापैकी mature वगैरे झालो असेन(!) आता म्हणूनही. पण आठवणीचा त्रास नाही होत. त्रास जे पुढ्यात वाढलंय ना त्याचा होतो. नाही पचत. नाही रुचत. बदलताही येत नाही. म्हणून सगळा त्रास. त्यात मला ही अशी दिवस दिवस उपाशी राहायची सवय. कितीही अजीर्ण झालं, नॉशिअस वाटलं तरी पुढ्यात जे वाढलंय ते संपवायचंच. हा च आवडत नाही बघ मला. हे असं जबरदस्तीने ताट संपवणं मी लहानपणीसुद्धा केलं नव्हतं. मागे ८वीत असताना एका मित्राच्या घरी गेलेलो, तर त्याच्या बाबांनी पुढ्यातला चिवडा नको म्हटलं तरी संपवायला लावला होता. तेव्हापासून मी त्याच्या घरी परत गेलोच नाही. पण इथे तसं नाही करता येत, म्हणून मग त्रास.

च्यायला, हे पुढ्यात वाढलेलं ताट संपवण्याला पर्याय नाही. नाहीच मुळी. मग तुम्ही विपश्यनेला जा, देवळात-मशिदीत-चर्चमध्ये जा, कीर्तन करा, पोथ्या वाचा, पुस्तकं वाचा, कविता लिहा, नाटकाला, सिनेमाला जा, समुद्रावर जा, पर्वतांवर जा, माणसांत फिरा, नाहीतर गुहांमध्ये राहा, मरेपर्यंत काम करा किंवा रीकामचोट पडून राहा, लग्न करा/करू नका, पोरं काढा/काढू नका, संन्यास घ्या, प्रेम करा, लफडी करा, सेक्स करा, हस्तमैथुन करा, दारू प्या, सिगरेट ओढा, जॉइंट मारा, कामाठीपुऱ्यात जा, पोरींसोबत झोपा- ५० वर्षाच्या,३० वर्षाच्या, १६ वर्षाच्या, १० वर्षाच्या किंवा गर्भाशयातल्या, ते नाही पुरलं तर पोरांसोबत झोपा, मग हिजड्यानसोबत पण झोपा, नाही तर मग प्रेतांसोबत झोपा, दुर्लक्ष करा, शिव्या घाला. काहीही करा. पण हे लक्षात असू दे - पर्याय नाही म्हणजे नाहीच.
The only way out is through.
च्यायला हे Robert frost ने आधीच लिहून ठेवलंय. कवी होता ना साला. कुठल्या ना कुठल्या पॉईंटला लक्षात आलंच असेल त्याच्याही.
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे

बघ तुझी आठवण बाजूला काढली की काय काय बाहेर पडतं ते. जाऊ देत पण. प्रत्येक वर्षं संपताना हे असं होत राहातंच. रोज मरे त्याला कोण... १० वर्षांपूर्वी बरोब्बर ३१स्ट डिसेंबरलाच एक गाणं ऐकलेलं. नादा सर्फ या माणसाचं. Blankest year म्हणून. फार फार आवडतं मला ते.
Oh, fuck it
Im gonna have a party

I had the blankest year

I saw life turn into
a T.V. show
It was totally weird
The person I knew I didnt really know

Time don
t move
Were the only ones who do
Bending reason
Cause its all we hold on to

Oh, fuck it
(fuck it)
Im gonna have a party
Oh, fuck it (fuck it)
Im gonna have a party
तेव्हापासून दर ३१स्टला हे गाणं ऐकतो मी. कुठेही असलो तरी.
लावून बोचरे हळवेसे संगीत
ठेवतो स्वत:ला दिवसरात्र गुंगीत
रोखावा अलगद श्वास गळा दाबून
तशी सर्व मनाला मारत जाते धून

मरो च्यायला. मरोच.

पुढल्या वर्षीसाठी मी संकल्प करणारे – काही म्हणजे काहीच वाचायचं नाही. लिहायचंही नाही. कवितापण नाही. कुण्णाकुणाला भेटायचं नाही. फक्त फिरायचं. NCPAपासून. चालत चालत. समुद्राच्या कडेकडेने. समुद्र नेईल तिथे तिथे... 

Wednesday, December 13, 2017

सात सक्कं त्रेचाळीस --- it does matter even if it does not add up.

मी ८-९ वर्षांपूर्वी किरण नगरकरांची ३ पुस्तकं वाचलेली. पहिलं रावण आणि एडी, मग ककल्ड आणि मग  सात सक्कं त्रेचाळीस. ही order महत्त्वाची आहे. कारण सात सक्कं ने चालू केलं असतं तर कदाचित एवढं वाचलं नसतं. सात सक्कं वाचायला घेतलं तेव्हा सुरुवातीची काही पानं वाचायला काही दिवस घेतले होते. इतकं डोकं गरगरवून टाकणारं त्याआधी काही वाचलं नव्हतं. अर्थात ककल्ड कमालीची आवडली होती. म्हणून मग सात सक्कं सुद्धा पूर्ण केली होती. तेव्हा त्यातले तुकडे तुकडे आवडलेही होते. पण लक्षात राहिली नव्हती. पण गेल्या महिन्यात एका मित्राचा फोन आला की सात सक्कं वाचतोय, पण डोकं गरगरून गेलं वगैरे म्हणून. त्या निमित्ताने पुन्हा एकदा सात सक्कं वाचली. या वेळी मात्र सात सक्कं वाचणं हा अनुभव होता. अर्थात मधल्या काळात विलास सारंगांचा सात सक्कं वरील एक लेखसुद्धा वाचला होता. त्यामुळेही परत वाचताना किंचित बारकाईने वाचली असावी, किंवा आता तशी सवय झाली असावी.

तर मुद्दा हा की डोक्यात सणकून घुसावी तशी ही कादंबरी घुसत गेली. खरं तर ककल्ड ही प्रचंड आवडण्याचं मुख्य कारण होतं त्यात एकाच गोष्टीबद्दल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची आणि त्यातही या दोन्हीत सतत शिफ्ट करत राहण्याची त्यांची पद्धत. कित्येक प्रसंग नगरकर अक्षरश: डोळ्यांसमोर उभे करतात. सात सक्कं मध्ये मात्र हे नाही दिसत. उलट सात सक्कं मधील बरेच प्रसंग अमुक ठिकाणहून तोडून, मग अजून कुठेतरी असं सारखं सारखं होत राहातं. त्यातही पाठ्यपुस्तकाच्या उलट बऱ्याचदा कोण कोणास म्हणाले हे कुठेच दिलेलं नसल्यामुळे हे जंप आणि कट्स डोक्याच्या काही फूट वरून जातात. त्यामुळे सात सक्कं वाचताना डोकं गरगरणं स्वाभाविक आहे.

तर या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र म्हणजे कुशंक. त्याच्याभोवती मग त्याची प्रेमप्रकरणं, मित्र, शेजारी वगैरेची गुंफण. तीही फार ओबडधोबड. कुठेच अतिरंजित वर्णनं वगैरे न करता, भाषाशुचिता वगैरेची पर्वा न करता नगरकर लिहितात. उद्विग्नतेतून असंबंध लिहून तत्वज्ञान सांगण्याचा अतिबौद्धीक आविर्भाव यात कुठेच दिसत नाही. (मी हे लिहितोय त्यात असू शकेल कदाचित पण कादंबरीत नाही.) यात काही अनुभव वैयक्तिकही आहेत, तसेच्या तसे नसले तरी. हे स्वत: नगरकरांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटलंय. त्यामुळे सुरुवातीला या कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत, वगैरे लिहिलेलं मला खटकलं. मजा म्हणजे या कादंबरीतच एका प्रसंगात प्राचिंती व कुशंकचं एक संभाषण आहे –

‘तू लिहितोस ना? कधीतरी बाहेर पडेलच. नाव बदलून. माझ्या प्रायव्हसीचा भंग न करता. ते तुला पैसेसुद्धा देणार नाहीत. Compulsive urge of expression किंवा communication म्हणून प्रकाशित करशीलच.’
अर्थात ते एक रीत म्हणून लिहिलं असावं कदाचित.

कुशंकची यात अनेक प्रेम प्रकरणं येत राहतात- आरोती, चंदनी, ‘तू’ इ. पण सर्वात जास्त स्पेशल यातली ‘तू’च आहे हे जाणवत राहतं. आधी वाचताना ‘तू’ हे सर्वनाम म्हणून वाटत राहातं, पण मग कळून येतं की ते विशेष नाम आहे. खूप खूप विशेष. पूर्ण पुस्तकात ‘तू’च्या नावाचा उल्लेख कुठेच सापडत नाही. आणि म्हणूनच कदाचित ‘तू’ हे पात्र खूप जास्त स्पेशल झालं असावं. कधी कधीतर हे पुस्तक ‘तू’ या एकाच व्यक्तीला उद्देशून लिहिलंय की काय असं वाटत राहातं. त्यातही विशेष करून ‘तू’च्या बाबतीत लिहितानाच desperation हे एक वेगळी पातळी गाठतं. उदा. कुशंक एके ठिकाणी म्हणतो की,

‘काय सांगू तुला मी की, तू मला नाही म्हणून अर्ध वर्षं होऊन गेलं तरी मला अजून शहाणपण आलेलं नाही? दीड-दोन वर्षापूर्वी जेव्हा तुझी पाळी चुकली म्हणून आपण दोघं घाबरलो तेव्हा तू खरोखरच गरोदर राहिली असतीस तर आज मी तुला एखादेवेळी गमावून पण बसलो नसतो ना.’

