काल बरयाच दिवसांनी नव्हे महिन्यांनी नव्हे वर्षांनी शाळेपाशी गेलेलो. मोबाईलमधून फोटो काढला. एका दुसरया मजल्यावर उभ्या असलेल्या मुलाला डोळा मारला आणि चिडवून दाखवलं. म्हणून आठवण झाली या कवितेची आणि इतर खूप खूप गोष्टींची. एकदम नॉस्टॅल्जिक की काय म्हणतात तसं काहीतरी. कविता म्हणून चांगली नसेलही पण तरीही आमच्याकरता अतिशय खासच. तर असो. शाळा! शाळाच!!! एवढंच. इतकंच.
रडतच आलो येताना
अन निरोपही घेताना,
येताना निष्पर्ण होतो
बहरून गेलो जाताना.
शाळा म्हणजे नसते ईमारत
चुना-विटांचा खोल्यांची
शाळा असते दुसरी आई
लहान-मोठ्या सारयांची.
८वीतच ओळख झालेले
अनोळखीच चेहरे
तीन वर्षांतच वाटू लागले
आपलेच सगेसोयरे.
किती मोहक आपली
ही नाती असतात
रक्ताच्या नात्यांहूनही
जवळची भासतात.
मैत्री, सहजीवन सारे
इथेच तर अनुभवले
डबेच काय सुखदुखही
आपण वाटून घेतले.
इथेच तर रडलो होतो
मार्क कमी पडले म्हणुन,
दुसरयाच क्षणी हसलो होतो
"त्याने कुठे अडले" म्हणून !
त्या वक्तृत्वस्पर्धा अन
तो क्रिकेटचा खेळ
प्रयत्नपूर्वक पकडलेले
अन सोडलेले काही झेल.
येथेच खिडकीतुन पाहिली
झाडे-झुडुपे अन फुलेसुद्धा
समोरची दुकानं, घरे
इतकेच काय पण मुलीसुद्धा !
येथेच केल्या खोड्या नि
दिला शिक्षकांना त्रास
येथेच तर मारल्या थापा
नि दिल्या शिव्या तासन-तास !
कॅंटीनमधील समोसा,
इडली-सांबाराचा स्वाद
भांडणतंटे, कट्टीबट्टी
अन शिक्षकांशी केलेले वाद
तो तोडलेला बेंच अन
ते वाकवलेले पंखे,
शाळॆचीच तर आठवण
करुन देतात सारखे...
का शाळेमधील असतात या
काही वर्षांच्या भेटी
ती तर असतात सुह्रदांची
जन्मोजन्मींची नाती.
तरीही दडलेल्या असतात
याच भेटींच्या पोटी
नेमक्या ठरवलेल्या
'वक्तशीर' ताटातुटी !
(२००४)
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
अरे सहीच. ते दिवसच वेगळे...भारलेले आणि मंतरलेले. उडून गेलेले पण रंग ठेऊन गेलेले.
आणि कविताही तशीच छान आहे.
Post a Comment