हे सगळं मला ८-९ वर्षापूर्वी कळण्याचा संबंधच नव्हता. म्हणजे त्यावेळी ब्लू फिल्म्स सोडल्या तर स्त्री-पुरुष संबंधाबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती म्हणूनही असेल. आता मात्र खूप सणकून कळतंय.  माझ्यासाठी जास्तीत जास्त desperation म्हणजे love in time of cholera मध्ये जसा नायक आपल्या प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर, म्हातारपणी जेव्हा तिचा नवरा मरतो, तेव्हा पुन्हा तिला जाऊन भेटतो वगैरे असलं काही तरी स्वप्नाळूपण होतं. किंवा कदाचित अजूनही आहे. पण नगरकर मात्र फार सहजपणे त्या पलीकडे जातात. आणि हे सगळं १९६७ ते १९७४ च्या दरम्यान लिहिलं होतं त्यांनी हे विशेष. इतकं सगळं असूनही कुशंकची कीव वगैरे येत नाही हे महत्वाचं. आपली काही तरी फार इनक्युअरेबल अशी दु:खं असावीत, आणि मग आपल्याला आवडणाऱ्या, एखाद्या जवळच्या, शक्यतो विरुद्ध लिंगी, अशा व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं वगैरे असल्या कल्पना कुशंकला स्पर्शसुद्धा करत नाहीत. 

अर्थात फक्त प्रेमप्रकरणातून दुखावला गेलेला एवढाच कुशंक असता तर हे पुस्तक फार कंटाळवाणं झालं असतं. पण सामाजिक परिस्थिती, देव, धर्म, इत्यादी अनेक गोष्टीवरील कुशंकचे monologues हे निव्वळ अप्रतिम आहेत. आणि खास नगरकरांच्या शैलीतील black humour ठिकठीकाणी यात पेरलेला सापडतो. सात सक्कं मधील स्त्रिया यासुद्धा काळाच्या फार फार पुढच्या अशाच म्हणाव्या लागतील.
     
अजून एक पुस्तक वाचताना जाणवलेली गोष्ट म्हणजे alienation. जगापासून तुटून पडलेला, outsider म्हणून जगत असलेला असा कुशंक. नगरकरांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तारुण्यातलं आयुष्य याबद्दल जेवढं वाचलं, त्यातून लक्षात आलं की हा माणूस पण outsider म्हणून जगला असणार. हे alienation माझ्या मते थोड्या फार प्रमाणात सगळ्यांच्याच वाट्याला येत असतं. कुशंकसारख्याच्या वाट्याला जरा जास्तच. (मी नुकतंच amazon primeवर mr robot पहिल्याने हा alienationचा मुद्दा सुचला असावा) पण महत्वाच हे आहे की तरी सुद्धा एके ठिकाणी human bondage अटळ असं कुशंक म्हणतो.

‘क्या फर्क पडता है’ या ‘तू’च्या तोंडी वारंवार येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मुखपृष्ठावर ठळकपणे दिसतं – फर्क पडता है म्हणून. हा कुशंकचा दृष्टीकोन नक्कीच आशादायी आहे. स्वत:हून किंवा भोवतालच्या जगामुळे  ओढवलेलं कमालीचं दु:खं, टोकाची निराशा या सगळ्यापलीकडे किंवा कदाचित या सगळ्यासकट कुशंक जगत राहतो, अनुभवत राहतो. भोंगळ आशावाद, लैंगिक किंवा इतर गोष्टींमध्ये असणारा दुटप्पीपणा हे सगळं नाकारत, वास्तव स्वीकारून तो जगत राहतो हे विशेष. 

बाकी या पुस्तकासंबंधी बऱ्याच समीक्षा वगैरे लिहिल्या गेल्याचं प्रस्तावनेत वाचलं. प.पू. कुमार केतकर यांनी या पुस्तकाला शब्द मैथुन असे म्हटले. इतरही बऱ्याच जणांनी कठोर टीका केली. या कादंबरीची पहिली आवृत्ती संपायला सुमारे २० वर्षे गेली. एकूण या कादंबरीला बऱ्यापैकी वाळीत टाकण्यात आलं. अर्थात त्यावरील बऱ्यापैकी चर्चा प्रस्तावनेत सापडेलच. फक्त मला हा प्रकार दुर्दैवी वाटतो इतकंच. 
मी यूट्यूबवर त्यांची साधारण ३-४ वर्षापूर्वीची एक मुलाखत पहिली होती. त्या मुलाखतीत बोलताना त्यांनी, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती मी पाहिलीये, असं म्हणून पुढे काही बोलण्याचं टाळलं होतं. इतकी जागतिक कीर्ती मिळवल्यावर, इतक्या वर्षांनीही या माणसाला हे जाणवतं, यावरून त्यांनी ही कादंबरी कुठल्या मन:स्थितीत लिहिली असावी याचा थोडा फार अंदाज येतो. कदाचित त्यामुळेच अधूनमधून कुशंकची कमालीची अस्वस्थ करून जाणारी स्वगतं येत राहतात. हा पार्ट मला तरी बेस्ट वाटला. अर्थात कोणाचाही दृष्टीकोन, मतं ही जर स्वानुभवातून, जगण्यातून, परिस्थितीतून घडत असतील तर ती चुकीची नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. ती एखाद्याला पटतात की नाही हा भाग वेगळा. म्हणूनच कदाचित हा अस्वस्थ करून जाणारा भाग मला निराशावादी सुद्धा वाटला नसावा. 
किंवा खरं तर टोकाचा दुखावलेपणा सांगणारी पुस्तकं, गोष्टी, माणसं मला आवडत असावीत. तसंही काफ्काने लिहून ठेवलंय –
“I think we ought to read only the kind of books that wound or stab us. If the book we're reading doesn't wake us up with a blow to the head, what are we reading for? So that it will make us happy, as you write? Good Lord, we would be happy precisely if we had no books, and the kind of books that make us happy are the kind we could write ourselves if we had to. But we need books that affect us like a disaster, that grieve us deeply, like the death of someone we loved more than ourselves, like being banished into forests far from everyone, like a suicide. A book must be the axe for the frozen sea within us. That is my belief.” 


तर सात सक्कं हेही अश्याच एका पुस्तकांपैकी एक. बाकी पुस्तकाबद्दल बरंच बोलता-लिहिता येईल. मी नगरकरांच्या प्रचंड प्रेमात असल्याने, जसं प्रेमात पडलं की एखाद्या व्यक्तीचं सगळंच स्पेशल वाटत राहतं, तसं मला सर्वच पुस्तक, त्यातले प्रसंग, संवाद, monologues सगळंच फार स्पेशल वाटतंय सध्या. Catcher in the rye मध्ये एक वाक्य आहे 
"What really knocks me out is a book that, when you're all done reading it, you wish the author that wrote it was a terrific friend of yours and you could call him up on the phone whenever you felt like it. That doesn't happen much, though."
मला सात सक्कं वाचल्यावर अगदी असंच वाटत राहिलं जवळ जवळ आठवडाभर. तर मुद्दा हा की सात सक्कं खूप आवडलेल्या गोष्टींच्या(फक्त पुस्तकांच्या नाही) यादीत भरून ठेवलेलं आहे. सात सक्कंच्या एका इंग्रजी रीव्ह्यूमध्ये लिहिलं होतं की Nothing in this Kiran Nagarkar’s book adds up म्हणून. ते बदलून It does matter even if it doesn’t add up असं करावसं वाटतं.

Saturday, November 18, 2017

स्ट्रिंजर

डोंबिवलीत दिवस लवकर सुरु होतो. पूर्वी सकाळ झाली की ५ मिनिटं अंथरुणावर उलटंपालटं होण्यात जायची. आता डोळे उघडल्यावर पहिली ५ मिनिटं मोबाईल चेक करण्यात जातात सवयीनुसार मिलिंदने डोळे चोळत फोन हातात घेतला. watsappवर बोट ठेवलं, तर स्टेटस अपडेटमध्ये निशीचं नाव. आपल्या तीन वर्षांच्या पोरासोबतचा फोटो टाकलेला तिने. न्यूयॉर्कमधला. ५ वर्षं झाली हिच्याशी बोलून. ४ वर्षांपूर्वी तिने मेल पण टाकलेला. कसा आहेस वगैरे म्हणून. आणि उगाच नको नको त्या चौकश्या. अमेरिकेत कसं सगळं छान, निवांत असतं त्याचं आयघालं वर्णन. मिलिंदने मेलला उत्तर लिहिलं आणि तसंच ड्राफ्ट मध्ये राहू दिलं होतं. जाऊ देत पण. I hate America. I hate her. पोरगं अगदी तिच्यावर गेलंय. नाक, डोळे, भुवया. I hate him too. असं मनातल्या मनात तो पुटपुटला.


watsapp चा हा एक नवीन वैताग आहे. भलत्या वेळेला भलत्या माणसांची नको तितकी आठवण करून देतं हे.ऑफिसचा watsapp चा ग्रुप नसता तर डिलीटच केलं असतं. पण कामाचं बोलतात अधूनमधून म्हणून डिलीट नाही करता येत. बाकी अख्खा वेळ फालतुगिरीच चालते त्यावर. वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा, आई-बाप दिवसांच्या शुभेच्छा, महिला दिनाच्या शुभेच्छा वगैरे. चुत्येगिरी सगळी. नुसते एकमेकांचे बोचे खाजवणं. जाऊ देत पण. सकाळी सकाळी हे असले विचार नको करायला. अजून अख्खा दिवस पडलाय. असा विचार करून तो अंथरुणातून उठला. तोंड धुतलं. प्रेशर आलं नव्हतं म्हणून त्याने म्हटलं आधी अंघोळ उरकून घेऊ. मग आंघोळीचं पाणी तापवत ठेवलं आणि आरामखुर्चीत येऊन टी.व्ही. चालू केला. हा त्याचा रोजचा कार्यक्रम. सकाळी सकाळी इंद्रिय कुरवाळत बातम्या बघणे किंवा वर्तमानपत्र वाचत बसणे. ही सवय मुंबईत आल्यापासूनची. पुण्यातल्या किंवा गावाकडच्या थंडीत तसंही ते अशक्य होतं. तो दोन वृत्तपत्रं आणि एक वाहिनी यांची कामं घ्यायचा.

तर आधी आपल्याच वाहिनीवर काय चाललंय हे बघायला त्याने चॅनेल लावला. तर आदल्या दिवशीचं रिपीट टेलिकास्ट. विषय काय तर अमुक अमुक खासदाराच्या पोराच्या लग्नात तमुक कोटी खर्च केला. हे योग्य की अयोग्य? च्यायला. पॅनेलवर पुण्यात दोन फ्लॅट असलेले कम्युनिस्ट कार्यकर्ते. यांची पोरं अमेरिकेत शिकतात हे सांगताना भारतात उच्च शिक्षणाची कशी दुर्दशा झालीये, अमेरिकेत शिकणं कसं गरजेचं होतं आणि त्यांचा संपूर्ण खर्च कसा कुठल्या तरी स्कॉलरशिपद्वारे होतोय हे लोकांना सांगत फिरणारे हे गृहस्थ. अंगावर येणारं म्हातारपण घालवायला कुठल्याशा ngo त पार्ट टाईम काम करून जगाला फुल टाईम उपदेश करणारे एक विचारवंत. हे अजून भयंकर. स्वत:ला तत्वज्ञानी म्हणवून घेणारे. यांचं तत्वज्ञान म्हणजे सगळं निरर्थक आहे. कशाला काहीच अर्थ नाही वगैरे. सतत आंबलेला चेहरा करून आयुष्य कसं दु:खंमय आहे हे सांगत सुटलेले हे लोक. मग दोन पक्षांचे नेहमीचेच प्रवक्ते. त्यातला एक सहा महिन्यांपूर्वीच तिसऱ्याच पक्षातून उडी मारून आलेला आणि पवित्र करवून घेतलेला. आणि या थोर लोकांच्यात लावालावी करणारा हा शिंदे. च्यायला या शिंद्यानेच गेल्या आठवड्यात स्टाफला पार्टी दिलेली. कुठल्या तरी मोठ्याशा हॉटेलमध्ये. पर प्लेट १००० रु. होतं तिकडे. आणि हे फुकटगांड लोक आता दुष्काळ, कुपोषण, शेतकरी आत्महत्या वगैरेच्या चर्चा झाडणार. आपल्या वाहिनीच्या मालकाकडे किती गाड्या आहेत हे दाखवतील काय हे भोसडीचे. जाऊ देत. आपण पण त्याच ओळीतले. स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांपैकी एक. जाऊ देत. असं मनातल्या मनात बोलून त्याने वर्तमानपत्रं हातात घेतली.


प्रत्येक वर्तमानपत्रातलं संपादकीय आणि प्रतिक्रिया झरझर वाचून काढल्या. आज काही विशेष नाही असं म्हणून तो अंघोळीला शिरला. सवयीनुसार १२-१५ मिनिटांत सगळं उरकलं. चेंबुरला १० पर्यंत पोचायचं म्हणजे ९ च्या आधी निघायला हवं म्हणून घाईघाईने सगळं आवरलं आणि लॅपटॉपची बॅग काखेत अडकवून, पायात चप्पल सरकवून तो वेगात घराबाहेर पडला.

जिन्याच्या जवळ पोचताच नकळत त्याचा वेग कमी झाला. जिन्याला लागून असलेल्या घरात मयेकर राहायची. सोबत तिचा मुलगा. ४थीला असलेला. तिचा ४ वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला. LIC त कामाला होती ती. दिसायला अगदी आकर्षक. चेहऱ्याने आणि अंगानेही. त्यात एकटी राहणारी बाई म्हणून आणखीनच आकर्षक. तशी ४०शीच्या आतलीच. एकदा असंच बाल्कनीतून जाताना मिलिंदला दाराच्या फटीतून तिचा अर्धा क्लिव्हेज दिसला होता. त्यानंतर तसं परत कधी झालं नसलं तरी तिच्या दारासमोरून जाताना अपोआप घरभर नजर फिरायची त्याची. आतासुद्धा त्याने तशीच नजर फिरवली आणि पायऱ्या उतरत खाली येऊन पोहोचला. मग दर वेळेप्रमाणे त्याला स्वत:चीच लाज वाटू लागली.ठरवूनसुद्धा ही गोष्ट आपण थांबवू शकत नाही याची त्याला प्रचंड चीड आली.


मग स्टेशनपर्यंत तेच सगळं डोक्यात. मग एम.ए.ला असताना वाचलेली एक गोष्ट त्याला आठवली. त्यात चंपा नावाच्या रांडेला इंद्र येऊन भेटतो आणि म्हणतो – Impotence is wonderful! A blessing! For the first time I feel free from anxiety. I can now see you as a human being, not as a creature with so many holes. As if you were a golf course! I enjoy this state of being. No more the anxiety of having to seduce a woman, or of not being able to. My wife can no more complain that I regard her only as a sexual object. Isn’t that wonderful?

च्यायला म्हणजे बाईकडे माणूस म्हणून बघणं इंद्राला पण इंपोटंट झाल्यावरच शक्य झालं तर! कुठल्याही गोष्टीतून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढण्याची पत्रकारांची सवय आपल्यात पूर्णपणे उतरलीये याचा त्याला अजूनच राग आला. एव्हाना तो स्टेशनला लागून असलेल्या ब्रिजपर्यंत येऊन पोहोचला. स्टेशनरोडवरच एक फ्रेम्सचं दुकान होतं. त्यात गणपती, विष्णू आणि स्वामी समर्थ यांच्या फ्रेम्सच्या मधोमध आंबेडकरांचा फोटो. खालच्या ओळीत आणखी गर्दी. मग प्लॅटफॉर्मवर आणखी जास्त गर्दी. ती बघून मग त्याचा उरला सुरला उत्साहसुद्धा नाहीसा झाला.

अंबरनाथवरून येणारी ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. लोक मारामाऱ्या करत ट्रेनमध्ये चढू लागले. एक ४०शीचा माणूस हातातली बॅग सावरत, धावत ट्रेनपाशी आला आणि धडपडून पडला. त्याबरोबर आजूबाजूंच्या लोकांचा एकच गलका. पण तो माणूस लगेच उठला, शर्ट झाडत पुन्हा जोमाने ट्रेनमध्ये घुसला आणि ट्रेन सुटली. बाजूने जाणारा एक म्हातारा बडबडू लागला – ‘क्या चुतिया आदमी है | खुद की जान की कीमत भी नही सालेको.’

जान की कीमत. च्यायला. इतक्या प्रचंड गर्दीत एखाद्या जिवाची किंमत ती काय? गेल्या महिन्यात एक पोरगं ट्रेनखाली आलं होतं भांडुपला. २१-२२ वर्षांचा असणार. आत्महत्येचं हे वय तसं पर्फेक्टच. तर मग त्यावर चर्चा सुरु डब्यात. बाजूला असलेल्या माणसाने कुर्ल्यापर्यंत ऐकलं. मग कानात हेडफोन घालून मोबाईलवर कुठला तरी पिक्चर बघत बसला. आपण पत्रकार वगैरे असल्याने दादर येईपर्यंत ऐकत राहिलो इतकंच. जान की कीमत. च्यायला. मागे एका बातमीत वाचलेलं की जगभरात सर्वात जास्त आत्महत्या या २१-३० वयोगटातील माणसांच्या होतात. ऐन उमेदीचं वय. या वयातच इतकी माणसं इतकी निराश का व्हावीत? हेच वय कळू लागण्याचं असतं म्हणून तर नव्हे? जाऊ देत. आपण आता तिशी पार केली याचं मिलिंदला एकदम हायसं वाटलं. पण तरी केव्हा केव्हा विचार येतोच. समोरून दुसरी ट्रेन येताना बघून मिलिंद प्लॅटफॉर्मच्या टोकाशी गेला. जावं का थेट रुळावर? १०-२० सेकंदांचा प्रश्नये फक्त. प्ले. पॅाझ. स्टॅाप! जाऊ देत. आज नको. चेंबुरला अपाँइटमेंट आहे त्या कांबळेची. दिलेली वेळ पाळायला हवी. जीव काय केव्हाही देता येईल, असं मनाशी ठरवून तो रेटून ट्रेनमध्ये शिरला.

सकाळी सकाळी तरी थोडं पॅाझिटिव्ह राहिलं पाहिजे. म्हणून हा विषय सोडून तो शेजारच्या माणसांचं बोलणं ऐकायला लागला. दोघे ५०शी उलटलेले दिसत होते.

पहिला- जगात चांगली माणसं वाईट माणसांपेक्षा जास्त आहेत.
दुसरा- अगदी. अगदी. म्हणूनच जग चाललंय.

‘बुलशीट!’ मिलिंदने मनातल्या मनात जोराने म्हटलं. चांगली माणसं जास्तयेत म्हणे. चांगली माणसं म्हणजे नक्की काय? फक्त वैयक्तिक चांगुलपणाला चांगलं म्हणावं का? किंवा का म्हणावं? वैयक्तिक चांगुलपणा तर जगातल्या ९९% लोकांकडे असतो. एखादा अट्टल गुन्हेगारसुद्धा आपल्या ओळखीपाळखीच्या माणसांशी चांगलाच वागतो. ऑफिसातला शरदसुद्धा त्याच्या नेहमीच्या रांडेला वैयक्तिक चांगुलपणापोटी १०० रुपये जास्त देतो. या सगळ्याला चांगुलपणा म्हणावं का? यापेक्षा वाईट असलेलं काय वाईट? बरं झालं आठवलं आज ऑफिसमध्ये शरदला पण भेटायचंय. तो काहीतरी स्टोरी आहे सांगत होता. बोललं पाहिजे त्याच्याशी. तितकंच थोडं आणखीन काम मिळेल.

विचार थांबल्यावर इतका वेळ आपण उभे आहोत याची त्याला जाणीव झाली. सुदैवाने ठाण्याला २-४ माणसं उठली आणि बसायला जागा मिळाली. ४थ्य सीटवर. यापेक्षा जास्त तो मुळात एक्स्पेक्टच करायचा नाही. तोही मग सीटबरोबर ८० अंशांच्या कोनात, व्यवस्थित कुले अॅडजस्ट करून बसला. मुंबईत आल्यावर १ महिन्यातच त्याने ही क्लृप्ती शोधली होती. सुरुवातीला एक कुला सीटवर आणि दुसरा अधांतरी असं बसायचा तो. त्यामुळे मग एक कुला भयंकर दुखत राहायचा दिवसभर. त्यानंतर ८० अंशांच्या कोनात सीटवर दोन्ही कुल्यांचा अर्धा भाग टेकवून तो बसायला लागला. मग कुले दुखणं कमी झालं. त्याला बसल्या बसल्या स्वत:चं कौतुक वाटू लागलं. मग उगाच कोलटकरांची एक कविता आठवली –

प्रत्येकाला अमुक इतके गाल असायला पाहिजेत
असं कुठाय
किंवा इतकेच कुले पाहिजेत
असंही नाही


कोलटकर याबाबतीत पूर्ण चुकले. उपनगरात राहणाऱ्या, ४थ्या सीटवरून प्रवास करणाऱ्या माणसांचे कुले दणकट असायलाच हवेत. कोलटकर बहुधा फर्स्ट क्लासने प्रवास करत असणार! च्यायला काही करायला नसलं की आपण काहीही विचार करत सुटतो हे त्याच्या लक्षात आलं. इतक्यात कुर्ला आलं. गर्दीत मिसळून तो पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरला. मग पुन्हा ट्रेनने चेंबुरला.

स्टेशनवरून उतरल्यावर लगेच तिसऱ्या गल्लीत कांबळे राहायचा. त्याने आंबेडकर नगर मधल्या काही पोरांना घेऊन एक संस्था उभी केली होती. ३ वर्षांपूर्वी. गेल्या वर्षी सफाई कामगारांचा मोर्चा कव्हर करत असताना मिलिंद आणि त्याची ओळख झालेली. बोलणं एकदम तडफदार. मनस्वी. तो घरात शिरला. कांबळेच्या पोराने पाणी आणून दिलं. वर्षभरात कांबळेचं घर एकदम भरल्यासारखं दिसत होतं. दारात बुलेट उभी होती. त्याला एकदम पिंग आठवला - टू बी रिच इज ग्लोरीअस! जाऊ देत पण आपल्याला काय. तर काही तरी बोलायचं म्हणून त्याने विचारलं,” काय मग कितवीला आहे छोटा?”

त्यावर कांबळेचं उत्तर-“११वीला आहे. सायन्सला. १०वीला ८२% होते. मग म्हटलं घे सायन्स. त्याला आर्ट्सला जायचं होतं. पण म्हटलं आर्ट्सला जाऊन कोणाचं भलं झालंय?”

मिलिंदने उगाच हसल्यासारखं केलं. च्यायला आर्ट्स घेऊन कोणाचं भलं झालंय- हे वाक्य पिडणार आता आपल्याला. आता पासून परत कुणाला असले फालतू प्रश्न विचारायचे नाहीत हे त्याने मनातल्या मनात ठरवून टाकलं.

कांबळे बोलतच होता – "मी सांगतो मिलिंदजी, गेल्या वर्षी जे आंदोलन केलं ते फुकट गेलं बघा. सगळ्या मागण्या तशाच्या तशा आहेत अजून. च्यायला हे स्वच्छता अभियान म्हणून बोंबलतात ते काय फक्त झाडू घेऊन फोटो काढण्यापुरता काय? एवढं असेल तर द्या की सफाई कामगारांना कायम नोकऱ्या. लागू करा तुमचे वेतन आयोग. सेफ्टी स्टँडर्डस वाढवा की. वाढवा बजेट त्याचं. मग आम्हीपण येतो बोंबलायला. काय मी काय चुकीचं बोलतो काय?”

कांबळेची ही सवय मिलिंदला माहित होती. मी काय चुकीचं बोलतो काय? असं वाक्याच्या शेवटी बोलायची. त्याला उत्तर अपेक्षित नसायचं.

मग मिलिंदने विचारलं,” किती वाजता झालं? दोघेही ऑन द स्पॉट गेले का? डिटेल्स घेतलेयत का तुम्ही?” कांबळेने बरीच माहिती दिली आणि त्याबरोबरच पाठपोठ लिहून काढलेले दोन कागदसुद्धा. ते बघून मिलिंद खुश झाला. आता यातच इकडे तिकडे एडिट केलं की झालं. तेवढ्यात कांबळेने विचारलं, “त्या दोघांच्या घरी जायचं का मग? इथे जवळच झोपडी आहेत त्यांची.”

मग त्याला जावंच लागलं. ड्रेनेजच्या पाईपमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू. च्यायला, हे कसलं डेंजर वाटतंय. हे असलं काही तरी प्रत्यक्षात घडताना पाहिलं की जगण्याची जी काही उरली सुरली इच्छा आहे तीही निघून जाते. एका गल्लीच्या तोंडाशी असलेल्या घरात कांबळे शिरला. त्याच्या मागे मिलिंद. घर नव्हतंच ते. दरवाजापासून समोरच्या भिंतीपर्यंत जायला तीन ढेंगा पुरल्या असत्या. कोपऱ्यात फोटो. हा गेल्या वर्षी मोर्च्यात होता. कांबळेच्या बरोबर मागे. कांबळे जोरजोरात घोषणा द्यायचा- होश में आके बात करो

मग हा सगळ्यांना इशारा करून जोरात- बात करो, बात करो.

बात तो तुमको करनी होगी
(करनी होगी, करनी होगी)
न्याय तो तुमको देना होगा
नही देंगे तो कैसे लेंगे
लढ के लेंगे, लढ के लेंगे –

न्याय! बोचा! न्याय आणि बोचा या फार गुळगुळीत गोष्टी आहेत. जनरली वजन जास्त असणाऱ्याकडे त्या जास्त प्रमाणात असतात. जाऊ दे पण. आपण फार फार तर लिहू शकतो. मग काय होणार? वर्तमानपत्रातल्या ८०-८५ कॉलमपैकी आतल्या कुठल्या तरी पानावरचा एक कॉलम त्याला अलॉट होणार. मग ते प्रिंट होणार. वाचणारे त्याला इग्नोअर करणार. मग पुढल्या दिवशी ही बातमी शिळी होणार. मग पुन्हा आपण एक-दोन वर्षांनी असाच कुठला तरी रिपोर्ट काढायला कोणाच्या तरी घरी जाणार. च्यायला. पण अशी माणसं मरत राहायला हवीत. तरच आपल्याला न्यूज मिळत राहतील आणि पैसेसुद्धा. जाऊ देत. आपण सुद्धा इग्नोअर करायला शिकलं पाहिजे. इग्नोअरन्स इज स्ट्रेन्थ!

शेवटी १० मिनिटांतच काम आहे सांगून मिलिंद घराबाहेर पडला. कांबळेचा निरोप घेतला आणि थेट स्टेशनवर. तिथून कुर्ला. मग करीरोड. तिकडून चालत चालत लोअर परेलला. ऑफिसमध्ये.

ऑफिसात शिरला आणि समोर बर्वे. हे ज्येष्ठ पत्रकार. आता रिटायर झालेले. पण अधून मधून यायचे कशाला न कशाला. म्हातारी माणसं जशी थोडीफार बडबडत राहतात ते सोडलं तर तसे निरुपद्रवीच. यांची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली. ४ वर्षांपूर्वी बर्वे काकू गेल्या तेव्हा ती भारतात आलेली. तेव्हा बर्वे म्हणलेले की आता मी गेल्यावरच येतील बहुतेक ही. एरवी प्रसन्न, आनंदी दिसणाऱ्या बर्वेकाकांचा इतका कडवट स्वर मिलिंदने त्याआधी ऐकला नव्हता. कारणं वेगवेगळी असली तरी त्या दोघांचाही अमेरिकेवर मनस्वी राग होता. म्हणून मग मिलिंद आणि त्यांचं एकदम छान जुळलं. 

ते मुडात असले की जुन्या आठवणी, किस्से सांगत बसायचे.आज पण तसेच बोलू लागले,”हल्ली आवर्जून वाचावं असं एकही साप्ताहिक किंवा संपादकीय सापडत नाही. चार ओळी वाचल्या की कळून येतं हा लेखक हिंदुत्ववादी आहे की समाजवादी की साम्यवादी. जो तो फक्त प्रचारकाचं काम करत सुटलेला. यु नो काय प्रॉब्लेम आहे, पत्रकारिता हा एक सार्वजनिक व्यवसाय आहे, खासगी नाही हेच कळत नाही या लोकांना. यु नो मिलिंद, ‘माणूस’चा अंक कधी येईल याची अक्षरश: आम्ही वाट बघायचो. आता माजगावकर हिंदुत्ववादी माणूस. पण ‘माणूस’ने चुकुनही प्रचाराचं काम केलं नाही. काय एक एक लेख असायचे. अरुण साधूंचा ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’, विजय तेंडुलकरांचं ‘रातराणी’ आणि असे किती तरी.आताच्या कुठल्याच संपादकीयांमध्ये दम नाही तसा. असो. तू सांग. काय चालूये सध्या? आता तिशी ओलांडली असशील न तू? लग्न करून टाक हं लवकर.एकट्याने वैताग येतो बघ. खास करून उतारवयात. बोलायला लागतं बघ कुणी तरी. किंवा निदान आजूबाजूला खाडखूड करत बसणारं तरी. माणसांच्यात राहतोय असं वाटायला हवं बघ माणसाला. बरं मी येतो. तू काम कर बाबा तुझं. दादरला आलास तर ये वेळ काढून घरी.”

मग निरोप वगैरे. बर्वे एकदम हळवा झाला होता. म्हातारपणात किंवा एकटी राहिल्यावर होत असावीत कदाचित माणसं.बाय द वे, हा बर्वे इतका गृहीत का धरतो की आपण म्हातारे होऊ म्हणून? आय मिन पुढल्या २५ वर्षांनंतरचं प्लानिंग वगैरे. अमुक इन्श्युरन्स, तमुक मेडिक्लेम. उतारवय म्हणे. च्यायला त्याआधीच कोणी ट्रेनच्या खाली आडवा आला तर किंवा ड्रेनेजच्या पाईपमध्ये गुदमरून मेला तर? च्यायला हा बर्वे उगाच भुंगा लावून गेला डोक्याला.

मग मिलिंद शरदच्या डेस्कवर गेला. शरद तिकडे नव्हता म्हणून बाजूच्या डेस्कवरच्या नीरजाला त्याने विचारलं. ती म्हणाली येईलच इतक्यात, म्हणून तिथेच बसला.

नीरजा काही तरी टाईप करत होती कम्प्युटरवर. त्याची नजर कीबोर्डवरच्या तिच्या निमुळत्या बोटांवर गेली. मग भरलेल्या दंडावर. मग अजून वर पाहिलं तर तिच्या गालापर्यंत रुळणारे मोरपिसाचे कानातले. निशी घालायची असले कानातले. सेम टू सेम. मिलिंदने तिच्या कानातल्या मोरपिसावर कविताही केलेली. च्यायला, मोरपीसावर कविता वगैरे. त्या आठवणीने त्याला मळमळून आलं. मग त्याने मनातल्या मनात निरजाला शिवी घातली. भोसडीची, हिला आजच हे कानातले घालून यायचे होते काय?

इतक्यात शरद आला. नीरजाला म्हणाला ‘मंत्रालयात काम आहे म्हणून. काही असलं तर फोनवर कळव. तिथूनच घरी जाणारे.’ मग माझ्याकडे वळून, चल खाली बसुयात. मग सगळं आवरून तिथून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग मीसुद्धा.

खाली आल्यावर म्हणाला,”तुला काही काम आहे का?”
मिलिंदने मानेनेच नाही म्हटलं.
“चल मग, मंत्रालयातलं काम उरकून घेऊ. मग मी पण मोकळाच आहे.”
मग चर्चगेटपर्यंत ट्रेनने. उतरल्या उतरल्या ‘कॅफे भारत’ मध्ये जेवले दोघे. मग टॅक्सीने मंत्रालयात. तिकडे शरदला अर्धा तास लागला काम आटपायला. तेवढ्या वेळात मिलिंदने सकाळचा रिपोर्ट बनवून मेल करून टाकला.

शरद आल्यावर मग दोघे चालत चालत समुद्रावर निघून आले.

मग उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा.

“काय म्हणतोयस? आई कशीये? तब्येत वगैरे ठीकाये न?”

“हो व्यवस्थित. गेल्या आठवड्यातच फोन झाला होता.”

शरदला माहित होतं मिलिंदचं वडलांशी फार पटत नाही. म्हणून त्याने फक्त आईची चौकशी केली. मिलिंदला पण म्हणून शरद बरा वाटायचा. लोकांच्या जखमा खरवडून काढायच्या नसतात हे त्याला चांगलं ठाऊक होतं.

मग शरदने खिशातून गोल्डफ्लेक काढली आणि पेटवली. छाती भरून खोल दम घेताना सिगरेटचा ठिपका एकदम गडद होऊन राहिला.

मग म्हणाला,”साल्या कधी कधी वाटतं तुझं आहे तेच बरंय च्यायला. टेन्शन नाही कसलंच. आमचं बघ, १० वर्षांपासून झक मारतोय इकडे. पण प्रमोशन कोणाला दिलं त्या कुलकर्णीला. चार वर्षं पण नाही झाली तिला. झोपली असणार साली. च्यायला तो मॅनेजिंग एडिटर गे असता ना तर दाखवलं असतं तिला. इकडे आपलं काहीच फ्युचर नाही बघ.”

मग थोडं कामाचं बोलणं. मग अजून एक सिगरेट. मग एकदम मुडात येऊन सांगू लागला

“ साला सांताक्रूझला एक नवीन कॉंटॅक्ट मिळालाय. कसल्या कडक आयटेम आहेत तिथे. फुल्टू कॉलेज बेब्स. पैसे जास्त आहेत पण कधी तरी जायला सहिच्ये. बाकी नेहमीसाठी फरीदा आहेच आपली. यु नो, फरीदा इज माय ट्रू लव्ह.”

हे शरदचं नेहमीचं होतं.

मिलिंदला मग उगाच निशीची आठवण आली. भयंकर. ते कानातले घालत असेल का अजून? छे सकाळच्या फोटोत तर नव्हते. तिच्या स्कुटीवरून भटकताना त्याचं लक्ष तिकडेच असायचं. पुणं कसलं आवडायचं तेव्हा मिलिंदला. निशीशी ब्रेकअप नंतर हेच पुणं नकोसं झालेलं. त्यानंतरचा दीड महिना दीड करोड वर्षांसारखा वाटला. दिवस खायला उठायचा. बाहेर पडलो आणि अचानक भेटली तर म्हणून मग दिवसभर होस्टेलच्या रूमवरच. दीड महिना लायब्ररी पण बंद. रूमबाहेर फक्त जेवायला पाउल ठेवायचा. तेही दोन दिवसातून एकदा. इतका अपराधीपणा का यावा भेन्च्योद? पण तो येतोच. मग दीड महिन्यात एकलकोंडेपणाची सॉलिड सवय लागली. इतकी की दीड महिन्यात निशीची सवय पण सुटली. मग सरळ मुंबईत. मुंबईत आल्यावर तर अजूनच. दिवसरात्र एकटेपणा पुरायचा त्याला. कुठल्या तरी दिवशी अगदीच अनावर झालं तर एखादी कविता वगैरे. त्याहून जास्त अनावर झालं तर रात्री २-३ वाजता उठून इंद्रिय हातात घेऊन आठवणी ढवळत राहणं. पण जसजसं रुटीन सेट होत गेलं तसतसं हे ढवळणंही कमी होऊ लागलं. त्यात दिवस दिवस उपाशी. चहा आणि पाव खाऊन दिवस काढणं. पोटात भूक असली की आठवणी हा प्रकार किंवा फॉर दॅट मॅटर इतर कुठलाही प्रकार बूर्झ्वा वाटू लागतो. जाऊ देत पण. आता इतक्या वर्षांनी हे सगळं परत कशाला? I think evening should be blamed for this, and the fucking sea and this asshole Sharad, and that whore Neeraja.


च्यायला इंग्लिशमध्ये विचार चालू झाले म्हणजे मेजर नॉनसेन्स. पुन्हा समुद्रावर यायचं नाही. संध्याकाळी तर चुकुनही नाही हे त्याने मनातल्या मनात पक्कं केलं.

“तू येणार का बे? एकदा चल की.”

मिलिंदने मानेनेच नको म्हटलं. तरी शरदचं चालूच.

“काय प्रॉब्लेम आहे तुझा? यू आर नॉट कमिटेड. अनमॅरीड. यू कॅन डू धिस स्टफ यार. जातीचा-बितीचा काही प्रॉब्लेम आहे काय? तर तसं सांग. माझा गोरेगावला पण आहे एक कॉंटॅक्ट. त्याच्याकडे जी.एस.बी. पोरीपण असतात. एकदम कडक.”

“नको यार. खरंच नको.” मिलिंदने निग्रहाने म्हटलं.

तसं शरद वैतागला.

“तू साल्या गांडू आहेस. स्वत:ला फार पुरोगामी वगैरे समजणारा गांडू. दारं बंद करून मूठ मारणारे, आपलं नागडेपण दुसऱ्या कोणाला दिसणार नाही याची काळजी घेत बसणारे गांडू लोक. तू अशा सर्व गांडू लोकांचा कॅप्टन आहेस. तुझ्यापेक्षा जास्त पुरोगामी फरीदा आहे. शी इज रेडी फॉर एनी थिंग. अमुक नको, तमुक नको असलं काही नाही. जज करणं नाही. शी इस मोअर प्रोग्रेसिव्ह दॅन यू अँड पुरोगामीज लाइक यू एवर विल बी.”

शरद कायच्या काय सुटला होता. मिलिंदने काहीच उत्तर दिलं नाही. त्याला एव्हाना माहित झालं होतं, असल्या गोष्टींवर शरद सारख्याशी बोलून काही उपयोग नव्हता. पण मग डोक्यात पुन्हा भुंगे नाचू लागले.

‘शरद इतक्या पोरींसोबत झोपला असेल पण तरी फरीदाकडे का जातो? फक्त तिलाच जास्तीचे पैसे का देतो? सेक्स हा काय फक्त शरीराशी होत असतो काय? मनाचा, मुल्यांचा, आवडीचा संबंधही असतोच न सेक्सशी. आपण कुणाला तरी हवेसे वाटतो, शरीरासकट, मनासकट, विचारांसकट ही इच्छा नसते का आपली? निशीच का आवडायची आपल्याला इतकी? तिच्या आधी काय मुली भेटल्या नव्हत्या का? किंवा तिच्या नंतरही? एखादी स्त्री आपल्याशी सेक्स करायला तयार होते म्हणून आणि म्हणूनच वासना वाटणं खरंच शक्य आहे का? स्वत:च्या बुद्धीपासून तुटलेला सेक्स खरंच समाधान देईल का? मयेकर. तिचं काय? ती आपल्याला आवडते याचं कारण फक्त तिची छाती आहे का? ती स्वत:चं घर स्वत: चालवते, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे हे कारण नसेल का?’

च्यायला, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. दाराच्या फटीतून दिसणारं. आता आपण स्वत:पण सुटलोय हे मिलिंदच्या लक्षात आलं. शरद बोलला ते सगळंच चुकीचं नसेल कदाचित. जाऊ देत. सेक्स, प्रेम, पैसा, वडील हे असे विषय दिवसाच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी कुठेही उपटले तरी आपली उदास होते हे त्याला आता पूर्णपणे पटलं होतं. मग शरदचा निरोप घेतला आणि सी.एस.टी. ची बस पकडली.

रात्र झाली होती. ट्रेन खचाखच भरलेली. ट्रेनमध्ये कशीतरी बसायला जागा मिळाली. दिवसभराचा थकवा आता जाणवायला लागला होता. त्याच्या डोळ्यांसमोर पूर्ण दिवस तुकड्या तुकड्यांनी जमा होत गेला. ट्रेन-ड्रेनेजची पाइपलाइन-मयेकर-शरद-फरीदा-कांबळे-समुद्र. कुठेच सलगता नाही. आपल्या कामाप्रमाणेच सगळे स्ट्रिंग्ससारखे तुटलेले. कशाचा कुठे पत्ता नाही. मग त्याला ट्रेनच्या जागी ड्रेनेजची पाइपलाइन दिसू लागली. त्यात गुदमरत उभे असणारे लोक. गुदमरण्यासाठी बाहेरून आत शिरणारे लोक. आणि तरीही बाहेर पडणाऱ्यांपेक्षा आत शिरणारे जास्त. व्यस्त प्रमाण. च्यायला. ठाणे गेलं. आता अजून थोडा वेळ. मग डोंबिवली. मग घर. झोप. किंवा जागरण. किंवा जागरण आणि मधेमधे झोप. मग पुन्हा उद्या हेच. हेच पुन्हा उद्या.

गाडी स्टेशनला लागली. मग पुढे निघून गेली. दिव्यांचा प्रकाश रुळांवर पडून परावर्तित होत होता. ट्रेनचं इतकं ओझं घेऊन रोज रात्री लुकलुकत राहणाऱ्या रुळांना आपलं ओझं काही फार नाही. पडावं का शांतपणे इथेच? आता नको पण. भूक लागलीये मरणाची की मरणाचीच भूक? प्ले. पॅाझ. स्टॅाप! छे पोटातली भूक जास्त. ट्रेनच्या येरझारा एनी वे चालूच असतात. जीव द्यायचाच आहे तर उपाशीपोटी का मरा. असं ठरवून मिलिंद समोरच्या खानावळीत शिरला.

Thursday, December 1, 2016

जागरण आणि फालतुगिरी

घड्याळात वाजला एक
आधी हातातलं पुस्तक फेक
एक वाजता आणखी काय सुचणार?

दुपारी एकच्या सुमारास लायब्ररीत वाचत बसलेलो, तर समोरच्या आरामखुर्चीत एक मुलगी येऊन बसली. डाव्या पायावर उजवा पाय वगैरे ठेवून. हातात कुठलं तरी जाडजूड पुस्तक. खिडकीच्या जाळीतून तिच्या पायाच्या तीन बोटांवर तुटक तुटक ऊन पडलं होतं. आणि त्याखाली मग तिच्या बोटांची सावली. तिने पाय बाजूला केला की ऊन खाली जमिनीवर पडायचं आणि सावली गायब. त्यात मधूनच तिच्या नखांवर ऊन पडलं की एकदम चमकून जायची तिची नखं. मग मला मजा वाटली. असं मोजून आठ वेळा झाल्यावर मग मात्र मला कंटाळा आला. च्यायला तिची नखंही केवढी आकर्षक होती. नाहीतर माझी नखं. एक अर्धवट तुटलेलं. कुठे घाण अडकलेली. आणि बोटांवर मातीचे काळसर डाग. 
तर मग एलिअटची कविता आठवली एकदम–

I can connect
Nothing with nothing
The broken fingernails of dirty hands.
My people humble people who expect nothing

च्यायला काय संबंध. पण जाउ देत.

I can connect
Nothing with everything
And everything with nothing

हे हे. असो.
रात्री बारा नंतर सगळं माफ असतं असं माझा एक मित्र म्हणतो.
हा मित्र ग्रेट आहे पण. याने मागे कुठे तरी वाचलेलं की सिगरेटचा शेवटचा तृतीयांश फार वाईट असतो. म्हणून मग तेव्हापासून हा दोन तृतीयांश सिगरेट ओढतो आणि उरलेली टाकून देतो. मग ती कम्पेन्सेट करायला म्हणून दर दोन सिगरेटनंतर एक एक्स्ट्रा सिगरेट ओढतो. वर म्हणणं काय तर खर्च वाढलाय हल्ली सिगरेटचा. पण तब्येतीची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार?
थोडक्यात काय तर फालतुगिरी!
===

घड्याळात वाजले दोन
हातात घेतला फोन

 तर फोन आणि जागरण यांचा फार जवळचा संबंध आहे. दोन्हींच्या दुसऱ्या बाजूला कोणी ना कोणी असतंच. असलेलं किंवा नसलेलं. असलेलं असेल तर त्रास आणि नसलेलं असेल तर आणखी त्रास. त्रास अटळ आहे एकूण.

तर फोन ही आता गरज राहिलेली नसून ते व्यसन झालेलं आहे. मुंबई-पुणे-मुंबई. च्यायला हा एक पिक्चर भयंकर डिप्रेस करणारा आहे असं एक अतिशय बेवडा मित्र म्हणतो. तसं तर दारू पिणारे लोक कशानेही डिप्रेस होऊ शकतात. हे एक बरं असतं. म्हणजे पूर्वी हाच मित्र एकदा बरेच पेग पोटात गेल्यावर गांधीजींचं भजन म्हणत चक्क लहान मुलासारखा रडत सुटलेला. मग तावातावाने माझ्यासकट जो जो आठवेल त्याला शिव्या देत सुटला. तू साधा चहा पण पीत नाहीस. तू चुत्या आहेस वगैरे. असो पण. हा विषय नाही. 

तर हा पिक्चर उदास करून जातो हे मात्र खरंय.
पण सिनेमा तर सिनेमा असतो. सिनेमापेक्षा प्रत्यक्ष घडलेले प्रसंगच जास्त टोकदार असतात. सिनेमा फक्त ते टोक त्वचेच्या आत रुतवण्याचं काम करतो. जिथे टोकं जास्त, तिथे भळभळही जास्त.
च्यायला हे कसलं छापील वाक्य आहे आणि युजलेसही. 
माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं आणि मी काहीतरी भलतंच लिहिलं. पण त्याने काय फरक पडतो. तसंही काफ्का म्हणतो की All language is but a poor translation. म्हणजे आपण जे काही लिहितो, वाचतो, बोलतो ते सगळं poor translationच.

उदाहरणार्थ मला तू आवडतोस.
Poor translation.
माझं तुझ्यावर प्रेम आहे.
आणखी Poor translation.
मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही.
बेकार बेक्कार translation.
तू नाही आलास तर मी लग्नच करणार नाही. 
बोचा.
बोच आणि बोचा यात फक्त एका मात्रेचा फरक आहे. बाकी काही नाही.
तर एकूणच लिहिणं, वाचणं
, बोलणं ही फालतुगिरीच.
=== 

घड्याळात वाजले तीन
दूध दही ताक धिना धीन.

जमलं एकदाचं च्यायला. तरी लोणी राहिलंच.
तर दुधापासून दही बनतं.. दह्यापासून ताक..
ताकापासून लोणी.. पण उलट मात्र नाही..
माणसांचं पण असंच असतं का?
म्हणजे आधी दुधासारखी स्वच्छ वगैरे. मग हळू हळू दह्यासारखी घट्ट आणि आंबट होत गेलेली. मग बऱ्यापैकी घुसळली गेली की आंबटपणा जाऊन ताकासारखी सुटी, प्रवाही होत गेलेली. आणि शेवटी लोण्यासारखी मऊ, फिकट; कुठल्यातरी खुंटीवर लटकलेली
-
मी यापैकी नक्की कुठल्या स्टेजवर आहे?
दह्याच्या असणार बहुतेक..
किंवा दुधाच्याच.. फक्त नासलेल्या!

तर मुद्दा काय तर माणूस, जीवन, आयुष्य असले शब्द घुसवले की पाणचट गोष्टीतून पण उच्च कोटीचं तत्त्वज्ञान निर्माण करता येतं.
उदाहरणार्थ “
No parking in front of the gate – तसं झालंय आयुष्याचं” किंवा
“कृपया पुढे सरकत रहा- आयुष्यात!” वगैरे. इंस्टंट तत्त्वज्ञान च्यायला.

तर मुद्दा हा की मी हे का लिहिलंय? किंवा मीच हे लिहिलंय का?
की अमुक अमुक वेळच्या मी हे लिहिलंय? हो हेच जास्त appropriate होईल. ते theory of parallel world सारखं. ही थिअरी बरीये तशी. खासकरून जबाबदारी झटकायला!
मध्ये एक भिकार नाटक पाहिलेलं ज्यात
parallel worlds दाखवलेली. ‘अमर फोटो स्टुडीओ’ म्हणून. शॉट होतं. मनस्विनीने लिहिलेलं म्हणून गेलेलो. पण बकवास होतं च्यायला. असो.

तर हे जे लिहिलंय याला नक्की काय म्हणावं? वाङगमय वगैरे तर नक्कीच नाही. वाङगमय. वांगंमय. गंमतच. तर वाङगमय हा शब्द कुठून आला याची एक गोष्ट ऐकलेली पूर्वी. कदाचित त्यावेळच्या माझ्याकडूनच.
हां तर खूप खूप वर्षांपूर्वी एका गावात कुणीतरी लेखक राहायचा. अतिशय प्रतिभावंत पण तरी गरीब. खायचे प्यायचे वांधे असायचे. शेवटी त्याने उदरनिर्वाह(!) चालवायला भीक मागायला सुरुवात केली. पण कुणी भीकही देईना. तर गावातलीच एक बाई त्याला म्हणाली की तू मला काहीतरी  दिलंस तर मी तुला रोज जेवायला देईन.(चावटपणा नको इथे.) तर मग लेखकाने तिला रोज १ कागद पाठपोठ लिहून देण्याचं मान्य केलं. मग दररोज दुपारी १ वाजता हा वाढ गं माय, वाढ गं माय असं म्हणत हिच्या दाराशी. तीही त्याला अन्न द्यायची आणि कागद घेऊन अडगळीच्या जागी सांभाळून ठेवायची. तर वर्षानुवर्षं हे असंच चालू राहिलं. या बाईच्या घरातील अडगळ लेखकाच्या कागदांनी समृद्ध होत गेली. शेवटी बऱ्याच वर्षांनी तो लेखक मरण पावला. मग या बाईने ते सगळे कागद बाहेर काढले. एकत्र बांधले आणि प्रसिद्ध केलं. लिखाणाला तिने नाव दिलं “वाढ गं माय”. हे फार म्हणजे फार पॉप्युलर झालं. तसंही साधारणपणे लेखक मेल्यावर त्याचं लिखाण जास्त खपतं असा इतिहास आहे. म्हणजे खपाल तर खपेल असं काहीतरी.  तर पुढे या नावाचा अपभ्रंश वगैरे होऊन त्यातून वाङगमय या शब्दाची निर्मिती झाली. तर असं आहे एकूण.

च्यायला मी काय लिहायचं ठरवलेलं आणि काय लिहून काढलं –
तर आता हेच आपण जीवनात असं जोडून लिहू. म्हणजे तत्त्वज्ञान तयार.
तर एकूण काय, तत्त्वज्ञान वगैरे म्हणजे फालतुगिरीच.
=== 

घड्याळात वाजले चार..
जागरण झालंय फार
इससे आप पड सकते है,
बीमार- बहोत बीमार..
अब बस भी हुआ यार
हे यमक सोप्पंय म्हणून इतकं लिहिलं. नाहीतर इतकी फालतुगिरी कोण करेल?
बाकी जागरण झालं की सगळ्यात आधी डोळ्यांना कळत असावं.
डोळे कशासाठी?
जागरण झालंय का ते कळण्यासाठी..

तर डोळ्यांवरून आठवलं. परवा शिवडीला बसने जात होतो तर एक बाई पुढच्या सीटवर अजून एका बाईसोबत गप्पा मारत बसलेली. तर तिच्या पाठीवर तीन चार ठिकाणी ओरबाडल्याच्या खुणा नव्हे जखमाच होत्या. अगदी ताज्या आणि व्हिजिबल.
उगाच अस्वस्थ वाटू लागलं मग. मग वाटलं पाठीवरच्या जखमा दिसतात तरी. पण छातीवरच्या  जखमांचं काय? किंवा कदाचित त्याच्याही आतल्या?
पण काहीही केलं तरी सारखी नजर त्या जखमांकडेच जात राहिली. अर्थात ती बाई दिसायला तितकीशी बरी नव्हती म्हणूनही कदाचित माझी नजर आणखी खोल गेली नसावी.
तर शिवडी आल्यावर बसमधून उतरलो नि मागे न वळता तडक रेल्वे स्टेशनवर. तर या दोन्ही बायका ट्रेनमध्ये माझ्या सीटसमोरच. मग मी नीट त्या बाईकडे पाहिलं तर इतका प्रसन्न चेहरा होता तिचा. डोळेही एकदम टपोरे, बोलके आणि पाणीदार – एखाद्या विचारवन्तासारखे. थोडेसे जास्तच. सारखा विचार करून डोळ्यांत पाणी येत असावं बहुतेक. पण तिचा चेहरा बघून मग मला बरंच बरं वाटलं. मग चेंबूर येईपर्यंत तेच सगळं डोक्यात. मग मात्र विसरून पण गेलो. ते डायरेक्ट आता आठवलं. तसंही उसनी आणलेली दु:खं किती काळ लक्षात ठेवणार? ---

किती काळ लक्षात ठेवणार
घड्याळात वाजले चार ---

तर मुद्दा काय तर चार हे यमक फारच सोप्पये एकूण. इतकं सोपं सगळंच असतं तर – तरी कोणी ना कोणी फालतुगिरी केलीच असती.
च्यायला हा रस्ता अटळ आहे आणि अटळ आहे फालतुगिरीसुद्धा!
 ===

घड्याळात वाजले पाच
आता आडवा तिडवा नाच

“In the morning however, we shall – dance!”
Thus spoke Zarathustra.  

च्यायला. हे पुस्तक कंप्लीट डोक्यावरून गेलेलं. फक्त त्यातलं हे वाक्य लक्षात आहे अजूनही –
He who climbs upon the highest mountains laughs at all tragedies, real or imaginary.
अर्थ काय? नाही माहीत.

बरं हे पुस्तक मी का वाचायला गेलो? कारण एका मित्राने बोलता बोलता सांगितलं की त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला हे पुस्तक आवडायचं. त्यात त्याने एक्स चा उच्चार पण अगदी जोर वगैरे देऊन केलेला. म्हणूनही च्यायला.
तर एक्स-गर्लफ्रेंड हीसुद्धा एक गोष्टच. छे गोष्ट नव्हे दंतकथा. हो दंतकथाच. लांबी खूप जास्त आणि तात्पर्य झाटभर असलेली. दंतकथेला दंतकथा म्हणूनच म्हणतात का? पण प्रत्येक कथेला तात्पर्य असायलाच हवं का? तात्पर्य नसलेल्या गोष्टी जनरली लोकांना आवडत नसाव्यात, किंवा पटत नसाव्यात बहुधा. आणि तरी लोक अख्खंच्या अख्खं आयुष्य जगतात हे विशेष.

बाय द वे आयुष्यातला ष हा पोटफोड्या का असतो?  

असो पण. दिवसाची सुरुवात आणि जागरणाचा शेवट इतक्या डीप गोष्टीनी करू नये. उगाच जागरण लांबू शकतं अशाने.

पण जागरण लांबतं म्हणजे काय? जागरणाला शेवट असतो का? उलट जागरण ही गोष्ट माझ्या मते सलग असते. म्हणजे गणितात piecewise continuous function असतं तसं जागरणही तुकड्यातुकड्यांनी सलगच असतं.

सलग नसते ती झोप. सलग नसते ती रात्र. सलग नसतो तो दिवस. सलग नसते ती मैत्री.  सलग नसतात ती माणसं. सलग नसतं ते प्रेम. सलग नसतं ते लग्न. सलग नसतात ती नाती. सलग नसतात ती वर्षं. 
पुन्हा पोटफोड्याच ष च्यायला!
जागरण मात्र सलगच. अनेक डोळ्यांचं. अनेक स्वप्नांचं. अनेक रात्रींचं. अनेक दिवसांचं. अनेक 
महिन्यांचं. अनेक वर्षांचं. अनेक युगांचं. स्वत:चं आणि जगाचंसुद्धा.

तर एकूण काय तर जागरण ही एक अनंतकाळ चालणारी सलग फालतुगिरीच!

Thursday, July 14, 2016

शेवटी शून्य आणि पारिजात...

आज संचेतीच्या सिग्नलला पुढच्या बाईकवाल्याच्या नंबर प्लेटवर लिहिलेलं ‘शेवटी शून्य’. च्यायला म्हटलं खरये.. शेवटी शून्यच. मग उगाच ‘बाकी शून्य आठवलं’ – झवझव म्हणते सोट्या पूस, याच्यात नाहीतर त्याच्यात घूस... जियो यार. परत वाचायला पाहिजे हे पुस्तक. कसंही असलं तरी.

मग उगाच माझ्या लांबच्या ओळखीतल्या एकाने जीव दिला गेल्या वर्षी त्याची आठवण झाली. च्यायला पी.एच.डी. झालेला माणूसही जीव देतो हे थोर आहे. म्हणजे शेवटी शून्यच. जाऊ देत च्यायला पण. जीव दिला म्हणजे नक्की काय? जिवंत असणं म्हणजे नक्की काय? जिवंत असण्याची नक्की खूण किंवा लक्षण काय? सातव्या मजल्यावरून त्याचं शरीर जमिनीवर येऊन आदळलं म्हणजे नक्की काय झालं – potential energy चं kinetic energyत रुपांतर आणि परत पुन्हा kinetic energyचं potential energyत. बस्स हे आणि इतकंच.. बाकी श्वासोच्छवास वगैरे म्हणजे अंधश्रद्धाच! ३ वर्षांची मुलगी पण होती त्याला. तिला हे फिजिक्स कसं समजावणार?

कामू म्हणतो आत्महत्येपेक्षा जगायला जास्त हिम्मत लागते. गांड च्यायला. रोज सकाळी अमुक वाजता उठून दात आणि गांड घासून इस्त्री केलेले किंवा न केलेले कपडे घालून अमुक एका ठिकाणी जाऊन पुन्हा गांड घासणं आणि मग घरी येऊन ठरल्या वेळी जेवण, टी.वी. आणि ऑप्शन असेल तर सेक्स करून मग झोपणं इत्यादी साठी हिम्मत लागते काय?

कोणी महान माणसाने जर गांड हा शब्द मराठीच्या इतिहासातून खोडून टाकायचा ठरवलं तर किती वर्षं लागतील? हजार तरी किमान. पण कोण असली चुत्येगिरी करेल?

असो. ते energyवरून आठवलं. मला oracle शिकवणारे सर एकदा असंच गप्पा मारताना मला म्हणलेले – Communication is only by energy म्हणून. होय च्यायला. एनर्जी. ऊर्जा. ती पाहिजेच. ती नसेल तर कोणाला कितीही वेळा भेटा, बोलणं होतच नाही. होते ती फक्त शब्दांची फेकाफेक. फेकच च्यायला. म्हणून मी कदाचित भेटत नसेन का कोणाला आजकाल? पण भेटलो नाही तरी मी केवढ्या जणांशी बोलत असतो सतत. आणि माझ्याशीही केवढे जण बोलत असतात. communicationची हीच पद्धत बरी. भेटलो की उगाच विषय काढून काढून तास (ग्लास नाही!) भरत राहायचे. नकोच च्यायला.

मग कॅम्पपर्यंत या बाईकच्या मागे मागेच. पुढे तो वळल्यावर उगाच Slaughterhouse 5 आठवलं - Everything is nothing, with a twist. पुन्हा तेच. शून्यच. आणि तरी मी बाईक चालवतोच. मैलाचे आकडे पुढे पुढे जात राहतातच. घड्याळाचे काटे, वेळ, अगणित गाड्या, आकाशातले ढग, माणसं, हा, ही, तो, ती, तू, मी(?) सगळंच--- so it goes च्यायला. या कर्टने नक्कीच दासबोध वाचला असणार.

देवलंड पितृलंड | शक्तिवीण करी तोंड |
ज्याचे मुखीं भंडउभंड | तो एक मूर्ख ||

इति दासबोध. म्हणजे मी पण मूर्खच. तर मग कोण नाहीये? असो.

बाईकचा नंबर मात्र १६८१ होता. ४१ चा वर्ग. म्हणजे इथे मात्र शेवटी शून्य नाही. च्यायला टिपिकल पुणेकर. च्युणेकर. जाऊ देत. पुणे=च्युणे=चणे=कणे. यमक=गमक. हीहाहा. च्यायला पाठीत कण्याऐवजी चणे असते तर? कदाचित वाकताना इतका त्रास झाला नसता!

आता इतका टाईप करताना इटाका असं टाईप झालं.
इटाका भारी शब्द मराठीत का नाहीये?

घरी आलो तर स्टारस्पोर्ट्सवर गांगुलीची कुठली तरी इनिंग दाखवत होते. च्यायला गांगुली लास्ट टेस्टमध्ये शून्यावर आउट झाला होता. ब्रॅडमनपण. म्हणजे शेवटी शून्य. आणि तरी दोघेही ग्रेटच. ब्रॅडमनला ग्रेट फक्त सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं. नाहीतर त्याच्याबद्दल बॅटिंग अॅव्हरेज सोडून आपल्याला काडीची माहिती नाही. गांगुली मात्र ग्रेटच. च्यायला त्याच्या आधीचे सगळे कॅप्टन कसे होते. असो.


शेवटी शून्य काढूनही लोक यांना थोर समजतात. म्हणजे एकूणच ‘शेवटी शून्य’ या तत्त्वज्ञानात कुठेतरी घाण लोचा असणार. म्हणजे शून्याच्या आधीचा आकडा जाम मॅटर करतो एकूणच. 

येस. शून्याच्या आधीचा आकडा. 
त्यासाठीच सगळे धडपड करत असतील काय?
मी हे लिहितोय तेही त्यासाठीच का?
म्हणजे काहीच नाही तर निदान लिहून तरी बघू असं काहीतरी.

शून्याच्या आधीचा आकडा जास्तच डिप्रेस करून जातो.
तर असोच च्यायला.

म्हणूनच कामूने लिहिलं असणार की - आयुष्य निरर्थक आहे असं लक्षात आलं की ते जास्त चांगल्या प्रकारे जगता येतं. 
निदान शून्याच्या आधी काही तरी असलंच पाहिजे ही निरर्थक धडपड तरी नाही.


निरर्थक.

ही निरर्थकाची रांग लांबच्या लांब
उमजेल जिथे त्या ओळीपाशी थांब
---------------------------------------------------------------------------------
पहाटे दूध आणायला बाहेर पडलो तर जाताना एका घराच्या अंगणात पारिजाताचा सडा दिसला. मस्त वाटलं. फार पूर्वी एक गोष्ट ऐकली होती पारिजाताच्या फुलांची. पारिजातका नावाची राणी सूर्यावर प्रेम करायची. पण जसे पुष्कळ लोकांच्या प्रेमाचे लागतात तसेच तिच्याही प्रेमाचे लागले. सूर्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून मग या राणीने आत्महत्या केली. आणि तिच्या राखेतून मग पारिजाताचं झाड आलं. पण दिवसा तिला सूर्याकडे बघणं अनावर झालं. हे असं झाडांचंही होतं म्हणजे. म्हणून मग हे झाड सूर्यास्तानंतर फुलांनी बहरून येतं आणि सूर्योदयापूर्वी आपली फुलं अश्रुंसारखी गाळून टाकतं. याला म्हणावं खरं प्रेम. च्यायला.


तात्पर्य काय तर झाडंसुद्धा गाळतात. अश्रू.
फरक फक्त इटाकाच की इथे आत्महत्येनंतरचा सडा सुगंधी असतो.

तर याचा आणि वर जे लिहिलंय त्याचा काडीचाही संबंध नाही, नसावा, नसेलच. जे हवं ते घ्या च्यायला. काय फरक पडतो? 
हे लिहिलं कारण मला पारिजातक आवडतो. बाकी शून्य, त्याच्या आधीचे आकडे वगैरे भंकसच. पारिजात आणि त्याचा सडा इटकंच काय ते खरं.

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!